सार्थ पंचदशी मराठी तृतीयः परिच्छेदः – पञ्चकोशविवेकः श्लोक १ ते २०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

गुहाहितं ब्रह्म यत्तत्पञ्चकोष विवेकतः ।
बोद्धुं शक्यं ततः कोषपञ्चकं प्रविविच्यते ॥ १ ॥
गुरु – “यो वेद निहितं गुहायां” या श्रुतीने जें गुहेमध्ये असणारे ब्रह्म सांगितलें, तें पंचकोशांच्या विवेकाने समजण्याजोगे आहे. याकरितां आम्ही पंचकोशांचें विवेचन करून दाखवितों. ॥१॥

देहादभ्यन्तरः प्राणः प्राणादभ्यन्तरं मनः ।
ततः कर्ता ततो भोक्ता गुहा सेयं परम्परा ॥ २ ॥
शि०- श्रुतींनी जी गुहा सांगितली, ती कोणती ? गु०- या अन्नमय स्थूल देहाच्या आंत प्राण आहेत. प्राणांच्या आंतल्या बाजूस मन आहे. मनाच्याही आंतल्या बाजूस कर्ता म्हणजे विज्ञानमय कोश आहे. त्याच्याही आंत भोक्ता म्हणजे आनंदमय कोश आहे. अशी जी अन्नमयापासून आनंदमयापर्यंत परंपरा सांगितली त्या परंपरेस गुहा असे म्हणतात. ॥२॥

पितृभुक्तान्नजाद्वीर्याज्जातोऽन्नेनैव वर्धते ।
देहः सोऽन्नमयो नात्मा प्राक्चोर्ध्वं तदभावतः ॥ ३ ॥
शि०- या प्रत्येक कोशाचे स्वरूप काय आहे, ते कृपा करून सांगा. गु०- जो देह आईबापांनी भक्षिलेलें जें अन्न त्यापासून तयार झालेल्या वीर्यापासून उत्पन्न झाला, तो अन्नभय कोश होय. हा कोश आत्मा म्हणतां येत नाहीं. कारण, उत्पत्तीपूर्वी व मरणानंतर त्याचा अभाव आहे. जो पदार्थ कार्य आहे, तो पदार्थ नाशवंत आहे. देह हें कार्य असल्यामुळें त्याला अर्थातच नाश आहे. ॥३॥

पूर्वजन्मन्यसत्त्वे तज्जन्म सम्पादयेत्कथम् ।
भाविजन्मन्यसत्कर्म न भुञ्जीतेह संचितम् ॥ ४ ॥
शि०- आपण सांगितलेला हेतु खरा आहे, त्या हेतूपासून जी गोष्ट आपण सिद्ध केली, ती मात्र संभवत नाही. म्हणून तो हेतु अप्रयोजक आहे, असें मला वाटते. कारण आपण देहाला जसे कार्यत्व लागूं केलें; तसें माझ्या मतें आत्म्यालाही कार्यत्वच येतें. तेव्हां देहालाच आत्मा म्हणण्यास कोणची हरकत आहे. ? गु०-आत्म्यास कार्यत्व लागू केलें असतां दोन दोष प्राप्त होतात. एक अकृताभ्यागम म्हणजे काही न करतां परिणाम घडणे, आणि कृतप्रणाश म्हणजे केलेल्या कर्माचा कांहींच परिणाम न होतां नाश होणें, ह्या दोन्ही गोष्टी असंभवनीय आहेत. कारण या देहास जर तूं आत्मा म्हणतोस तर, हा देहात्मा पूर्वजन्मीं नव्हता, असे म्हणावें लागेल. आणि तसे समजल्यास या जन्माची प्राप्ति कशी होईल, म्हणून येथे अकृताभ्यागम दोष आला. तसेंच पुढील जन्मी हा देहरूप आत्मा नाहीं म्हटल्यास, आतां केलेल्या पुण्यपापाचा फलभोग घेण्यास पुढें कोणी नसल्यामुळें कर्मक्षय होऊन कृतप्रणाश दोष येऊ पहातो. याकरितां आत्मा कशाचे तरी कार्य आहे, म्हणून अन्नमय कोश आत्मा नव्हे हे सिद्ध झालें. ॥४॥

