सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा ओवी ३०१ ते ३२५ पहा.
301-18
तरी अर्जुना निरूपिजेल । तें कीर भाषेआंतुल । परी मेचु ये होईजेल । ऋणिया तुज ॥301॥
तर अर्जुना, तुला खरोखर सिद्धांत सांगतो. कारण मी तुझा ऋणी असल्यामुळे तुला मोठा नमून आहे”
302-18
तंव अर्जुन म्हणे देवो । काई विसरले मागील भावो? । इये गोंठीस कीं राखत आहों । मीतूंपण जी? ॥302॥
तेव्हा अर्जुन म्हणाला, हे देवा, तुम्ही मागील गोष्टींचा अभिप्राय विसरलास काय? आणि मी व तू हे द्वैत आपल्या भाषणात कां आणता?
303-18
एथ श्रीकृष्ण म्हणती हो कां । आतां अवधानाचा पसरु निका । करूनियां आइका । पुढारलों तें ॥303॥
तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले, बरे तर, आता मी जी गोष्ट तुला सांगण्यास सुरुवात केली होती, ती सांगतो, सावधान चित्ताने ऐक.
304-18
तरी सत्यचि गा धनुर्धरा । सर्वकर्मांचा उभारा । होतसे बहिरबाहिरा । करणीं पांचें ॥304॥
तर हे धनुर्धरा, खरोखरच सर्व कर्माची उभारणी या पांच कारणांनी परभारे होते.
305-18
आणि पांच कारण दळवाडें । जिहीं कर्माकारु मांडे । ते हेतुस्तव घडे । पांच आथी ॥305॥
आणि ज्या या पांच कारणांच्या योगाने जो कर्माचा पसारा होतो, तीच पांच कारणे त्या कर्मास हेतू असतात.
306-18
येर आत्मतत्त्व उदासीन । तें ना हेतु ना उपादान । ना ते अंगें करी संवाहन । कर्मसिद्धीचें ॥306॥
दुसऱ्या जो आत्मा, उदासीन असून कर्माला निमित्तकारण किंवा उपादानकारण नसतो, अथवा तो स्वत: कर्माला करीत नाही
307-18
तेथ शुभाशुभीं अंशीं । निफजती कर्में ऐसीं । राती दिवो आकाशीं । जियापरी ॥307॥
त्याचे ठिकाणी शुभ किंवा अशुभ करणे अशा रीतीने होतात की, रात्र व दिवस आकाशात उत्पन्न झाली तरी आकाश त्याहून जसे वेगळे असते;
308-18
तोय तेज धूमु । ययां वायूसीं संगमु । जालिया होय अभ्रागमु । व्योम तें नेणें ॥308॥
पाणी व तेज यापासून उत्पन्न होणाऱ्या वाफेचा वायूशी संबंध झाला म्हणजे आकाशात जाऊन तिचे ढग बनतात, परंतु आकाशास जशी ही गोष्ट माहीत नसते;
309-18
नाना काष्ठीं नाव मिळे । ते नावाडेनि चळे । चालविजे अनिळें । उदक तें साक्षी ॥309॥
पुष्कळ लाकडे एकत्र जोडून तयार केलेली नाव वाऱ्याच्या जोराने नावाडी पाण्यावर चालवितो; परंतु त्या ठिकाणी उदक जसे काहीएक न करिता साक्षीभूत असते;
310-18
कां कवणे एकें पिंडे । वेंचितां अवतरे भांडें । मग भवंडीजे दंडें । भ्रमे चक्र ॥310॥
किंवा मातीचा गोळा घेऊन चक्रावर ठेवून दांड्याने चाक हलविल्यावर त्याचे मातीपण जाऊन भांडे तयार होते; 310
311-18
आणि कर्तृत्व कुलालाचें । तेथ काय तें पृथ्वीयेचें । आधारावांचूनि वेंचे । विचारीं पां । ॥311॥
तर याठिकाणी कुंभाराच्या ठिकाणी कुंभाराच्या कसबा शिवाय भांड्यात कसबाशिवाय भांड्यास आधारावाचून पृथ्वीचे दुसरे कोणते सहाय्य मिळते याचा विचार कर. 311
312-18
हेंहि असो लोकांचिया । राहाटी होतां आघविया । कोण काम सवितया । आंगा आलें? ॥312॥
हेही असो; परंतु जगात लोकांचे सर्व व्यापार सूर्यप्रकाशाने चालत असता ही सूर्य ज्याप्रमाणे त्यापासून अलिप्त असतो, 312
313-18
तैसें पांचहेतुमिळणीं । पांचेंचि इहीं कारणीं । कीजे कर्मलतांची लावणी । आत्मा सिना ॥313॥
त्याचप्रमाणे पाच कारणे मिळाल्याने सर्व करमणूक वेलाची मांडणूक होते व आत्मा हा वेगळाच असतो. 313
314-18
आतां तेंचि वेगळालीं । पांचही विवंचूं गा भलीं । तुकोनि घेतलीं । मोतियें जैसीं ॥314॥
आता ती पाच कारणे चांगल्या प्रकारे वेगवेगळाली वर्णन करून सांगतो. मोत्ये ज्याप्रमाणे वजन करून घ्यावी लागतात. 314
अधिष्ठानं तथा कर्ता करणं च पृथग्विधम् ।
विविधाश्च पृथक्चेष्टा दैवं चैवात्र पञ्चमम् ॥18.14॥
315-18
तैसीं यथा लक्षणें । आइकें कर्म-कारणें । तरी देह हें मी म्हणें । पहिलें एथ ॥315॥
त्याचप्रमाणे, कर्माचा कारणांची सर्व यथार्थ लक्षणे तुला सांगतो ती एक. तर देह पहिले कारण होय, असे मी म्हणतो. 315
316-18
ययातें अधिष्ठान ऐसें । म्हणिजे तें याचि उद्देशें । जे स्वभोग्येंसीं वसे । भोक्ता येथ ॥316॥
या देहाला अधिष्ठान म्हणण्याचे प्रयोजन इतकेच की, भोग जे विषय, त्यासहवर्तमान भोक्ता या ठिकाणी राहतो. 316
317-18
इंद्रियांच्या दाहें हातीं । जाचोनियां दिवोराती । सुखदुःखें प्रकृती । जोडीजती जियें ॥317॥
इंद्रियांच्या दहा हातांनी रात्रंदिवस कष्ट सोसून प्रकृतीच्या योगाने जी सुखे व दुःख उत्पन्न होतात, 317
318-18
तियें भोगावया पुरुखा । आन ठावोचि नाहीं देखा । म्हणौनि अधिष्ठानभाखा । बोलिजे देह ॥318॥
ती भोगण्याकरिता दुसरे ठिकाणच नाही, म्हणून देहाला अधिष्ठान असे म्हणतात.
319-18
हें चोविसांही तत्वांचें । कुटुंबघर वस्तीचें । तुटे बंधमोक्षाचें । गुंथाडे एथ ॥319॥
हे चोवीस तत्त्वांचे वस्तीस्थान असून बंध व मोक्ष यांचा उलगडा या ठिकाणी होतो. 319
320-18
किंबहुना अवस्थात्रया । हें अधिष्ठान धनंजया । म्हणौनि देहा यया । हेंचि नाम ॥320॥
फार काय? परंतु जागृती, स्वप्न व सुषुप्ती याचे हे मुख्य ठिकाण होय, म्हणून धनंजया, या देहाला अधिष्ठान हेच नाव योग्य आहे. 320
321-18
आणि कर्ता हें दुजें । कर्माचें कारण जाणिजे । प्रतिबिंब म्हणिजे । चैतन्याचें जें ॥321॥
आणि कर्माचे दुसरे कारण कर्ता हे होय आणि यालाच चैतन्याचे प्रतिबिंब म्हणजे जीव असे म्हणतात. 321
322-18
आकाशचि वर्षे नीर । तें तळवटीं बांधे नाडर । मग बिंबोनि तदाकार । होय जेवीं ॥322॥
आकाशातून पाऊस पडल्यावर त्याचे पृथ्वीवर डबके होते आणि मग त्यात आकाशाचे प्रतिबिंब पडल्यावर त्याप्रमाणे ते प्रतिबिंब त्याचेच आकाराचे होते; 322
323-18
कां निद्राभरें बहुवें । राया आपणपें ठाउवें नव्हे । मग स्वप्नींचिये सामावे । रंकपणीं ॥323॥
किंवा निद्रेच्या भारत राजा आपले ऐश्वर्या विसरून स्वप्नात भिकारी झालो आहो असे समजतो 323
324-18
तैसें आपुलेनि विसरें । चैतन्यचि देहाकारें । आभासोनि आविष्करें । देहपणें जें ॥324॥
तसेच चैतन्य आपले स्वरूप विसरून देहाच मी असे मानून देहरूपाने प्रगट होते. 324
325-18
जया विसराच्या देशीं । प्रसिद्धि गा जीवु ऐसी । जेणें भाष केली देहेंसी । आघवाविषयीं ॥325॥
ज्यात देहात आत्मरुपाचा विसर पडतो, तेथे चैतन्य ‘ जीव’ या नावाने प्रसिद्ध आहे व त्या जीवाने देहाला मी तुझा अभिमान कधीही सोडणार नाही, असे वचन दिले आहे. की ही 325
Sartha Dnyaneshwari Chapter 18th Complete
Sartha Dnyaneshwari Adhyay Atharawa Sampurn
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय अठरावा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 18 वा संपूर्ण
सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय १८ वा संपूर्ण
[…] […]