दृष्टांत 8 दोघात एखादा लिंबू झाला तरच…….
लिंबू मिरची
नुकतीच स्वच्छ धुवून त्याची पांढरीशुभ्र कार धावत गावाबाहेरच्या सिग्नलला थांबली.
बाजुच्या सोबत थांबलेल्या वाहनांना आधी बांधलेले लिंबू मिरची सोडून नवं लिंबू मिरची बांधत एक जख्खड म्हातारा त्याच्या कार जवळं येवून थांबला. वाढलेल्या पांढ-या दाढिच्या केसांत हडकुळी बोटं रुतवत म्हणाला “साहेब नवी दिसतेय गाडी. कोणाची नजर नको लागायला… लिंबू मिरची बांधून देतो.”
तो काही म्हणायच्या आत काळा धागा गाडीला अडकवून बोटानेच पाच रुपये झाल्याची खुण केली त्यानं.
खिशातून पाच रुपयांची नोट काढून त्या वृद्धांच्या हातावर टेकवत तो म्हणाला “बाबा उद्या ह्यापेक्षा भारी लिंबू मिरची बनवून आणा. माझ्या एका अनमोल नात्याला बांधायचं. कोणाची नजर लागलीय माहीत नाहीये.”
खोल गेलेल्या डोळ्यातून तो वृद्ध मिश्कीलपणे हसत म्हणाला “का थट्टा करताय गरीबाची? अहो नातं असं नाही सांभाळलं जात. दोघांत एखादा मिरची झालाच तर दुसर्यानं लिंबू बनुन त्यांचा तिखटपणा कमी करायचा असतो.
आपलं नातं आपणचं सांभाळावं लागतं.”
बोलता बोलता तो वृद्ध दुसऱ्या गाडीकडे निघून गेलाही.
अवघड प्रश्न किती सोपा करून सांगितला त्या वृद्धानं!
🙏