पूर्णो देहे बलं यच्छन्नक्षाणां यः प्रवर्तकः ।
वायुः प्राणमयो नासावात्मा चैतन्यवर्जनात् ॥ ५ ॥
शि०- बरें, हा अन्नभय कोश नसेल तर नसो; परंतु प्राणमय कोशास आत्मा म्हणण्यास कोणती हरकत आहे. ? गु०- अन्नमयाप्रमाणें प्राणमयालाही आत्मा म्हणतां येत नाहीं. याचें तुला स्वरूप दाखवून नंतर अनात्मत्व सिद्ध करून दाखवतों. जो वायु देहाचेठायीं आपादमस्तक व्याप्त असून व्यानरूपानें शरीरास सामर्थ्य देतो, व जो नेत्रादिक इंद्रियांचा प्रेरक आहे, त्या वायूस प्राणमय कोश असें म्हणतात. या कोशालाही आत्मा म्हणतां येत नाहीं. कारण, याला चैतन्य म्हणजे ज्ञान मुळींच नाहीं. म्हणून हा जड आहे. याजकरितां काष्ठपाषाणादि पदार्थास आत्मा म्हणणें जसे योग्य नाही, तसें या प्राणमय कोशालाही आत्मा म्हणतां येत नाहीं. ॥५॥

अहन्तां ममतां देहे गृहादौ च करोति यः ।
कामाद्यवस्थया भ्रान्तो नासावात्मा मनोमयः ॥ ६ ॥
शि०- बरें, मनोमय कोशाला तरी आत्मा म्हणतां येईल किंवा नाही ? मला तर असें वाटतें कीं, मन हें प्राणाप्रमाणे जड नाही, म्हणून हेंच आत्मा आहे. गु०- त्याचेंही स्वरूप तुला सांगतो. म्हणजे पूर्वोक्त दोन कोशांप्रमाणे हा कोशही आत्मा नव्हे, हे तुझ्या ध्यानांत येईल. जो या देहाला मी मी म्हणतो व गृहादिकांला माझें माझें असे म्हणता, त्या कोशास मनोमय कोश असे म्हणतात. हाही आत्मा होऊं शकत नाहीं. कारण, हा कामक्रोधादिक वृत्तीचा बनला असल्यामुळे चंचल व अनियमित आहे, म्हणून यास आत्मा म्हणतां येत नाहीं. ॥६॥

लीना सुप्तौ वपुर्बोधे व्याप्नुयादानखाग्रगा ।
चिच्छायोपेतधीर्नात्मा विज्ञानमयशब्दभाक् ॥ ७ ॥
शि०- बरें, विज्ञानमय कोश तरी आत्मा होऊं शकेल कीं नाहीं ? गु०- त्याचेंही तुला लक्षण सांगतो. जी बुद्धि चिदाभासानें युक्त होऊन सुषुप्तींत लय पावते, आणि जागृतींत शरीरास नखशिखांत व्यापून रहाते, तिला विज्ञानमयकोश म्हणतात. हिला विलयादिक अवस्था असल्यामुळें आत्मा म्हणता येत नाहीं. ॥७॥

कर्तृत्वकरणत्वाभ्यां विक्रियेतान्तरिन्द्रियम् ।
विज्ञानमनसी अन्तर्बहिश्चैते परस्परम् ॥ ८ ॥
शि०- मन आणि बुद्धि या दोनही अंतःकरणाच्याच अवस्था आहेत, तेव्हां मनोमय आणि विज्ञानमय अशा दोन कोशांची कल्पना न करतां दोन्ही मिळून एकच कोश असें कां मानलें नाहीं ? गु०- याचें कारण हेंच की, दोन्ही जरी अंतःकरणाचींच रूपें आहेत, तरी कर्ता आणि कारण अशीं दोन रूपें दोहींची भिन्न भिन्न असल्यामुळें एकाला विज्ञानमय आणि दुसर्‍याला मनोमय असें म्हटलें. एकच, अंतःकरण आत असतांना कर्ता असतो आणि तोच बाहेर आल्यावर मन होतें, म्हणून दोन कोशांची कल्पना जी केली, ती योग्यच आहे. ॥८॥

