सर्वांचा रंग एकच… तो म्हणजे शुभ्र !
दूधाला दुःख दिले की, दही बनते… दह्याला दुखावले की, ताक बनते… ताकाला त्रास दिला, तर लोणी बनते… लोण्याला लोळवले तर तूप बनते… दुधापेक्षा दही महाग… दह्यापेक्षा ताक महाग… ताकापेक्षा लोणी महाग… लोण्यापेक्षा तूप महाग… परंतु या सर्वांचा रंग एकच… तो म्हणजे शुभ्र!… याचाच अर्थ पुन्हा पुन्हा संकटे आणि दुःख झेलूनही जो माणूस आपला रंग बदलत नाही, अशा माणसाची समाजातील किंमत जास्त असते… दूध उपयोगी आहे, पण ते एक दिवसात नासते… दुधाचे विरजण म्हणजेच दही, दोन दिवस टिकेल…
दह्याच्या घुसळलेल्या ताकाचे टिकण्याचे दिवस तीन… ताकामधले लोणी आठवडाभर राहील… पण लोण्याचे कढवलेले तूप मात्र कधीही खराब होत नाही… आता बघा, आहे की नाही गंमत… एका दिवसातच नासण्याऱ्या दुधात कधीही न नासणारे तूप लपले आहे…! तसेच आपले मन अथांग आहे.. त्यात सकारात्मक विचार घालून नीट मंथन करा… चिंतन करा, मनन करा… आपले जीवन तावून सुलाखून त्यातूनच बाहेर पडलेले, म्हणजे कधीही न हरणारे… आपले स्वत:चे असे एक सदाबहार व्यक्तिमत्त्व असू द्या…