ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.249
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २४९
चुकलीया चुके आपादिलिया भले होय । तरी दुःख दारिद्र भोगी कवण । तरी अवघेंचि विश्व कां सुखी नव्हे रया ॥म्हणोनिया भ्रम सांडि नाथिला ।
जे जे काही करीन म्हणसी होणार ते होईल । न होणार ते नव्हेल । तू फुकाची का वाळिसी रया ॥ होणें न होणे निढळीच्या अक्षरीं । वोरबार करसील काह्या ।
पाईक वोळगे अष्टौप्रहर सेखीं दैव तंव आणील ठाया रया ॥ देखणें डोळा ऐकणे कानीं । जिव्हे कडु रस मधुर वाणी श्वासोश्वास हे जयाची करणी । अनुभवी जाणती ज्ञानी ॥
नाथिलाची धिंवसा करू पाहासी । दुराशा जवळी असतां । आकाशां झोंबतोसी । आतांचे चिंतिले आतांचि न पविजे । पुढ़ें कोण जाणें काय पावसी रया ॥
उपजत देहे मृत्यु मुखीं पडले । मी माझें करिसी किती । उठी उठी जागे आपुलिया हिता ॥बापरखुमादेविवरा विठ्ठलाची करीं भक्ति रया ॥
अर्थ:-
पूर्व जन्मांत सत्कर्म करण्यास जे चुकले त्यांना सुख प्राप्त होत नाही. आणि ज्यांनी पूर्व जन्मांत सत्कर्म संपादन केले असेल त्यांचे चांगले होते. असे जर मानले तर ईश्वर काही लोकांना दुःख दारिद्रयादि भोग का देतो.
सर्वच विश्व सुखी का ठेवीत नाही. या प्रश्नाला कांही उत्तरच नाही असे होईल शिवाय ज्या ईश्वराला आपण दयाघन असे म्हणतो. त्याच्याच ठिकाणी विषमत्व व निष्ठुरत्व असा दोष दिल्यासारखा होईल.
परंतु याचे समाधान असे आहे की तो न्यायी आहे. म्हणून तो जीवाच्या कर्मानुसार त्याला सुख दुःख देतो. म्हणुन तू भ्रम टाकून मी हे हे करीन ते होईल किंवा नाही होणार ही त्याची इच्छा असेल.
परंतु तू त्याचा अभिमान का बाळगतोस होणे किंवा न होणे हे प्रारब्धानुसार असून त्यासाठी खटाटोप का करतोस. जसे अष्टोप्रहर काम करणाऱ्या नोकरास ठरलेला पगारच मिळतो. डोळ्यांनी पहाणे,कानानी ऐकणे,
जिव्हेने गोड कडू रस चाखणे, वाणीने बोलणे एवढेच नाही तर आपले श्वासोश्वास ईश्वरच्छेने होत असतात हे ज्ञानी लोक जाणतात. दुराशा बाळगून केलेला व्यवहार म्हणजे आकाशाशी झोंबणे आहे.
म्हणून तू जे इच्छशील ते तुला मिळेल पण ते काय मिळेल ते सांगता येत नाही. उपजणारा देह मृत्युमुखी जाणार तरी माझे माझे का करतोस हे टाकून आपल्या हितासाठी जागा हो व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांची भक्ती कर असे माऊली सांगतात.