काचिदन्तर्मुखा वृत्तिरानन्दप्रतिबिम्बभाक् ।
पुण्यभोगे भोगशान्तौ निद्रारूपेण लीयते ॥ ९ ॥
शि०- हे चारही कोश आत्मा नव्हे अशी माझ्या मनाची खात्री बरीच झाली. परंतु पांचवा जो आनंदमय कोश, ज्यास भोक्ता असें म्हणतात, तो मात्र आत्मा नव्हे असें कधीं म्हणतां येणार नाही गु०- त्याला देखील आत्मा म्हणतां येत नाहीं. त्याचें तुला येथें लक्षण सांगतों, म्हणजे त्याचेंही अनात्मत्व तुझ्या लक्षांत येईल. पुण्यकर्माचे फल अनुभवित असतां कोणी एक अंतःकरणाची वृत्ति अंतर्मुख होऊन तिजमध्यें आत्मस्वरूपाच्या आनंदाचे प्रतिबिंब पडतें, व तीच वृत्ति पुण्यभोग संपला म्हणजे निद्रारूपानें लय पावते. ॥९॥

कादाचित्कत्वतो नात्मा स्यादानन्दमयोऽप्ययम् ।
बिम्बभूतो य आनन्द आत्मासौ सर्वदा स्थितेः ॥ १० ॥
गु०- या वृत्तीसच आनंदमयकोश असें म्हणतात. ही वृत्ति अमुक काळपर्यंत राहणारी आहे, म्हणून ही अनित्य आहे, तिला आत्मा कसें म्हणतां येईल ? पण या वृत्तींत ज्याचें प्रतिबिंब पडलें अशी जी एक बिंबभूत वस्तु, तिला आत्मा म्हणतां येईल. कारण, ती सर्वदा सारखी राहणारी आहे. ॥१०॥

ननु देहमुपक्रम्य निद्रानन्दान्तवस्तुषु ।
माभूदात्मत्वमन्यस्तु न कश्चिदनुभूयते ॥ ११ ॥
शि०- अन्नमयापासून आनंदमयापर्यंत सर्व पांचही कोश आत्मा नव्हे असें आपण सिद्ध करून दाखविले खरे, परंतु या पांच कोशांखेरीज सहावा कोणीच दिसत नाहीं, तेव्हां आपण जो आत्मा म्हणतां, तो कोठे आहे ? ॥११॥

बाढं निद्रादयः सर्वेऽनुभूयन्ते न चेतरः ।
तथाप्येतेऽनुभूयन्ते येन तं को निवारयेत् ॥ १२ ॥
गु०-अरे, आनंदमयापासून अन्नमयापर्यंत पांचही कोश ज्याच्या अनुभवास आले, तोच आमचा आत्मा, तो नाहीं असे म्हणतां येईल काय ? ॥१२॥

स्वयमेवानुभूतित्वात्विद्यते नानुभाव्यता ।
ज्ञातृज्ञानान्तराभावादज्ञेयो न त्वसत्तया ॥ १३ ॥
शि०- तुम्ही जो आत्मा सांगता तो जर खरोखर असता, तर आमच्या अनुभवास आला असता; ज्या अर्थीं अनुभवास येत नाहीं, त्या अर्थी तो नाहींच असें म्हटलें पाहिजे. गु०- आम्हीं जो पंच कोशांचा साक्षी सांगितला, तो स्वत: अनुरूपच असल्यामुळें तो अनुभवास विषय होऊं शकत नाहीं. याचें कारण असें आहे कीं, तेथे ज्ञाता व ज्ञान दोन्हींही नसल्यामुळे तो ज्ञानास विषय होत नाहीं, तथापि त्याचे अस्तित्व कोठे जाईल ? पूर्वोक्त पंचकोश ज्याच्या अनुभवास आले, तो साक्षी असलाच पाहिजे. याला एक दृष्टांत देतो, म्हणजे अनुभवरूप आत्म्याला अनुभवविषयत्व संभवत नाहीं हे तुला स्पष्टपणें समजून येईल. ॥१३॥

माधुर्यादिस्वभावानामन्यत्र स्वगुणार्पिणाम् ।
स्वस्मिंस्तदर्पणापेक्षा नो न चास्तान्यदर्पकम् ॥ १४ ॥
साखर व लिंबू यांसारखे जे स्वभावत: अनुक्रमें गोड व आंबट पदार्थ आहेत ते दुसर्‍या पिठासारख्या किंवा पाण्यासारख्या पदार्थांत मिश्र केले असतां त्या पिठास किंवा पाण्यास गोडी किंवा आंबटपणा येतो. परंतु त्या साखरेस व लिंबास गोड किंवा आंबट करण्यास पिष्टादि पदार्थ समर्थ नाहींत. ॥१४॥

अर्पकान्तराराहित्येप्यस्त्येषां तत्स्वभावता ।
माभूत्तथानुभाव्यत्वं बोधात्मा तु न हीयते ॥ १५ ॥
कारण, ते स्वभावत: गोड व आंबट असल्यामुळे दुसर्‍या पदार्थांच्या मिश्रणाची त्यांस गरजच नाही. त्याप्रमाणे आत्मा हा अनुभवास विषय जरी न झाला, तरी स्वतःसिद्ध तो बोधरूप असल्यामुळे त्याचें अस्तित्व कधींही नाहीसें करतां येणार नाहीं. यास श्रुतीचे प्रमाणही आहे. ॥१५॥

स्वयंज्योतिर्भवत्येष पुरोऽस्मात्भासतेऽखिलात् ।
तमेव भान्तमन्वेति तद्‌भासा भासते जगत् ॥ १६ ॥
हा पुरुष स्वयंज्योति आहे. सर्व विषयांच्या पूर्वीं हा भासतो. असा जो भासमान आत्मा त्याला अनुसरूनच सर्व, जगत् भासतें म्हणून त्याच्या प्रकाशानेंच सर्व पदार्थ भासतात इत्यादि श्रुतिवाक्यें आत्म्याचें स्वप्रकाशत्व सुचवितात. ॥१६॥

येनेदं जानते सर्वं तं केनान्येन जानताम् ।
विज्ञातारं केन विद्याच्छक्तं वेद्ये तु साधनम् ॥ १७ ॥
आणखी दुसरीही अशींच प्रमाणें आहेत. जेणेंकरून हें सर्व जग जाणते त्या आत्म्याला जाणण्यास कोण समर्थ आहे ? अरे, हा जो सर्व जगाचा साक्षी याला कोण जाणूं शकेल ? मनानें याला जाणतां येईल अशी कोणी शंका घेईल, तर याजवर आमचें हेंच सांगणे कीं, आत्मा खेरीज करून बाकीच्या सर्व पदार्थांस जाणण्यास मात्र मन समर्थ आहे. परंतु मनाचाही साक्षी जो आत्मा त्याला जाणण्यास तें कधीं समर्थ होणार नाही. ॥१७॥

स वेत्ति वेद्यं तत्सर्वं नान्यस्तस्यास्ति वेदिता ।
विदिताविदिताभ्यां तत्पृथक्बोधस्वरूपकम् ॥ १८ ॥
तसेंच, आणखीही दोन प्रमाणें तुला सांगतो. “जें जाणण्यास. योग्य आहे, तें सर्व तो जाणतो.” ”त्याला जाणणारा दुसरा कोणीच नाहीं. तें ब्रह्म ज्ञात पदार्थ आणि अज्ञात पदार्थ यांहून अगदीं भिन्न असून केवळ बोधस्वरूप आहे.” ॥१८॥

बोधेऽप्यनुभवो यस्य न कथंचन जायते ।
तं कथं बोधयेच्छास्त्रं लोष्टं नरसमाकृतिम् ॥ १९ ॥
शि०- ज्ञात आणि अज्ञात पदार्थांखेरीज बोध म्हणून जो तुम्ही म्हणतां तो तरी अनुभवास कोठे येतो ? गु०- घटादिकाच्या बोधाविषयीं अनुभव प्रत्यक्ष होत असून जो मनुष्य तसा अनुभव नाहीं म्हणतो, त्याला मनुष्य तरी कसें म्हणावें ? तो केवळ मनुष्याच्या आकृतीचा पाषाणच आहे, असें म्हटलें पाहिजे. अशा दगडाला शास्त्रानें बोध तरी कसा करावा ? ॥१९॥

जिह्वा मेऽस्ति न वेत्युक्तिर्लज्जायै केवलं यथा ।
न बुध्यते मया बोधो बोद्धव्य इति तादृषी ॥ २० ॥
अरे, मला जिव्हा आहे कीं नाहीं असें जर कोणी पुसेल, तर तें पुसणें केवळ लाजिरवाणें आहे. कारण, जिव्हेवांचून तसें पुसता कसें येईल ? त्याप्रमाणें बोधाचा मला अनुभव नाहीं असे म्हणणें देखील मूढपणाचें नव्हे काय ? शि०- बरें आपण म्हणतां तसेंच कां होईना. परंतु प्रस्तुत जें आमचें ब्रह्मज्ञानाचे बोलणे चाललें आहे, त्याची सिद्धता कशी झाली ? ॥२०॥

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

2 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *