जोग महाराज वारकरी शिक्षण संस्था

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
वारकरी शिक्षण संस्था (जोग महाराज) आळंदी देवाची

अनुक्रमणिका

  • वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र आळंदी
    • १.१स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र आळंदी येथे मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा शके १८३९ शनिवार दिनांक २४ मार्च १९१७ पासून कार्यरत आहे.
    • १.२इतिहास
      • १.२.१स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज
      • १.२.२ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज

वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र आळंदी

स्वानंद सुखनिवासी जोग महाराज संस्थापित वारकरी शिक्षण संस्था श्रीक्षेत्र आळंदी येथे मिती चैत्र शुद्ध प्रतिपदा गुढीपाडवा शके १८३९ शनिवार दिनांक २४ मार्च १९१७ पासून कार्यरत आहे.[

वारकरी शिक्षण संस्था म्हणजे समाजाकडून संचालित, सक्रीय अनौपचारिक संत साहित्य विद्यापीठ.

संस्थेची स्थापना सद्गुरू जोग महाराजांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प.वै. मारुतीबुवा गुरव ह.भ.प.वै. मारुतीबुवा ठोंबरे यांच्या प्रयत्नाने झाली, परंतु संस्थेच्या स्थापने नंतर अल्पावधीत म्हणजेच दोन वर्षे अकरा महिन्यातच सद्गुरू जोग महारांचा इहलोकवास समाप्त झाला.परंतु या अल्प काळातच सद्गुरू जोग महाराजांनी संस्थेच्या कायदेशीर आर्थिक व संघटनात्मक बाबांची प्राथमिक पूर्तता करून संस्था स्थिर केली होती. त्यानंतर या कार्याचा विस्तार ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी २४ वर्ष ३ महिन्यांच्या आपल्या अध्यक्षपदाच्या प्रदीर्घ कार्यकाळात केला. महाराष्ट्रातील खेडोपाडी शुद्ध वारकरी परंपरेचे भजन सुरु केले. भजनासाठी लागणाऱ्या मृदुंगाला बोल दिले, वीणेला स्वर दिला व टाळाला ताल दिला आणि “लावूनी मृदुंग श्रुतीटाळघोष | सेवू ब्रम्हरस आवडीने ||” हे संत तुकाराम महाराजांचे वचन सार्थ केले. प्राथमिक परमार्थ संस्काराचा माध्यम म्हणून खेडोपाडी शिस्तबध्द, शुद्ध स्वरूपात अखंड हरीनाम सप्ताहाच्या रूपाने ज्ञानसत्र परंपरा सुरु केली.महाराष्ट्रातील जीर्णशीर्ण अशा मठ, मंदिरांना आपले योग्याशिष्य पदाधिकारी देवून वारकरी संप्रदायाच्या परमार्थस्थलाच्या स्वरूपात विकसित केले. त्यांचा जीर्णोद्धार करवून घेतला. यासाठी स्वामी महाराजांनी आपल्या सर्वसंग परित्यागी संन्यास जीवनाचा विचार न करता संप्रदाय हितार्थ व लोकसंग्रहार्थ खूप परिश्रम घेतले. या कार्यात प.पु. स्वामींनी ह.भ.प.वै. लक्ष्मणबुवा इगतपुरीकर महाराज , ह.भ.प.वै. मामासाहेब दांडेकर , ह.भ.प.वै मारुतीबुवा गुरव या गुरुबंधूंचे मोठे सहकार्य लाभले.

