सार्थ पंचदशी मराठी तृतीयः परिच्छेदः – पञ्चकोशविवेकः श्लोक २१ ते ४०

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇
सार्थ पंचदशी सूची

यस्मिन्यस्मिन्नस्ति लोके बोधस्तत्तदुपेक्षणे ।
यद्बोधमात्रं तद्ब्रह्मेत्येवं धीर्ब्रह्मनिश्चयः ॥ २१ ॥
गु०- अरे, या जगामध्ये ज्या ज्या पदार्थाचें ज्ञान होतें, त्या त्या पदार्थाची उपेक्षा करून बाकी राहिलेलें जें केवळ ज्ञान तेंच ब्रह्म व असें जें पक्के समजणें त्यालाच ब्रह्मज्ञान म्हणतात. ॥२१॥

पञ्चकोषपरित्यागे साक्षिबोधावशेषतः ।
स्वस्वरूपं स एव स्याच्छून्यत्वं तस्य दुर्घटम् ॥ २२ ॥
शि०- जर घटादिविषयांची उपेक्षा करून ब्रह्मनिश्वय करतां येतो, तर पंचकोशविवेक जो तुझीं सांगितला त्याचा उपयोग काय ? गु०- त्याचा उपयोग फार आहे; नाहीं कसा. ब्रह्माच्या प्रत्यग् रूपाच्या ज्ञानांवाचून संसारनिवृत्ति होत नाहीं; व तसें ज्ञान पंचकोशांच्या विवेकांवाचून होत नाहीं. याकरतां तो विवेक अवश्य आहे. अन्नमयादि पंचकोशांचा बुद्धीने त्याग करून बाकी राहिलेला जो त्याचा साक्षी, तोच स्वस्वरूप ब्रह्म आहे, तो जरी दिसत नाहीं तरी त्याचें अस्तिस्व नाहींसे करतां येत नाहीं. म्हणून त्याला कोणच्याही रीतीनें शून्यत्व संभवत नाहीं. ॥२२॥

अस्ति तावत्स्वयं नाम विवादाविषयत्वतः ।
स्वस्मिन्नपि विवादश्चेत्प्रतिवाद्यत्र को भवेत् ॥ २३ ॥
कारण स्वयं म्हणून कोणी तरी एक असलाच पाहिजे. त्याच्या अस्तित्वाविषयींच जर विवाद असेल तर तेथें प्रतिवादी कोणी व्हावें. ॥२३॥

स्वासत्त्वन्तु न कस्मैचिद्रोचते विभ्रमं विना ।
अतएव श्रुतिर्बाधं ब्रूते चासत्त्ववादिनः ॥ २४ ॥
शि०- आपलें नास्तित्व प्रतिपादन करणाराच येथें प्रतिवादी समजावा. गु०- आपण नाहीं, असें भ्रांतिष्टावांचून कोणीही कबूल करणार नाहीं, म्हणूनच श्रुतीनेंही असत्त्ववाद्यांचा निषेध केला. ॥२४॥

असद्ब्रह्मेति चेद्वेद स्वयमेव भवेदसन् ।
अतोऽस्य माभूद्वेद्यत्वं स्वसत्त्वन्त्वभ्युपेयताम् ॥ २५ ॥
शि०- ती श्रुति कोणती ? गु०- त्या श्रुतीचा अर्थ असा कीं, ”ब्रह्म नाहीं म्हणणारा आपणच नाहीं असें म्हणतो, असें होतें. कारण, आपलें स्वरूप ब्रह्मच आहे.” याकरितां साक्षीला जरी वेद्यत्व नसलें, तरी त्याचें अस्तित्व म्हणून कबूल केलें पाहिजे. ॥२५॥

कीदृक्तर्हीति चेत्पृच्छेदीदृक्ता नास्ति तत्र हि ।
यदनीदृगतादृक्च तत्स्वरूपं विनिश्चिनु ॥ २६ ॥
शि०- मग तर आत्मा कसा आहे तो कृपा करून सांगा. गु०- आत्मा अमुकच प्रकारचा आहे असें सांगतांच येत नाही. ”जो असाही नव्हे, व तसाही नव्हे तोच तुझा आत्मा.” कारण जो पदार्थ ज्ञानाला विषय आहे, तोच पदार्थ असा किंवा तसा आहे असे सांगतां येईल; परंतु आत्मा हा ज्ञानाला विषय मुळींच नाहीं; तेव्हां तो असा कीं तसा हें कसें सांगावे. ॥२६॥

अक्षाणां विषयस्त्वीदृक्परोक्षस्तादृगुच्यते ।
विषयो नाक्षविषयः स्वत्त्वान्नास्यपरोक्षता ॥ २७ ॥
शि०- आपल्या बोलण्याचा अभिप्राय नीट समजला नाहीं. तो स्पष्ट करून सांगा. गु०- घटादिक जे इंद्रियांना प्रत्यक्ष दिसणारे पदार्थ त्यांस आम्ही अशा प्रकारचे असें म्हणतों, व जे इंद्रियांआड असणारे पदार्थ त्यांस आम्ही तशा प्रकारचे असें म्हणतों. आतां आत्मा हा इंद्रियांस विषयच नाहीं म्हणून तो असा (इदृश) असें म्हणतां येत नाहीं, व तो स्वप्रकाश, स्वसंवेद्य असल्यामुळें तो तसा (तादृश) असेही म्हणतां येत नाहीं. ॥२७॥

अवेद्योऽप्यपरोक्षोऽतः स्वप्रकाशो भवत्ययम् ।
सत्यं ज्ञानमनन्तं चेत्यस्तीह ब्रह्मलक्षणम् ॥ २८ ॥
या कारणास्तव आत्मा ज्ञानाला विषय नसून प्रत्यक्ष आहे. म्हणूनच तो स्वप्रकाश आहे. व ”सत्यं ज्ञानमनंतं” या श्रुतीने जें ब्रह्माचें लक्षण सांगितलें तें आत्म्यालाही लागूं पडतें. कारण आत्माही सत्यरूप, ज्ञानरूप आणि अनंत आहे असें विचाराअंतीं सिद्ध होतें. ॥२८॥

सत्यत्वं बाधराहित्यं जगद्बाधैकसाक्षिणः ।
बाधः किंसाक्षिको ब्रूहि न त्वसाक्षिक इष्यते ॥ २९ ॥
शि०- तें कसें ? गु०- ज्याला बाध नाहीं तेंच सत्य. आत्मा सर्व जगाच्या अभावाचा साक्षी आहे, त्याच्या अभावाला पहाणारा कोणीच नाहीं, व पहाणारावांचून तदभाव स्वीकारणें बरोबर नाहीं. म्हणून आत्मवस्तूचा अभाव कधींही होत नाहीं असें म्हटलें पाहिजे. सर्व जगाच्या अभावाचा अनुभव निद्रा, मूर्च्छा व समाधि या अवस्थांमध्ये सर्वांस आहेच. तसा साक्षीच्या अभावाचा अनुभव घेणारा कोणीही नाहीं, म्हणून आत्मा हा सत्य आहे हे सिद्ध झालें. ॥२९॥

अपनीतेषु मूर्तेषु ह्यमूर्तं शिष्यते वियत् ।
शक्येषु बाधितेष्वन्ते शिष्यते यत्तदेव तत् ॥ ३० ॥
यास दृष्टांत. घरांतील सर्व मूर्त पदार्थ काढून टाकले असतां जसें बाकी अमूर्त आकाश रहातें, त्याप्रमाणें आपणाव्यतिरिक्त जितके म्हणून देहेंद्रियादिक मूर्तामूर्त पदार्थ आहेत, त्यांचें ”नेतिनेति” या श्रुतीने निराकरण करून बाकी जो बोधरूप साक्षी रहातो तोच बाधरहित सत्य आत्मा होय. ॥३०॥

सर्वबाधे न किंचिच्चेद्यन्न किंचित् तदेव तत् ।
भाषा एवात्र भिद्यन्ते निर्बाधं तावदस्ति हि ॥ ३१ ॥
शि०- प्रतीतीस येणार्‍या सर्व पदार्थांचा निषेध केला असतां बाकी कांहींच रहात नाही. मग बाकी जो रहातो तो आत्मा असें जें आपण म्हटले त्याचा अर्थ काय ? गु०- जें बाकी कांहीं रहात नाहीं म्हणतोस, तेंच आमचें ब्रह्म. कांहीं नाहीं म्हणणें व कांहीं आहे म्हणणें ह्यांत भाषेचा मात्र भेद आहे. येर्‍हवी वास्तविक पाहिलें असतां बाधरहित साक्षिचैतन्य आहेच आहे. ॥३१॥

अत एव श्रुतिर्बाध्यं बाधित्वा शेषयत्यदः ।
स एष नेति नेत्यात्मेत्यतद्व्यावृत्तिरूपतः ॥ ३२ ॥
श्रुतीमध्येही असेंच सांगितले आहे. ”नेतिनेति” या श्रुतीचा अर्थ असा आहे कीं, जे जे पदार्थ बुद्ध्यादिकांस गोचर म्हणून आहेत, ते ते जड असें समजून त्यांचें निराकरण करून बाकी राहिलेलें साक्षिचैतन्य जें निराकरण करण्यास अशक्य तेंच ब्रह्म होय. ॥३२॥

इदं रूपं तु यद्याव तत्त्यक्तुं शक्यतेऽखिलम् ।
अशक्यो ह्यनिदं रूपः स आत्मा बाधवर्जितः ॥ ३३ ॥
शि०- “नेतिनेति” या श्रुतीने बाधित होणारा पदार्थ कोणता व बाधित न होणारा पदार्थ कोणता ? गु०- जितके म्हणून हें हें अशा दर्शक नामास गोचर होणारे पदार्थ आहेत, त्यांचा निषेध करणें शक्य आहे. आणि जी वस्तु, ही अमुकच अशा रीतीनें दाखवितां येत नाहीं; तिचा निषेध करणे अशक्य आहे, अशी वस्तु सर्वांचा साक्षी जो बाधवर्जित आत्मा तो एकच आहे. ॥३३ ॥

सिद्धं ब्रह्मणि सत्यत्वं ज्ञानत्वं तु पुरोदितम् ।
स्वयमेवानुभूतित्वादित्यादिवचनैः स्फुटम् ॥ ३४ ॥
याप्रमाणें ब्रह्माच्या लक्षणांत जे सत्यत्व सांगितले तें आत्म्यास कसे लागूं पडते तें येथें सिद्ध करून दाखविले. आत्म्याची ज्ञानरूपता तर ”स्वयमेवानुभूतित्वात्” इत्यादि श्वोकांतील वाक्यांनीं पूर्वीच सिद्ध केली आहे. शि०- सत्य आणि ज्ञान ही दोन लक्षणे आत्म्याचेठायीं सिद्ध करून दाखविली खरी, परंतु अनंत हें लक्षण आत्म्यास लागू पडेल कीं नाहीं, याचाच मला मुळीं संशय आहे. ॥३४॥

न व्यापित्वाद्देशतोऽन्तो नित्यत्वान्नापि कालतः ।
न वस्तुतोऽपि सर्वात्म्यादानन्त्यं ब्रह्मणि त्रिधा ॥ ३५ ॥
गुरु०- तें कसे लागू पडत नाहीं ? अरे, ब्रह्म सर्वव्यापि असें श्रुतींत सांगितले आहे, यावरून अर्थातच त्याला देशपरिच्छेद नाहीं; ब्रह्म नित्य असें सांगितले आहे म्हणून त्यास कालपरिच्छेद नाहीं; अणि ब्रह्म सर्व जगाचा आत्मा असें सांगितलें आहे म्हणून त्यास वस्तुपरिच्छेदही नाहीं. याप्रमाणें देशतः, कालतः व वस्तुतः ब्रह्मास अंत नाहीं असें झालें ॥३५॥

देशकालान्यवस्तूनां कल्पितत्वाच्च मायया ।
न देषादिकृतोऽन्तोऽस्ति ब्रह्मानन्त्यं स्फुटन्ततः ॥ ३६ ॥
शि०- देश, काल आणि वस्तु ही तिन्ही प्रत्यक्ष असून त्यांचा परिच्छेद ब्रह्मास नाहीं असें कसे म्हणतां ? गु०- असेनात बापडी. तीं असलीं तरी मायाकल्पित मिथ्या असल्यामुळे त्यांपासून ब्रह्माच्या अनंतपणास मुळीच हानि नाहीं. म्हणून ब्रह्म अनंत आहे असें जें म्हटले तें अगदीं योग्य आहे. ॥२६॥

सत्यं ज्ञानमनन्तं यद्ब्रह्म तद्वस्तु तस्य तत् ।
ईश्वरत्वन्तु जीवत्वमुपाधिद्वयकल्पितम् ॥ ३७ ॥
शि०- अहो, ब्रह्माला जड जगताचा परिच्छेद नाहीं असें म्हटलें तरी चेतनरूप जे जीव आणि ईश्वर त्यांचा तरी परिच्छेद असलाच पाहिजे. मग ब्रह्म अनंत आहे, हें म्हणणें कसें संभवेल. गु०- जें सत्यादि लक्षणांनीं युक्त असें ब्रह्म सांगितले तेवढे मात्र सत्य आहे. त्याजवर ईश्वरत्व आणि जीवत्व ही दोन्ही उपाधिकल्पित आहेत; म्हणून जड जगताप्रमाणें त्यांपासनूही ब्रह्मास परिच्छेद होत नाहीं ॥३७॥

शक्तिरस्त्यैश्वरी काचित्सर्ववस्तुनियामिका ।
आनन्दमयमारभ्य गूढा सर्वेषु वस्तुषु ॥ ३८ ॥
शि०- त्या दोन्ही उपाधीची स्वरूपे कृपा करून सांगावी. गु०- पृथिव्यादि सर्व वस्तूंचे नियमन करणारी अशी कोणी एक ईश्वराची अनिर्वचनीय शक्ति आहे. शि०- तर मग ती कां दिसत नाहीं. ? गु०- आनंदमयापासून सर्व ब्रह्मांडापर्यंत ती गुप्तरूपानें आहे म्हणून दिसत नाही. ॥३८॥

वस्तुधर्मा नियम्येरं शक्त्या नैव यदा तदा ।
अन्योन्यधर्मसांकर्याद्विप्लवेत जगत्खलु ॥ ३९ ॥
शि०- ती जर दिसत नाहीं तर ती आहे असें तरी कसे म्हणावे ? गु०- ती जर नसेल तर पृथिव्यादि तत्त्वांचे जे काठिन्यादि धर्म त्यांची व्यवस्थाच लागणार नाहीं इतकेंच नव्हे, तर त्या धर्माचें परस्पर सांकर्य होऊन जगाची स्थितीच राहणार नाही. ॥३९॥

चिच्छायावेशतः शक्तिश्चेतनेव विभाति सा ।
तच्छक्त्युपाधिसंयोगाद्ब्रह्मैवेश्वरतां व्रजेत् ॥ ४० ॥
शि०- परंतु ती जड आहे असें तुम्हीच म्हणतां, मग ती जगाचें नियमन तरी कसें करील. गु०- ती जरी जड आहे तरी तिजमध्य ब्रह्माचें प्रतिबिंब पडल्यामुळे ती चेतनासारखी दिसते, म्हणून तिजमध्यें नियमन करण्याचे सामर्थ्यही संभवतें. या शक्तीच्या उपाधीचा संयोग झाल्यामुळे ब्रह्मालाच ईश्वरपणा आला. ॥४०॥

कोषोपाधिविवक्षायां याति ब्रह्मैव जीवताम् ।
पिता पितामहश्चैकः पुत्रपौत्रौ यथा प्रति ॥ ४१ ॥
आणि पूर्वी सांगितलेल्या कोशांच्या उपाधीमुळे ब्रह्मालाच जीवपणा आला. शि०- अहो पण एकाच ब्रह्माला जीवत्व आणि ईश्वरत्व हे विरुद्ध धर्म कसे आले ? गु०- जसा एकच मनुष्य पुत्राच्या विवक्षेनें पिता होतो, आणि नातवाच्या विवक्षेनें पितामह म्हणजे आजा होतो; त्याप्रमाणें एकच ब्रह्म कोशविवक्षेनें जीव होतें, आणि मायेच्या विवक्षेनें ईश्वर होतें. ॥४१॥

पुत्रादेरविवक्षायां न पिता न पितामहः ।
तद्वन्नेशो नापि जीवः शक्तिकोषाविवक्षणे ॥ ४२ ॥
परंतु पुत्र आणि नातु यांची विवक्षा न घेतल्यास जसा बापही नाहीं व आजाही नाही, त्याप्रमाणे माया व कोश यांची विवक्षा न केली तर ईश्वरही नाहीं व जीवही नाहीं. ॥४२॥

य एवं ब्रह्म वेदैष ब्रह्मैव भवति स्वयम् ।
ब्रह्मणो नास्ति जन्मातः पुनरेष न जायते ॥ ४३ ॥
इति पञ्चकोषोविवेकोनाम तृतीयः परिच्छेदः ॥ ३ ॥
या रीतीनें जो ब्रह्म जाणतो तो स्वत: ब्रह्मच होतो. आतां ज्या अर्थी ब्रह्माला जन्म नाही, त्या अर्थीं त्यालाही पुनजर्न्म नाहीं हें सिद्ध झालें. ॥४३॥
इति पंचकोशविवेकः समाप्तः ।

सार्थ पंचदशी सूची

श्रीविद्यारण्य स्वामींकृत सार्थ मराठी पंचदशी सर्व परिच्छेद

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

One comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *