दृष्टांत 120 देव असतो, मदतही करतो, पण, आपल्याला कळत नाही. संत एकनाथ व श्रीखंड्या.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

दृष्टांत 120 देव असतो, मदतही करतो, पण, आपल्याला कळत नाही.

कुणीतरी ब्राह्मण संत एकनाथ महाराज यांचे घर शोधत शोधत फार लांबून आला होता. नाथांच्या दारात आल्यावर त्याचा अवघा शीण निघुन गेला. त्याच्या मनात एक अधीरता, उत्कटता दाटून आली होती. घरात गेल्यावर नाथ दिसताच त्या ब्राह्मणाने त्यांचे पाय धरले. हात जोडून तो नाथांना म्हणाला की,

नाथबाबा, मला भगवंताचं, श्रीकृष्णाचं दर्शन घडवा.

एकनाथ महाराज यांना काहीच समजेना. हा कोण कुठला ब्राह्मण? आपली व त्याची ओळख पण नाही, त्याला मी कोठे रहातो? हे पण माहित नाही. माझे घर शोधत शोधत तो आलाय. तेवढ्यात तेथे गिरीजादेवी (नाथांच्या पत्नी) आल्या. त्यांनी पण तो ब्राह्मण नाथांना काय म्हणत आहे, ते ऐकले होते.

नाथांनी त्याला उठवून जवळ घेतले. पण तो ब्राह्मण मात्र एकच वाक्य परत परत म्हणत होता.

नाथबाबा, मला भगवंताच, श्रीकृष्णाच दर्शन घडवा.

त्या ब्राह्मणाची नजर घराचा कानाकोपरा शोधत होती. नाथांनी त्याला मंचकावर बसवले. स्वताच्या हाताने त्याचे पाय धुतले. तोपर्यंत गिरीजादेवींनी गुळपाणी आणले. ते पाहून त्या ब्राह्मणाच मन भरून आलं.

तो पटकन खाली बसून नाथांचे पाय धरून त्यांना म्हणाला की, नाथबाबा, मला १५ दिवसांपूर्वी दृष्टांत झाला. भगवान श्रीकृष्ण माझ्या स्वप्नात आले आणी मला म्हणाले की, मी एकनाथ महाराज यांच्या घरात गेली 12 वर्ष झाली श्रीखंड्याच्या रूपात रहात आहे. आता माझी येथुन जायची वेळ झाली आहे. तुला जर माझे दर्शन घ्यायचे असेल तर तु एकनाथ महाराज यांच्या घरी ये.

नाथबाबा, मला सांगा ना, 12 वर्ष तुमच्या घरात भगवान रहात होते. ते कोठे आहेत?

हे ऐकून गिरिजादेवींची शुद्ध हरपली. नाथ देहभान विसरले. प्रत्यक्षात देव आपल्या घरात गेल्या १२ वर्षांपासून पाणी भरत होता. आपल्याला त्याने साधी ओळख पण दिली नाही. इकडे या ब्राह्मणाच्या स्वप्नात जाऊन १५ दिवस अगोदर त्याला सांगीतले. तो श्रीखंड्या कालच घरी जाऊन येतो असे सांगून निघून गेला होता.

नाथ खांबाला टेकुन हळुहळु खाली बसले. गिरिजादेवी भानावर आल्या. मग श्रीखंड्याच्या आठवणी मनात येऊ लागल्या.

ते श्रीखंड्याचे साधेपण, त्याची प्रत्येक हालचाल, शांतपणे आपले काम करणे, काल जातानाचं त्याच मुग्ध हसणं.

नाथांचे डोळे भरून वाहू लागले. त्यांनी ध्यान लावले. आणी त्यांना समजले की, खरोखर प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण, व्दारकेचा राजा आपल्या घरात पाणक्या बनुन गेली १२ वर्ष रहात होता.

इकडे गिरीजादेवींची अवस्था पण काही वेगळी नव्हती. दोघांनीही एकमेकांकडे पाहीले. गिरीजादेवी मनात म्हणत होत्या की,

चोर, माखनचोर, चितचोर! बारा वर्ष आमच्या जवळ राहीलास पण कळुनही दिले नाहीस. इतक्या वर्षात तु आमच्यावर अपार माया केलीस.

नाथ खांबाला धरून ऊठले. त्यांनी रांजण पाहीला, त्याला स्पर्श केला. श्रीखंड्यान बारा वर्ष खांद्यावरून वाहीलेली कावड पाहीली, तीला स्पर्श केला. नाथांच्या डोळ्यातुन पाणी वाहु लागले. श्रीखंड्या जिथ जेवायला बसायचा, जिथ विश्रांती घ्यायचा. नाथ श्रीखंड्याचा स्पर्श जीथे जीथे झाला होता, तीथे तीथे हाताने स्पर्श करू लागले.

गिरीजादेवींनी तर डोळ्यातील अश्रुंनी, श्रीखंड्या जिथे बसत असे तीथली जमीन अक्षरशः भिजवून काढली. कंठ दाटून आला. त्यांनी आकाशाकडे बघीतले. आणी त्या म्हणाल्या की,

हे भगवंता, सगळीकडे तुच आहेस, डोळ्यात तुच, देहात तुच, अंतर्बाह्य तुच आहेस. आमच्या घरात श्रीखंड्याच्या रूपात तुच रहात होतास. आम्ही तुला एक गरीब साधा पाणक्या समजलो. आम्हाला क्षमा कर देवा श्रीकृष्णा! पण तु जर खरोखरच श्रीखंड्याच्या रूपात आमच्याकडे गेली १२ वर्ष रहात होतास हे खरे असेल तर प्रसाद रूपाने काहीतरी श्रीखंड्याची खुण दे.

काय आश्चर्य! त्याबरोबरच रांजण दुथडी भरून वाहू लागला, जोरात वारा सुटला. अन कोपरयातली श्रीखंड्याची घुंघुरकाठी त्या वारयाने पडली. घुंघरांचा आवाज झाला. त्या घुंघुरकाठीला एक भरजरी शेला बांधलेला होता. त्या शेल्यातुन केशर व कस्तुरीचा सुगंध नाथांच्या घरात सगळीकडेच व्यापून उरला.

तो ब्राह्मण या सगळ्याला साक्षी होता. तो आ वासुन हे बघत होता. भगवान श्रीकृष्णान त्याची पण इच्छा पूर्ण केली होती.

आपल्या सगळ्यांची अवस्था पण तीच असते. देव कुणाच्या तरी रूपात आपल्या आसपास रहात असतो, आपली सेवा करत असतो. आपल्याला मदत करत असतो. आणी आपल्याला हे माहीत पण नसते. कळते तेव्हाच, जेव्हा ती व्यक्ती निघुन जाते.

१५० दृष्टांत संग्रह पहा.

Page: 1 2 16

दृष्टांत संग्रह

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *