३० भगवान श्रीकृष्ण चरित्र
!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ३०.
जांबवानाने प्रथम कृष्णाला ओळखले नसल्यामुळे त्यांचे युध्द झाले. श्रीकृष्णाचा अतुल पराक्रम बघुन कृष्णाला त्याने ओळखले.त्याने आपली कन्या जांबवंतीचा स्विकार करण्याची विनंती केल्यावर तिच्याशी गंधर्व विवाह केला.जांबवानने स्यमंतक मणी आंदन म्हणुन दिला.जाबवंती व मणी घेऊन श्रीकृष्ण द्वारकेत पोहचला.यादव सभेत सर्वांसमोर घडलेली हकिकत सांगुन मणी सत्यजितला परत केल्यावर,आपण श्रीकृष्णावर व्यर्थ आरोप केल्याचा पश्चाताप झाला.दोषाचे परिमार्जन म्हणुन कृष्णाला आपली लाडकी सौंदर्यवती कन्या सत्यभामा दिली.आंदन म्हणुन स्यमंतक मणीही दिला,उदार,क्षमाशील श्रीकृष्णाने सत्यभामेचा स्विकार केला पण आग्रह होऊनही मण्याचा स्विकार केला नाही.
स्यमंतक मण्याचा इतिहास इथेच संपला नाही.श्रीकृष्णाचा विवाह सत्यभामेशी झाल्याचे शतधन्वा सरदारा ला कळल्यावर त्याला फार अपमानीत वाटले,कारण यापुर्वी त्याने सत्यभामाला मागणी घातली होती. सत्रजितने त्याची मागणी अव्हेरली होती.म्हणुन सूड घेण्याचे ठरविल्यावर या कामात अक्रुर व कृतवर्माला सामील करुन घेतले.पण श्रीकृष्ण इथे असेपर्यत हा बेत सिध्दीस जाणे अशक्य होते.त्यांच्या सुदैवाने त्यांना लवकरच संधी मिळाली.श्रीकृष्णाचे हेर चौफेर फिरत असत.एक दिवस दूताने वार्ता आणली.की, द्रोणाचार्यांनी घेतलेल्या अस्र-शस्र विद्येच्या परिक्षेत कौरव पांडव उत्तम रितीने उत्तीर्ण झाले.अर्जुनाने तर विशेष केलेल्या पराक्रमाने सर्व प्रेक्षागार विस्मयीत झाले असतांनाच कर्णाने प्रवेश करुन अर्जुनाला आव्हान केले.त्यानेही अर्जुना प्रमाणेच सर्व कला करुन दाखवल्या,पण तो सूतपुत्र असल्यामुळे तो स्पर्धेत भाग घेऊं शकत नाही
असे कृपाचार्यांनी म्हटल्यावर,तिथल्या तिथे दुर्योधनाने कर्णाचा अभिषेक करुन अंगदेशाचा राजा घोषित केले.आणि तिथुनच कौरव पांडवांत द्वेषा ची ठीणगी पडली.दुर्योधनाला कर्णाची साथ मिळाल्याने चुलतबंधुंमधली तेढ वाढतच गेली.भांडणे विकोपास जाऊं नये हे कारण पुढे करुन धृतराष्र्टाने कुंती सह पांच पांडवांना वारणावतास तिथे होणार्या उत्सवाला कांही दिवसांसाठी पाठविले.आणि एक वर्षानंतर वार्ता आली की,एका मध्यरात्री कुंतीसह पांच पुत्र जळुन खाक झालेत.क्षणभर श्रीकृष्ण स्तब्ध झाला.पण ते जिवंत आहे हे त्याने अंतःर्यामी जाणले.या वृत्तामुळे सगळे दुःखी झाले.श्रीकृष्णानेही आपल्यालाही दुःख झाले हे दाखविण्यासाठी धृतराष्र्टाच्या सांत्वनासाठी बलरामासह हस्तिनापुरला गेले.तिथे गेल्यावर श्रीकृष्णाने भीष्म,विदूर,गांधारी,द्रोणाचार्य ,कृपाचार्य यांच्या भेटी घेऊन आपल्याला भयंकर दुःख झाल्याचे दर्शविले.
बलराम-श्रीकृष्ण द्वारकेत नाही ही संधी साधुन राक्षसीवृत्तीच्या शतधन्वाने सत्रजितला झोपेतच ठार करुन त्याच्या जवळचा स्यमंतक मणी घेऊन निघुन गेला.त्यावेळी सत्यभामा माहेरी आलेली होती.आपल्या क्षत्रियवीर पित्याला असे अकल्पित निर्दयतेने मरण आल्यामुळे त्या स्रीला अतोनात दुःख तर झालेच,पण या निंद्य कृत्याचा सूड घेण्याचा निर्धार केला.पित्याच्या प्रेताचे दहन न करतां,प्रेत तेलाच्या डोणीत बुडवुन ठेवले.आणि हस्तीनापुरला दूत पाठवुन श्रीकृष्णाला ताबडतोब बोलावुन घेतले.बलराम कृष्ण परत आल्याचे कळल्यावर शतधन्वाची घाबरगुंडी उडाली.त्याने मणी अक्रुरा जवळ देऊन जीव वाचवण्यासाठी रोज १०० योजने पळणार्या अति चपळ घोड्यावर बसुन पलायन केले.
आपल्या गरुडध्वजांकित रथात बसुन श्रीकृष्णाने पाठलाग करुन काशी जवळ शेवटी शतधन्वाला गाठुन त्याचा शिरच्छेद करुन देहांत प्रायश्चित दिले.पण स्यमंतक मणी त्याच्या जवळ न सांपडल्याने व्दारकेतच कुणाजवळ तरी लपवुन ठेवला असेल हे जाणुन श्रीकृष्ण द्वारकेला पोहोचला.बलराम मिथिलेला असल्याचे कळल्यावर गदायुध्द विद्या संपादन करण्याची संधी दुर्योधनाने तिथे जाऊन घेतली.
इकडे अक्रुराजवळ असलेल्या स्यमंतक मण्यापासुन रोज मिळत
असलेल्या सुवर्णाचा विनियोग,भरपुर दानधर्म, यज्ञयाग करुं लागल्याने स्यमंतक मणी अक्रुराजवळच आहे हे श्रीकृष्णाने ओळखले.तसे यादव सभेतही बोलुन दाखवले. श्रीकृष्ण आपल्याला शिक्षा करेल या भितीने काशिला मामाकडे पळून गेला. जिथे हा मणी असेल तिथे दुष्काळ,रोग राई, अकाली मृत्यु उद्भवणार नाही असा ‘वर’ सूर्यदेवताने मणी देतांनाच सत्रजितला दिला असल्यामुळे काशीतला दुष्काळ नाहीसा झाला व द्वारकेत पर्जण्य कमी होऊन दुष्काळी चिन्हे दिसु लागली.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.