चिरंजीव पद वारकरी भजनी मालिका
वारकरी भजनी मालिका
WARKARI BHAJNI MALAIKA
एकनाथ महाराज चिरंजीव पद
ओव्या : ४२
चिरंजीव पद पावावयासी ।
आन उपाय नाही साधकासी ।
किंचित बोलू निश्चयेंसीं ।
कळावयासी साधका ।।१।।
येथे मुख्य पाहिजे अनुताप ।
त्या अनुतापाचे कैसे रूप ।
नित्य मृत्यू जाने समीप ।
न मानी अल्प देह सुख ।।२।।
म्हणे नरदेह किमिर्थ निर्मिला ।
तो मी विषय स्वार्थी लाविला ।
थिता परमार्थ हातीचा गेला ।
करी वाहिला विचार हा ।।3।।
ऐसा अनुताप नित्य वाहता ।
तंव वैराग्य ये तयाच्या हाता ।
त्या वैराग्याची कथा ।
ऐक आता सांगेन ।।४।।
ते वैराग्य बहुता परी ।
आहे गा हे अवधारी ।
सात्विक-राजस-तामस त्रिप्रकारी ।
योगीश्वरी बोलिजे ।।५।।
नाही वेदविधी आचार ।
नेणे सत्कर्म साचार ।
कर्म धर्मी भ्रष्टाकार ।
तो अपवित्र तामस ।।६।।
त्याग केला पूज्यते कारणे ।
सत्संग सोडूनी पूजा घेणे ।
शिष्यममता धरोनी राहणे ।
ते जाणणे राजस ।।७।।
हे वैराग्य राजस तामस ।
ते न मानेच संतास ।
तेणे न भेटे कृष्ण परेस ।
अनर्थास मुळ ते ।।८।।
आंता वैराग्य शुध्द सात्विक ।
जे मी जगद्वंद्द मानी यदुनायक ।
ते तु सविस्तर ऐक ।
मनी निष्टंक बैसावया ।।९।।
भोगेच्छा विषयक ।
ते तो सांडी सकळीक ।
प्रारब्धे प्राप्त होता देख ।
तेथोनी निष्टंक अंग काढी ।।१०।।
का जे विषय पांच आहेती ।
ते आवश्य साधका नाडिती ।
म्हणोनी लागो नेदी प्रीती ।
कवणे रिती ऐक पां ।।११।।
जेणें धरिला शुध्द परमार्थ ।
त्यासी जनमान हा करी अनर्थ ।
तेणे वाढे विषय स्वार्थ ।
ऐक नेमस्त विचार हा ।।१२।।
वैराग्य पुरुष देखोनी ।
त्याची स्तुती करिती जनीं ।
ऐक सन्माने करोनि ।
पुजेलागोनी पै नेती ।।१३।।
त्याचे वैराग्य कोमल कंटक ।
नेट न धरिच निष्टंक ।
देखोनी मानस्तुती अलौकिक ।
भुलला देख पै तेथे ।।१४।।
जनस्तुती लागे मधुर ।
म्हणती उद्धरावया हा हरिचा अवतार ।
आम्हीलागी जाहला स्थिर ।
तेणे तो घरी फार शब्दगोडी ।।१५।।
ह्या पांच विषयामाजी प्रथम ।
शब्द विषय संभ्रम ।
मग स्पर्श विषय सुगम ।
उपक्रम तो ऐसा ।।१६।।
नाना मृदू आसने घालिती ।
विचित्र पर्यंक निद्रेप्रती ।
नरनारी शुश्रुषा करिती ।
तेणे धरी प्रिती स्पर्शाची ।।१७।।
रूप विषय कैसा गोंवी ।
वस्त्रे भूषणे देती बरवी ।
तेणे सौंदर्य करी जीवी ।
देह भावी श्लाघ्यता ।।१८।।
रूप ऐसा जडला ।
रस विषय कैसा झोंबला ।
जे जे आवडे तयाला ।
त्या त्या पदार्थाला अर्पिती ।।१९।।
ते रस गोडी करिता ।
घडी न विसंबे धरी ममता ।
मग गंध विषय ओढीता ।
होय तत्वतां त्या कैसा ।।२०।।
आवडे सुमन चंदन ।
बुका केशर विलेपन ।
ऐसे पांचही विषय जाण ।
जडले संपूर्ण सन्माने ।।२१।।
मग जे जे जन वंदिती ।
तेची त्याची निंदा करिती ।
परी अनुताप नुपजे चिती ।
ममता निश्चिंती पूजकांची ।।२२।।
म्हणाल विविके जो आहे ।
यासी जनमान करील काये ।
हे बोलणे मूर्खाचे पाहे ।
जया चाड आहे मनाची ।।२३।।
ज्ञात्यांसी प्रराब्धगता ।
मान झाला तरी नेघो म्हणती ।
परी तेथेच गुंतोनी न राहती ।
उदास होती तत्काळ ।।२४।।
यापरी साधकाच्या चिता ।
मानगोडी न संडे सर्वथा ।
जरी कृपा उजपेल भगवंता ।
तरी होय मागुता विरक्त ।।२५।।
तो विरक्त कैसा म्हणाल ।
जो मानले सांडी स्थळ ।
संत्सगी राहे निश्र्चीळ ।
न करी तळमळ मानाची ।।26।।
मानीना स्वंतत्र फड ।
अंगा येईल अंहता आड ।
धरुनी जीविकेची चाड ।
न बोले गोड मनधरणी ।।२७।।
नावडे प्रपंची बैसणे ।
नावडे कोणासी बोलणे ।
नावडे योग्यता मिरवणे ।
बरवे खाणे नावडे ।।२८।।
नावडे लैकिक परवडी ।
नावडती लेणी लुगडी ।
नावडे परान्न गोडी ।
द्रव्य जोडी नावडे ।।२९।।
नावडे स्त्रियांत बैसणे ।
नावडे स्त्रियांते पाहणे ।
नावडे स्त्रियांचे रगडणे ।
त्यांचे बोलणे नावडे ।।३०।।
नको नको स्त्रियांचा सांगात ।
नको नको स्त्रियांचा एकांत ।
नको नको स्त्रियांचा परमार्थ ।
करिती आघात पुरुषासी ।।३१।।
म्हणाल गृहस्थ साधके ।
स्त्री सांडोन जावे के ।
येची अर्थी उत्तर निके ।
ऐक आता सांगेन ।।३२।।
तरी स्व-स्त्रीयेवाचुनी ।
नातळावी अन्य कामिनी ।
कोणे स्त्रियेसी संनिधवाणी ।
आश्रयो झणी न द्यावा ।।३३।।
स्वस्त्रीयेसाही कार्यापुरते ।
बोलावे स्पर्शावे निरुते ।
परी आसक्त होऊनिया तेथे ।
सर्वथा चित्ते नसावे ।।३४।।
नरनारी सुश्रुषा करिती ।
भक्ती ममता उपजविती ।
परी शुध्द जो परमार्थी ।
तो स्त्रियांचे संगती न बैसे ।।३५।।
अखंड एकांती बैसणे ।
प्रमदासंगे न राहणे ।
जो निसंग निराभामाने ।
त्याने बैसणे सर्वदा ।।३६।।
कुंटब आहारा करणे ।
आकल्पिता न मिले तरी कोरान्न करणे ।
ऐसे स्थिती जे वर्तने ।
ते जाणणे शुध्द वैराग्य ।।३७।।
ऐसी स्थिती नाही ज्यासी ।
तव कृष्णप्राप्ती कैची त्यासी ।
यालागी कृष्ण भक्तांसी ।
ऐसी स्थिती असावी ।।३८।।
या स्थिती वेगळा जाण ।
कृष्णी मिळू पाहे तो अज्ञान ।
तो सकळ मूर्खाचे अधिष्ठान ।
लटिके तरी आन देवाची ।।३९।।
हे बोल माझिया मतीचे ।
नव्हती गा साचे ।
कृष्णे सांगितले उध्द्व हिताचे ।
ते मी साचे बोलिलो ।।४०।।
साच न मानी ज्याचे मन ।
तो विकल्पे न पावे श्रीकृष्णचरण ।
माझे काय जाईल जाण ।
मी बोलेन उतराई ।।४१।।
साधावया वैराग्यज्ञान ।
मनुष्य देही करावा प्रयत्न ।
सांगे एका जनार्दन ।
आणिक प्रयत्न असेना ।।४२।।
श्री संत एकनाथ महाराज कृत
चिरंजीव पद
।। संपूर्णम ।।
चिरंजीव पद समाप्त
इदं न मम
।। श्रीकृष्णार्पणमस्तु ।।