अशौच दहनादिक केल्यास
अशौच दहनादिक केल्यास
समान किंवा उच्च वर्णातील प्रेताचे दहन व उदक देणे, इत्यादि सर्व और्ध्व देहिक कर्म स्नेहाने केल्यास त्या जातीचे अशौच धरावे; व अशौचानंतर स्नेह, लोभ जसा असेल त्याप्रमाणे गुरु, लघु प्राजापत्य इत्यादि तीन प्रायश्चित्ते करावीत. स्नेहादि कारणाने सवर्णाचा दाह मात्र केल्यास व त्याचे घरी वास केला असल्यास त्रिरात्र अशौच धरावे. त्याचे अन्न भक्षण केले असल्यास १० रात्र अशौच धरावे. दहन व अन्नभक्षण या दोहोचा अभाव असेल तर १ दिवस अशौच.
हीन वर्णाने उत्तम वर्णाचे दाह मात्र करणे असल्यास शवाचे जातीचे अशौच धरावे. मौल्य घेऊन सवर्ण शवाचे दहन मात्र करणे असल्यास १० दिवस इत्यादिकच अशौच धरावे. मौल्य घेऊन उत्तम वर्णाचे दहन केल्यास दुप्पट अशौच धरावे. उत्तम वर्णाने अधम वर्णाचे दहन, खांदा देणे ही केल्यास त्याचे जातीचे अशौच धरावे व अशौचाअंती क्रमाने दुप्पट, तिप्पट व चौपट प्रायश्चित्त करावे. मौल्य घेऊन हीन वर्णाचे दहन इत्यादि केल्यास प्रायश्चित्त व अशौच उक्तापेक्षेने दुप्पट करावे. समान व उत्कृष्ट वर्णातील प्रेताचे दहनार्थ दहनादि सर्व और्ध्व देहिक कर्म केले तर अशौच नाही. नित्य पिंडदानादिक केल्यावर स्नानानेच शुद्धि होते.
संकलन :- अशोककाका कुलकर्णी