इतिहास

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज

२४/३/१९१७ ते ५/२/१९२०

वारकरी संप्रदायात आळंदीपंढरीची काया वाचा मने जिव्हे सर्वस्वे उदार होऊन निस्सीम भक्तिने दरमहा पायी वारी खांद्यावर पताका घेऊन करणारे वारकरी हे सर्वश्रेष्ठ परमपूज्य मानले जातात व तो संप्रदायाचा मुख्य प्रवाह आहे. पायी वारी करणाऱ्या वारकऱ्याबरोबरच दुसरे आदरणीयस्थान फडकऱ्याचे आहे. पिढ्यानपिढ्या दिंडीने पंढरपूर व संतांच्या पवित्र क्षेत्री वारीस जाऊन दशमी ते पौर्णिमा किंवा अमावास्येला काला करून परत येणे ही फडकऱ्याची गेली सातशे वर्षांची पवित्र परंपरा आहे. वारकरी संप्रदायाच्या आचारधर्माची पताका पिढ्यानपिढ्या वहन करणारे दिंडी व फड चालविणारे वारकरी महाराज मंडळी म्हणजेच वैष्णव वारकरी म्हणून संप्रदायात अतिशय पूज्य आहेत. असे असूनही सर्वसामान्य समाजात संप्रदाय प्रचाराला मर्यादा पडत होत्या. फडकऱ्याचे पद वंश परंपरेने आरक्षित होते.ही मर्यादा मान्य करून ज्या कुटुंबात संप्रदाय परंपरा आहे व ज्या कुटुंबात ती नाही अशाही कुटुंबातील सदाचार, संपन्न, अभ्यासू अन्य लोकांनाही वारकरी होऊन कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञानी, विद्वान, धर्मनिष्ठ, आचारबद्ध होण्याची संधी मिळावी . संप्रदायाचा सर्वत्र समाजात, सर्वस्थरावर विस्तार व्हावा. कीर्तन, प्रवचन, भजन परंपरा वाढावी म्हणून स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांनी आपल्या शिष्यांच्या आग्रहावरून आपली सर्वसंगपरित्यागी वैराग्याऋत्ती बाजूला ठेऊन, सर्वसामान्यांच्या पारमार्थिक हितासाठी वारकरी शिक्षण संस्थेची श्रीक्षेत्रआळंदी येथे स्थापना केली. आज महाराष्ट्राच्या सर्व भागात परमार्थाची पूर्व परंपरा असलेले व नसलेले अनेक वारकरी संप्रदायात कीर्तनकार, प्रवचनकार, तत्वज्ञानी, विद्वान, भजनगायक, वादक तयार झालेले आहेत. याचे सर्वश्रेय स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराजांच्या चरणप्रसादास आहे. म्हणून अशा पवित्र चरणास साष्टांग दंडवत.

ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज

१८/२/१९२० ते १२/५/१९४४

स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज यांच्या वैकुंठ गमना नंतर त्यांचे शिष्य ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज हे वारकरी शिक्षण संस्थाच्या अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांनी अध्यक्ष म्हणून संस्थेचा कारभार १८ फेब्रुवारी १९२० ते १२ मे १९४४ पर्यंत म्हणजेच २४ वर्ष ३ महिने पाहिला. त्यांचाच दोन तपाच्या (२४ वर्षच्या) काळात वारकरी शिक्षण संस्था घासवाले धर्मशाळेतून संस्थेने विकत घेतलेल्या मालकीच्या जुन्या घरात सुरू झाली. ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनी संस्थेला स्थैर्य मिळावे म्हणून आर्थिक वर्गणी, दान मिळतील तेथे शेतजमिनी व घरे मिळवून संस्थेला स्थैर्य प्राप्त करून दिले. याचबरोबर महाराष्ट्रभर पायपीट करुन वारकरी परंपरेचे भजन कीर्तन, नामसप्ताह सुरु केले. सर्वसामान्य कुटुंबातील खेड्यापाड्यातील मुलांना आळंदी येथे आणून त्यांना वारकरी संस्काराने सुसंस्कृत करून अभ्यासू साधक उत्तम कीर्तनकार, प्रवचनकार, गायकवादक बनविले व आपल्या शिष्यांच्या माध्यमातून दुरावस्था झालेल्या मठ मंदिरांचा जीर्णोद्धार घडवून आणला आणि त्यांचे व्यावस्थापन व्यवस्थित चालावे म्हणून आपल्या योग्य शिष्यांची नेमणूक त्या ठिकाणी केली व महाराष्ट्राच्या परमार्थिक विश्वामध्ये नवचैतन्य निर्माण केले.

ज्या कुटुंबात, गावात किंवा समाजात वारकरी संस्कार नव्हते अशा ठिकाणी अतिशय कष्ट व सायासाने त्यांनी वारकरी सांप्रदाय रुझविला. वर्तमान कीर्तन पद्धती, प्रवचन पद्धती,भजन गायन पद्धती पुनर्स्थापित करण्याचे श्रेय ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांनाच आहे. त्यांनी आपली मोठी शिष्य परंपरा महाराष्ट्रात निर्माण केली.आज त्या शिष्य परंपरेने संपूर्ण मराठी विश्व संप्रदायाच्या संस्काराने पुनीत केले आहे. अशा ह.भ.प.वै. बंकट स्वामी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *