संत निवृत्तीनाथ समाधी अभंग वारकरी भजनी मालिका

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

संत निवृत्तिनाथ समाधी

समाधी अभंग अनुक्रमणिका

निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा १
निवृत्तिराज म्हणे भलें केलें देवा ।
आतां जी केशवा सिद्ध व्हावें ॥१॥
निवृत्तिदास म्हणे सहजासहज हरी ।
बोळविलीं सारीं सुखधामा ॥२॥
दाही दिशा चित्त जालें असें सैरा ।
आतां शारंगधरा सिद्ध व्हावें ॥३॥
आतां माझे श्रम नको घेऊं हरी ।
जावें त्र्यंबकेश्वरीं समाधीसी ॥४॥
पार माझा प्राण आला असे कंठीं ।
आतां जगजेठी सिद्ध व्हावें ॥५॥
नामा म्हणे देवा दिवस नाहीं आतां ।
त्वरें वेगीं संता सिद्ध करा ॥६॥

विमानीं बैसली विठ्ठल सुखमूर्ती २
विमानीं बैसली विठ्ठल सुखमूर्ती । घेतला निवृत्ति मध्यभागीं ॥१॥
राही रखुमाई बैसले सुरगण । उठलीं विमानें गंधर्वांचीं ॥२॥
गोपाळांचे भार उठले तातडीनें । चालिलीं विमानें सुरवरांचीं ॥३॥
आतां त्वरें चला तुम्ही सप्तश्रृंगा । कार्य हें गोविंदा सिद्धि न्यानें ॥४॥
आदि माया तेथें होईल दर्शन । संत साधुजन भेटतील ॥५॥
नामा म्हणे धन्य तुझ्या योगें हरी । तीर्थयात्रा सारी घडली आम्हां ॥६॥

टाळ हे मृदंग गायनें पुढतीं ३
टाळ हे मृदंग गायनें पुढतीं । रंजविती निवृत्ति अवघेजण ॥१॥
गीतार्थ करिती योगी मुनिजन । रंजविती मन निवृत्तीचें ॥२॥
आत्मसुख एक बोलती बोलणीं । ज्ञानराज मनीं आठवतो ॥३॥
ज्ञानराजें आमुचे निवविले डोळे । आतां ऐसे खेळे नाहीं कोणी ॥४॥
ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखीं । आतां ऐसी सखी नाहीं कोणी ॥५॥
नामा म्हणे स्वामी सांगतां प्रमाण । ऐकतां श्रवण खेद वाटे ॥६॥


अविट बोलणें बोलावें अनादि । जें गुह्म वेदीं सांपडेना ॥१॥
कीर्ति पैं वैराग्य केलें सामराज्य । गुरुत्वासी लाज नाहीं आली ॥२॥
नाशिवंत शरीर केलें अविनाश । घडविला विलास अध्यात्मींचा ॥३॥
अविट बोलणीं आठवती मनीं । आतां त्रिभुवनीं दिसेनात ॥४॥
तुझ्यामुळें हरि चालतो उगला । देहा आधीं गेला प्राण माझा ॥५॥
नामा म्हणे देवा करितां ऐसा घोर । सांडील शरीर निवृत्तिराज ॥६॥


जें जें सुख आम्हीं अनुभविलें मना । त्याचा नारायणा आठव होतो ॥१॥
ऐसें पदोपदीं निवृत्तिराज कष्टी । कोणकोणाच्या गोष्टी आठवाव्या ॥२॥
ज्येष्ठाच्या आधीं कनिष्ठाचें जाणें । केलें नारायणें उफराटें ॥३॥
उफराटें फार कळलें माझें मनीं । वळचणीचें पाणी आढया गेलें ॥४॥
अवघ्यापरीस कष्टी केलें मुक्ताईनें । कांहींच बोलणें घडलें नाहीं ॥५॥
नामा म्हणे विठोबा ऐकशी बोलणें । अवघियांची मनें कळवळती ॥६॥


गहिनीनाथें मज सांगितलें सार । केली ज्ञानेश्वरें व्याख्या त्याची ॥१॥
काढिला शोधून अनुभव मुक्ताईनें । ते ज्ञान सोपानें संपादिलें ॥२॥
अनुभवें निवविला चांगा वटेश्वर । विसोबा खेंचर सिद्ध जाला ॥३॥
त्या ज्ञानें जाला चांगदेव विकळ । त्यागियेली सकळ अविद्या माया ॥४॥
अज्ञानासी ज्ञान जालें तैं सहज । ऐसें निवृत्तिराज आठविती ॥५॥
सप्तश्रृंगीं आले देव सुरगण । उतरिलीं विमानें नामा म्हणे ॥६॥


देवीं देवेश शिवीं शिवेश । अगम्य सुरस आदिमाया ॥१॥
अष्टदिशा अगोचरें अष्टभुजा संहारकरें । असुरादि मंथन विरे कुलस्वामिनीये ॥२॥
वदताती देव आणि सुरगण । उतरिलीं विमानें ठायीं ठायीं ॥३॥
सकळांनी पूजा केली आनंदानें । करिती कीर्तनें अंबेपुढें ॥४॥
मंडपीं बैसले निवृत्ति नारायण । नारदकीर्तनें पुढें होत ॥५॥
नामा म्हणे देवी पहाती सकळ । पूजिती गोपाळ आनंदानें ॥६॥



वंदिली अंबिका निघाले बाहेर । कीर्तन गजर पुढें होत ॥१॥
गोदातीरीं क्षेत्र धन्य त्र्यंबकेश्वर । उतरले भार वैष्णंबांअचे ॥२॥
म्हणती पांडुरंगें दावियेलें स्थळा । निवृत्तिराज विकळ पार जाले ॥३॥
पंचमीचे दिवशीं गेले पंचवटी । उतरले तटीं गौतमीचे ॥४॥
नामा म्हणे शेवट केला वनमाळी । रहाती ये स्थळीं निवृत्तिराज ॥५॥


सुंदर नारायण गौरविले फार । केला नमस्कार वैष्णवांनीं ॥१॥
सुरस सर्व तीर्थें आदि पुरातन । केली नारायणें तीर्थयात्रा ॥२॥
विसोबा खेचर परिसा भागवत । अनेक ते संत बैसविले ॥३॥
मध्ये निवृत्तिराज पांडुरंग पुंडलिक । पाहाती कौतुक गौतमीचें ॥४॥
दशमीचे दिवशीं केलें तें प्रस्थान । विधि नारायण सांगतसे ॥५॥
नामा म्हणे श्रीरंगा गौरविले सकळ । जालासे विकळ निवृत्तिराज ॥६॥

१०
सहसमुदायेंसी उठावें शारंगधरा । हरिहरेश्वरा जाऊं आतां ॥१॥
उठले विष्णव आणि ह्रषिकेशी । आले त्र्यंबकासी निवृत्तिराज ॥२॥
एकादशी व्रत वद्य ज्येष्ठ मासीं । उत्सव निवृत्तीसी देवें केला ॥३॥
द्वादशीं पारणें सोडिती वैष्णव । समारंभ देव करितसे ॥४॥
राहिली ते शक्ति गळालें शरीर । देह अहंकार त्यागियेला ॥५॥
कोणाची करावी पूजा कोणें कोणा । अवघेअ नारायणा करणें येथें ॥६॥
नामा म्हणे देवा मुक्ताईची गती । सांडिलें निवृत्ति शरीरासी ॥७॥

११
आपुलिया अंगें साहित्य श्रीरंगें । पुजियेले सांग संतसाधू ॥१॥
निवृत्तिदेवें केली विठोबाची पूजा । उभारिल्या ध्वजा पताकांच्या ॥२॥
पश्चिमेसी स्थळ अनादि समूळ । उघडिली शीळ समाधीची ॥३॥
म्हणती योगेश्वर अनादि या शेजा । चिद्रलें ती पूजा केली असे ॥४॥
नामा म्हणे देवा जागा निरंगनीं । युगादि हे धुणी धुपतीये ॥५॥

१२
तुळसी बेल पुष्पें समर्पिलीं वर । पाहाती ऋषीश्वर पहिली पूजा ॥१॥
नारा विठा गोंदा पाठविलाअ महादा । झाडावया शेजा पुढें जाले ॥२॥
सभोंवतीं जागा झाडिली निर्मळ । अनादि हें स्थळ निवृत्तिराजा ॥३॥
सभोंवते दीप लाविले समाधी । म्हणती पूजा आधीं केली असे ॥४॥
अनादि हे पूजा केली म्हणती संत । आतां कोणी आंत उतरूं नये ॥५॥
नामा म्हणे हरि काय स्थळ चांगलें । दुर्वा दर्भ फुलें वाहियेलीं ॥६॥

१३
पुष्करिणीकांठीं वैष्णवांचे भार । देव ऋषीश्वर जेवताती ॥१॥
अवघिया पात्रें वाढलीं नारायणें । सोडिती पारणें निवृत्तिराज ॥२॥
विठोबा रखुमाईनें घेतला निवृत्ति । जेविताती पंक्ति गोपाळांच्या ॥३॥
जेवले वैष्णव आणि ह्रषिकेशी । गेले आचमनासी पुष्करिणीतें ॥४॥
अवघे संत तेथें बैसले निवाडे । पुंडलिक विडे वांटितसे ॥५॥
नामा म्हणे केशव बैसले कीर्तनास । होतो कासाविस निवृत्तिराज ॥६॥

१४
निवृत्तिदेवासाठीं स्फुंदती ऋषीश्वर । लविला पदर डोळियांसीं ॥१॥
गरुडावर पुंडलिकें घातियेला साज । जाती निवृत्तिराज समाधीसी ॥२॥
चालती विमानें वाजतसे घंटा । उठा आतां भेटा अवघेजण ॥३॥
समाधीभोंवते कुंकुमाचे सडे । पाहती निवाडे योगीराज ॥४॥
कीर्तन गजरीं गेलीसे मंडळी । बैसली ते पाळी समाधीच्या ॥५॥
नामा म्हणे पुढें उभे नारायण । आरंभिलें नमन निवृत्तिराजें ॥६॥

१५
नमो गणपति गजानना । नमो सरस्वति मंगलध्याना ।
नमो अगाध ब्रह्मपरायणा । नमो नमो स्बामी ॥१॥
नमो आदिमायादि सागरा । नमो चिदानंद दिगंबरा ।
एकत्व एक सारा । नमो नमो तुज ॥२॥
नमो मत्स्येंद्रनाथा अनादि । नमो सर्वव्यापका बुद्धि ।
नमो जुनाट युगादि । तुज नमो ॥३॥
नमो सत्यकाळनाथ त्रिजगतीं । नमो पुढत पुढती ।
योगेश्वरा आदि अंतीं । नमो नमो स्वामी ॥४॥
नमो गैहिनीनाथ अविनाशा । नमो सहजासहज प्रकाशा ।
नमो व्यापुनि दाही दिशा । आदि गुरु तुज नमो ॥५॥
गुप्तनाथ तुज नमन । नमो सद्‌‍गुरु परब्रह्म पूर्ण ।
सदा स्वरूपीं अनुसंधान । नमस्ते नमस्ते ॥६॥
नमो गैहिनीनाथ आदिगुरु । तूं संकटी आदि तारूं ।
नमो संसारहर्ता हरू । सद्‌गुरुनाथा तुज नमो ॥७॥
नमो कर्ता हर्ता नारायणा । नमो उदयाअस्तु गगनघना ।
नमो विराटपुरुषा जगज्जीवन । नमस्ते नमस्ते कुळस्वामी ॥८॥
नमो त्रिपुटी गुप्तधना । नीलवर्णा कलंकी कोंदणा ।
नमो ज्योतिर्मय दारुणा । नमो नमो जगद्‌गुरु ॥९॥
नमो पांडुरंग दयाळा । नमो गोविंदा गोपाळा ।
नमो वैष्णवां सकळां । योगिया ऋषीश्वरा नमो नमो ॥१०॥
नमो सर्व चराचर । नमो अंतरबाहेर ।
नमो दहाही अवतारा । जगद्‌‍भूषणा तुज नमो ॥११॥
नमन नेणो कैसें व्यापी । नमन रंगलें विश्वरूपीं ।
नमन चिन्मय गुह्य गौप्यीं । नमो सर्वभूतीं निजगुरु ॥१२॥

१६
धूप पंचारती गंधाक्षता वाहती । पूजिला निवृत्ति वैष्णवांनीं ॥१॥
प्रेमें आसुवें येती सकळांचिये डोळां । माळ घाली गळां पुंडलिक ॥२॥
निवृत्तिदेवें ग्रंथ केला होता सार । ठेविला समोर विठोबाच्या ॥३॥
अवघ्या जनालागीं केला नमस्कार । उठावले भार वैष्णवांचे ॥४॥
गोविंद गोपाळ आले ते सकळ । प्रेमें होती विकळ निवृत्तिराज ॥५॥
केलीं आचमनें पुष्कर्णीचे तटीं । आले उठाउठी समाधीपाशीं ॥६॥
नामा म्हणे देवा निवृत्तिसारखा योगी । नाहीं आतां जगीं दावावया ॥७॥

१७
समाधीच्या पाळी वैसलीं सकळीं । केला या गोपाळीं जयजयकार ॥१॥
निवृत्तीच्या संगें पुंडलिक पांडुरंग । सिद्ध जाले सांग समाधीसी ॥२॥
निवृत्तिदेवें वंदिलीं सकळांची पाउलें । तीर्थ तें घेतलें विठोबाचें ॥३॥
पताकांची छाया समाधीसी आली । उतरले खालीं निवृत्तिदेव ॥४॥
पुंडलिक पांडुरंग गेले बरोबरी । बैसले आसनावरी निवृत्तिराज ॥५॥
नामा म्हणे देवा काय पाहावें आतां । गेला पंढरिनाथा चिद्‌भानु तो ॥६॥

१८
निवृत्तिराज बैसले समाधीं सुचित । चिन्मय ते ज्योत उजळली ॥१॥
पुंडलिकें मिठी निवृत्तीच्या गळां । अवघियांच्या डोळां आसुवें येती ॥२॥
विठोबाचें ह्रदय आलेंसें भरून । झांकियेले नयन विवृत्तिराजें ॥३॥
पुंडलिके आणिलें विठोबासी बाहेर । केला नमस्कार वैष्णवांनीं ॥४॥
राही रखुमाई बैसल्या गहिंवरत । आणिक संत महंत वोसंडती ॥५॥
नामा म्हणे हरि शुद्धि नाहीं सकळां । घाला आतां शिळा समाधीसी ॥६॥

१९
नारा महादा गोंदा विठा जाले विकळ । झांकियेली शीळ समाधीची ॥१॥
गंधर्व आणि देव चिंतावले भारी । दीर्घध्वनि करी नारा विठा ॥२॥
गोंदा आणि महादा सांडिती शरीर । विसोबा खेचर फार कष्टी ॥३॥
लोपलासे भानु पडला अंधार । गेला योगेश्वर निवृत्तिराज ॥४॥
गेल्या त्या विभूति अनादि अवतार । आतां देवा फार आठवतें ॥५॥
नामा म्हणे हरि धरवेना धीर । येती गहिंवर वोसंडोनी ॥६॥

२०
परिसा भागवत करितसे शोक । म्हणती देवा दुःख अति जालें ॥१॥
द्वादशी समाधि दिधली निवृत्तीसी । जाले उदासी अवघेजणा ॥२॥
देव म्हणे उठा करा आतां पूजा । घालूं पुष्णशेजा समाधीसी ॥३॥
उठले सकळ होताती विकळ । गेले ते गोपाळ समाधीसी ॥४॥
घेतली समाधि सव्य वैष्णवांनीं । पूजिताती सुमनीं समाधीसी ॥५॥
नामा म्हणे अवघे करा प्रदक्षिणा । चला आचामना पुष्कर्णीसी ॥६॥

२१
पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी । काला आमावास्येसी त्र्यंबकेश्वरीं ॥१॥
प्रतिपदेसी हरि निघाले बाहेरी । कीर्तन गजरी पुढें होत ॥२॥
कांहीं ऋषीश्वर राहियेले तेथें । गेले बहुत ते आळंकापुरीं ॥३॥
गरुडावरी सिद्ध जाले नारायण । चाललीं विमानें गंधर्वाचीं ॥४॥
नामा म्हणे देवा जावें आषाढीसी । आले एकादशी पंढरीये ॥५॥

२२
जयजयकारें टाळी पिटिली सकळीं । चालली मंडली वैष्णवांची ॥१॥
पंढरीचा पोहा निघाला बाहेरी । कीर्तन गजरीं पुढें होत ॥२॥
विठोबा रखुमाई बैसलीं गरुडावर । केला नमस्कार विष्णवांनीं ॥३॥
म्हणती तीर्थयात्रा जाली यथासांग । पाहिले प्रसंग समाधीचे ॥४॥
गेले योगिराज अनादि जे आदि । राहिल्या समाधि जगामाजीं ॥५॥
नामा म्हणे देवा गेले मुनिजन । राहिलें तें ज्ञान जगामाजीं ॥६॥

२३
गेले दिगंबर ईश्वर विभूति । राहिल्या त्या कीर्ति जगामाजीं ॥१॥
वैराग्याच्या गोष्टी ऐकिल्या त्या कानीं । आतां ऐसें कोणी होणें नाहीं ॥२॥
सांगतील ज्ञान म्हणतील खूण । नयेचि साधन निवृत्तीचें ॥३॥
परब्रह्म डोळां दावूं ऐसें म्हणती । कोणा नये युक्ति ज्ञानोबाची ॥४॥
करतील अर्थ सांगतील परमार्थ । नये पां एकांत सोपानाचा ॥५॥
नामा म्हणे देवा सांगूनियां कांहीं । नये मुक्ताबाई गुह्य तुझें ॥६॥

२४
नानापरी खेद आठविती मना । आतां नारायणा सिद्धि न्यावें ॥१॥
समाधीसी केली आरति पंचारती । राहिली निवृत्ति स्वरूपीं तुझ्या ॥२॥
सुखाचें साधन जालीं चौघेजणें । केलीं नारायणें बोळवण ॥३॥
पंचक्रोशावरी उभे ठेले भार । केला नमस्कार समाधीसी ॥४॥
नामा म्हणे आतां जावें पंढरपुरा । समाधीचा सारा विधि जाला ॥५॥

२५
शेवटची समाधि जाली जैसी तैसी । तुज ह्रषिकेशी समर्पिली ॥१॥
आपुल्या सत्ताबळें चालविलें हरि । विष्णुदासावरी कृपा केली ॥२॥
नेणों कैसा होईल समाधीचा प्रसंग । बोलिलेति अंगें पांडुरंगा ॥३॥
मुकियाला वाचा दिधली श्रीरंगें । इच्छिला प्रसंग सिद्धी नेला ॥४॥
नामा म्हणे देव माय बाप विठ्ठल । म्हणोनि माझे बोल स्वीकारिले ॥९॥

२६
काय म्यां बोलावें किती माझी मति । तुम्ही रमापति गोड केलें ॥१॥
विश्वरूप घडी उघडिली धडफुडी । आतां काय थोडी कृपा म्हणूं ॥२॥
चिन्म्य लहरी येती उन्मळुनी । दया नारायणीं थोर केली ॥३॥
समाधि चरित्र केलें यथामति । रखूमाईचा पति आर्जविला ॥४॥
समाधि चरित्र जो करील श्रवण । तयालागीं पेणें वैकुंठीचें ॥५॥
नामा म्हणे देवगुरु धरील चित्तीं । उद्धरील पति रुक्माईचा ॥६॥

२७
समाधि श्रवण करिती निशिदिनीं । त्यांसि चक्रपाणि देईल भेटी ॥१॥
समाधि श्रवणाचा धरील जो विश्वास । नाहीं नाहीं दोष पातकांचा ॥२॥
समाधि विरक्ताची पतिता वाराणसी । कोटि कुळें त्याची उद्धरील ॥३॥
जो कोणी बैसेल समाधिश्रवणा । तया प्रदक्षिणा पृथ्वीची हे ॥४॥
स्वहित साधन सांगितलें येथें । परिसा भागवत लेखकु जाला ॥५॥
नामा म्हणे हरि बोलिलों तुझिया बळें । वाहिलीं तुळसीदळें स्वामीलागीं ॥६॥

२८
आळंकापुरीस पांडुरंग गेले । समाधिस्थ केलें ज्ञानदेवा ॥१॥
उरकोनी सोहळा संगें संतमेळा । विठोबा राहिला आळंदीस ॥२॥
पाहे चक्रपाणि नाम्या डोळ्यां पाणी । कंठ तो दाटुनि उगा आहे ॥३॥
पुसे रुक्मिणीकांत कां रे तूं निवांत । नाम्या शोकाक्रांत कोण्या दुःखें ॥४॥

२९
नामा म्हणे देवा ज्ञानदेव सृष्टीं । पडेल कां दृष्टी पुन्हां आतां ॥१॥
ज्ञानाचा वियोग जडला ह्रद्‌‍रोग । भेटीचा प्रयोग करा देवा ॥२॥
ज्ञानदेव माझा दाखवा या वेळीं । जीव तळमळी त्याच्याविण ॥३॥
संत अंतरला सखा जाला दूर । आतां पंढरपूर कैसें कंठूं ॥४॥
तुमचें दर्शन ज्ञान कृपादान । पंढरीस येणें ह्याचसाठीं ॥५॥

३०
तरीच येईन पंढरीस । दृष्टी देखेन ज्ञानेश ॥१॥
ज्ञानदेवा भेटी व्हावी । ऐशी सोय देवा लावी ॥२॥
ऐशियाच्या कृपादानें । तुम्हां संगतीं नाचणें ॥३॥
पंढरीचें जें सुख । जाणे तो एक भाविक ॥४॥

३१
ज्ञानदेव पहावा डोळां । ऐसें वाटतें विठ्ठला ॥१॥
जगजेठी जगत्पाळ । माझी पुरवावी आळ ॥२॥
तुम्हां काय अवघड । लीळें झेला गिरिगड ॥३॥
कल्पतरुतळीं वास । त्या घडे कां उपवास ॥४॥
माझ्या कृपाळुवा देवा । हांकेसरसा घेशी धांवा ॥५॥

३२
ज्ञानदेव माझें सौख्यसरोवर । त्यांत जलचर स्वस्थ होतों ॥१॥
दुर्दैव तापानें आटलें तें नीर । वर्षी रघुवीर कृपामेघ ॥२॥
ज्ञानदेवाविण व्याकुळ हे प्राण । तूं जगज्जीवन देव होसी ॥३॥
विठाबाई तूं गे जाणसी ना जाण । रक्षी मज कोण दुजे येथें ॥४॥

३३
नामा हें वदतां डोळयां आलें पाणी । पडिला धरणीं देवापुढें ॥१॥
नामदेव स्थिती पाहून श्रीपती । विस्मित ते चित्तीं स्तब्ध जाले ॥२॥
कैशा रीती नाम्य संबोखूं मी आतां । कठिण अवस्था देव म्हणे ॥३॥
प्रेम उचंबळे ऐकतां ही आळ । बुझावी गोपाळ नाम्यालागीं ॥४॥

३४
देव म्हणे नाम्या पाहे । ज्ञानदेव मींच आहे ॥१॥
तो आणि मी नाहीं दुजा । ज्ञानदेव आत्मा माझा ॥२॥
माझ्या ठायीं ठेवीं हेत । सोड खंत खंडी द्वैत ॥३॥
नाम्या उमय मानसीं । ऐसें म्हणे ह्रषिकेशी ॥४॥

३५
ज्ञानदेवापुढें कथा । करी वारील ह्या व्यथा ॥१॥
आत्मरूपीं ज्ञानेश्वर । तोचि ज्ञानाचा सागर ॥२॥
ज्ञानदेवीं धरी भाव । स्वयें होय तूंचि देव ॥३॥
राम कृष्ण रे गोविंद । जप म्हणे तो मुकुंद ॥४॥

३६
प्रेमळ तूं भक्ता माझ्या नामदेवा । जीवींचा विसावा भक्त तूंची ॥१॥
तुमचेनि माझें देवपण सत्य । चंद्रें पाझरत सोमकांत ॥२॥
तुमचे भक्तीनें आणिलें रूपासी । अवाच्या अविनाशी अरूप तें ॥३॥
पंढरिचा राणा सांगतो ह्या खुणा । भक्तांच्या कारणा येणें मज ॥४॥

३७
नग जों तें सोनें लेण्याजोगें होतें । मुदी कंकण तैं नामें त्यांचीं ॥१॥
मुशीमाजीं जेव्हां गेलें तें मुरोन । जालेसें सुवर्ण अभिन्न तें ॥२॥
तैसा ज्ञानदेव भक्त तो मी देव । लौकिक लाघव दासांसाठीं ॥३॥
ज्ञानसमाधी हे नाशी रूप नांवा । अंतींचा मेळावा मजमाजीं ॥४॥

३८
तेज स्पर्शें ज्योती कर्पुरीं निघाली । दोन्ही तीं निमालीं एकदांची ॥१॥
आघातानें नाद घंटेतून उठे । शेवटीं तो मिटे घंटेमाजीं ॥२॥
ब्रह्मीं माया स्फुरे चैतन्यप्रकाशें । शेवटीं तें वसे ब्रह्मरूपीं ॥३॥
पांडुरंग म्हणे ऐक नाम्या ज्ञान । वाटो समाधान तुझ्य जीवा ॥४॥

३९
नामदेव म्हणे देवा । ब्रह्मज्ञान पोटीं ठेवा ॥१॥
तुम्ही मायेसंगें गूढ । ज्ञान जाणिवेचें आड ॥२॥
आम्हां नाहीं याची चाड । संतभेटी गोड ॥३॥
संटभेटी प्रेम फावे । प्रेमें देवाशीं भेटावें ॥४॥
प्रेम आहे पोटभरी । देव त्यासी पोटीं धरी ॥५॥
नामदेवा ठायीं प्रेम । मार्गीं आडविलें ब्रह्म ॥६॥

४०
देई भक्तिरस प्रेमा । देवा घाली आम्हां जन्मां ॥१॥
प्रेम येई हातां जरी । जेथें नांदू ती पंढरी ॥२॥
ज्ञानदेवीं भेट व्हावी । ज्ञान गोष्ट कां सांगावी ॥३॥
नामा न बुझावा जनीं । कोण नाचेल कीर्तनीं ॥४॥
पुरवा नामयाच्या आर्ता । देवा सांगे जगन्माता ॥५॥

४१
देव कळवळले चित्तीं । त्यासी मायेची संमती ॥१॥
मायबापांचा त्या लळा । नामा घेईना कां आळा ॥२॥
बाप जगताचा स्वामी । आई प्रत्यक्ष लक्षुमी ॥३॥
नामा थोराचें लेंकरूं । छंड त्याचा अनिवारु ॥४॥
छंद नाम्याचा पुरविण्या । देव वेंची प्रेमनाण्या ॥५॥
हाटीं उदमीं भाविक । विठुराजा त्या ग्राहिक ॥६॥

४२
गरुडासि मग म्हणे पांडुरंग । साकल्य हें सांग पुंडलिका ॥१॥
नामदेव कष्टी ज्ञानदेवासाठीं । घेऊन या तो भेटी नामयाच्या ॥२॥
संतप्रेम भेटी देव गुज गोष्टी । जाणत्याच्या पोटीं सर्व वसे ॥३॥
करी पांडुरंग येई त्याच्या मना । निमित्ताकारणा भक्त शोधी ॥४॥

४३
ऐकतां निरोप पुंडलिक भक्त । जाला सद्‌‍गदित धन्य म्हणे ॥१॥
धन्य ती आळंदी धन्य विष्णुदास । धन्य हा दिवस देव भेटे ॥२॥
ज्ञानदेवा आलें वैकुंठीचें रूप । पोचतां निरोप पुंडलिका ॥३॥
पुंडलिकें तेव्हां गरुड पूजियेला । ज्ञाना बैसविला विमानांत ॥४॥
पुढें तो गरुड मागें ये विमान । रूक्मिणी दुरोन दावी देवा ॥५॥

४४
आकाशीं पुष्पक भुभ्र दंडा दिसे । बैसोनि येतसे ज्ञानदेव ॥१॥
शुद्धभावें इच्छी ज्ञानदेव भेटी । येई उठाउठी भेटूं त्यासी ॥२॥
पहाती नवल भक्त ते प्रेमळ । विश्चय निश्चय निढळ आहे ज्यांचा ॥३॥
देव म्हणे नाम्या घेई भेटीसुखा । ज्ञानदेव सखा उभा येथें ॥४॥

४५
ज्ञानदेवा पहातां डोळां । नामदेवा हर्ष जाला ॥१॥
घट्ट धरियेले पाय । तूं तो जाला सद्‌गुरुराय ॥२॥
नको करुं रे अव्हेर । मज धरूं नको दूर ॥३॥
सदा आठवत मना । तुझ्या भक्तीच्या कल्पना ॥४॥

४६
नाथा नको रे अंतरूं । तुझ्या कांसेचें वासरूं ॥१॥
कळा दुभती तूं गाय । तुझा वियोग असह्य ॥२॥
देह भोगितां प्राक्तन । मना ठेवी तयाधीन ॥३॥
ज्ञानदेवीं ही समाधी । जडो मनोवृत्ति अवघी ॥४॥
नामा भेटे ज्ञानदेवा । जनां प्रसाद मिळावा ॥५॥

४७
हरीचिया दासा नामया उदासा । तुझी ह्रषिकेशा प्रीति बहू ॥१॥
हरिदासांमाजी होसी तूं आगळा । प्रेमाचा पुतळा नामदेव ॥२॥
ज्ञानदेव म्हणे तूं विठोचा लडिवाळ । नामया तूं कृपाळ आम्हांवरी ॥३॥

४८
अगा पांडुरंगा भक्तजन कैवारी । सेवकजन द्वारीं तिष्ठताती ॥१॥
निवृत्ति ज्ञानदेव सोपान हा पाही । आली मुक्ताबाई चांगदेव ॥२॥
खेचर विसोबा असंद सुदामा॥ चोखा पुरुषोत्तमा आला असे ॥३॥
मैराळ जनक वत्सरा तो नारा । विठा सारंगधरा आला असे ॥४॥
परसा भागवता सांवता नरहरी । चोख मेळा द्वारीं भानुदास ॥५॥
नटनाटयकुसरी कान्होपात्रा द्वारीं । चवरें विंजणें हरी जाणविती ॥६॥
माचंगा अनंता नरसीपुरीं होता । तो हा पंढरीनाथा आला असे ॥७॥
मच्छिंद्र गोरक्ष चरपटी चौरंगीं । गोपीचंद योगी आला असे ॥८॥
इडा ती पिंगळा सूक्ष्म ती आवळा । षड्रस गोपाळा घेऊनि आला ॥९॥
तेथें टाळ दिंडी घेऊनियां नामा । भेटी पुरुषोत्तमा आला असे ॥१०॥

४९
रखुमाई माता राही ओंवाळिती । नित्य पंचारती हरिच्या दासां ॥१॥
नित्य भक्तां हरि यालागीं विनट । पंढरीची पेठ वसविली ॥२॥
धन्य हा निवृत्ति धन्य हा सोपान । धन्य हा निधान ज्ञानदेव ॥३॥
खेचर सांवता धनय जनमित्रा । यांसि सकळ देता हरि ब्रह्म ॥४॥
पांडुरंग पिसा यालागीं जाहला । मुक्ताई पाजिला प्रेम पान्हा ॥५॥
नामा म्हणे खूण जाणती सज्ञान । अखंड तें ध्यान निवृत्तिदेवीं ॥६॥

५०
सप्तश्रृंगालागीं केली प्रदक्षिणा । आतां नारायणा सिद्ध व्हावें ॥१॥
मार्गीं आदिमाया पूजिली आनंदी । म्हणती धन्य मांदी वैष्णवांची ॥२॥
चालतां चालतां दिवस जाले फार । होईल उशीर समाधीसी ॥३॥
तीन रात्र तेथें राहिले गोपाळ । मग म्हणती सकळ चला आतां ॥४॥
नामा म्हणे देव बैसले गरुडावर । उठावले भार वैष्णवांचे ॥५॥

५०
धन्य पुण्यभूमि आळंदी हें गांव । दैवताचें नांव सिद्धेश्वर ॥१॥
चौर्‍यांशीं सिद्धींचा सिद्धभेटी मेळा । तो सुखसोहळा काय सांगूं ॥२॥
विमानांची दाटी पाहती सुरवर । वर्षताती भार सुमनांचे ॥३॥
नामा म्हणे देवा चला तया ठाया । विश्रांति घ्यावया कल्पवरी ॥४॥

पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी

पांच दिवस उत्सव केला निवृत्तीसी । काला आमावस्येसी त्र्यंबकेश्वरी ॥१॥
प्रतिपदेसी हरि निघाले बाहेरीं । कीर्तन गजरी पुढें होत ॥२॥
कांही रूषीश्वर राहिलें तेथें । गेले ते बहुतेक अलंकापुरा ॥३॥
गरुडावरी सिद्ध झाले नारायण । चाललीं विमानें गंधर्वांचीं ॥४॥
नामा म्हणे देवा जावे आषाढीसी । आली एकादशी पंढरीये ॥५॥

प्रस्तुत सेवेसाठी आलेला अभंग देवांचे लाडके श्री संत नामदेव महाराज यांचा समाधी प्रकरणातील असुन सद्गुरु श्री संत निवृत्तिनाथ महाराज यांच्या समाधीनंतरचे वर्णन करणारा असा पाच चरणाचा अतिशय सुंदर अभंग आहे.
खरे पाहीले असता संत हे स्वतःहून येतात व स्वतःहून जातात तर आपल्या अज्ञानी जीवाला नाही म्हटले तरी यावेच लागते आणि नाही म्हटले तरी जावेच लागते. भगवंत पण अवतार धारण करतात परंतु ” भक्ता राखे पायापाशी । दुर्जनासी संसारी ” या संत तुकोबाराय यांच्या न्यायाने भक्तांना जवळ करुन, त्यांचा सांभाळ करण्यासाठी व दृष्टांचा संहार करण्यासाठी या दोन कामासाठीच येतात परंतु संत

वाढावया सूख भक्ती भाव धर्म ।
कुळाचार नाम विठोबाचे ॥

या संत न्यायाने कुठलाही भेदभाव न ठेवता

तैसे अज्ञान प्रमादिकी । का प्राक्तहिन सदोखी ।
जे निंद्यत्वाच्या सर्वविखी । खिळिले जे ॥
तया आंगिक आपुले । देऊनिया भले ।
विसरविजती सले । सलती तिये ॥

या माऊलींच्या न्यायाने सर्वांना आपलेसे करुन सुख, भक्ती, भाव, धर्म, कुळाचार आणि विठोबाचे नाम या सहा कामासाठी संत मंडळी अवतार घेत असतात आणि जगाचे कल्याण करुन निरोप घेतात म्हणजे जातात किंवा देह ठेवतात व स्वस्वरुपी विलीन होऊन जातात. आणि यापैकीच एक श्री संत निवृत्तिनाथ महाराज सुद्धा आहेत हो असे या पामर मनाला वाटते. यांच्याच समाधीनंतरचे तेथील वर्णन करताना अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात की तेथे श्री संत निवृत्तीनाथ महाराज यांचा समाधी उत्सव पाच दिवस चालला किंवा त्यांचा समाधी उत्सव सर्व संत मंडळी व देव मंडळी यांनी पाच दिवस साजरा केला. व अशा प्रकारे उत्सव साजरा करुन शेवटी आम्ही सर्व देव व संतानी त्र्यंबकेश्वरला अमावस्येच्या दिवशी काला करुन कार्यकर्माची आनंदाने सांगता केली.

अभंगाच्या दुसर्‍या चरणात सांगतात की अमावस्या नंतर दुसर्‍या दिवशी म्हणजे प्रतिपदेला हरि निघाले बाहेरी म्हणजे ज्या गाभार्‍यात महाराजांनी समाधी घेतली अथवा ज्या स्थळी समाधी घेतली तेथून भगवंत बाहेर आलेत तेव्हा त्यांच्या पुढे नामसंकिर्तनाचा गजर सुरू होत होता नव्हे नव्हे किर्तनाचा गजर सुरू झाला.

अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात की समाधी सोहळ्यात जमलेले ऋषीश्वर मंडळी सुद्धा निघायला लागली असुन काही ऋषीश्वर तेथेच थांबलेत तर काही ऋषीश्वर बहुतेक अलंकापुरा म्हणजे आळंदीला गेले असे संत नामदेव महाराज सांगत आहेत.
अभंगाच्या चौथ्या चरणात सांगतात की भगवान पांडुरंग परमात्मा गरुडावर बैसुन सिद्ध झाले असता गंधर्वांचीं विमानें चालली आहेत. असे पाहुन संत नामदेव महाराज अभंगाच्या शेवटच्या म्हणतात की ( देवाने सुद्धा निघताना संत नामदेव महाराजांना म्हटले असेल की चला नामदेव महाराज आता निघतो आम्ही तेव्हा संत नामदेव महाराज बोलायला लागले की ) हो देवा आपण जावे आता कारण आजपासूनच आषाढ महिना लागला असुन आषाढी एकादशी जवळ आली आहे. आणि या एकादशीला सर्व भक्त मंडळी आपापली कामे सोडून पंढरीला तुमच्या दर्शनासाठी येत असतात व आपल्या दर्शनाने समाधान, सुख, आनंद प्राप्त करुन जात असतात. आणि आपण तिथे नसाल तर भक्तांना सुख, समाधान प्राप्त न होता आपल्या दर्शनाने व्याकुळ होऊन दुःखी होतील हो म्हणुन आपण जावे देवा असे प्रेमविभोर होऊन संत नामदेव महाराज बोलत आहेत. असे या पामर मनाला वाटते.

वारकरी संत समाधी अभंग

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *