मत बनवताना मात्र घाई करू नये…
समज आणि गैरसमज
तहान भुकेने अगदी व्याकुळ झालेले आणि घामाने चिंब भिजलेले तुम्ही, बऱ्यापैकीसावली असलेलं झाड शोधून आसपास कुठे पाणी मिळतय का हे बघताय… तेवढ्यात समोरच्या बिल्डिंगमधल्या खिडकीत उभ्या असलेल्या व्यक्तीकडे तुमचं लक्ष जातं आणि ती व्यक्ती तुम्हाला पाणी हवंय का विचारते… त्या क्षणी तुम्हाला काय वाटेल?… त्या व्यक्तीबद्दल तुमचं मत काय होईल?… ती व्यक्ती मग खिडकी बंद करून तुम्हाला बिल्डिंगच्या खाली यायचा इशारा करते… तुम्ही लगबगीने तिथे जाता… पण नंतरची १५ मिनिटं तिथे कोणीही येत नाही… आता तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल काय वाटेल?… हे तुमचं दुसरं मत असणार आहे… थोड्यावेळाने ती व्यक्ती तिथे येते आणि म्हणते “सॉरी मला जरा उशीर झाला”… पण तुमची ही अवस्था बघून मी तुम्हाला नुसत्याच पाण्याऐवजी लिंबू पाणी आणलं आहे… आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल मत काय आहे?… तुम्ही एक घोट सरबत घेता आणि तुमच्या लक्षात येत की, अरे ह्यात साखर अजीबातच नाहीये… आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत होईल?…
तुमचा आंबट झालेला चेहरा पाहून ती व्यक्ती खिशातून हळूच एक साखरेचा छोटा पाऊच काढते आणि म्हणते, तुम्हाला चालत असेल, नसेल आणि किती कमी जास्त गोड आवडत असेल हा विचार करून मी मुद्दामच आधी साखर घातली नाहीये!… आता तुमचं त्या व्यक्तीबद्दल काय मत झालं आहे?… मग विचार करा अवघ्या १५ – २० मिनिटात तुम्हाला तुमची मतं, तुमचे आडाखे भरभर बदलावे लागतायत… अगदीच सामान्यातल्या सामान्य परिस्थितीत क्षणात आपले विचार, आपली मतं चुकीची ठरू शकतात… तर मग कोणाबद्दल फारशी काहीच माहिती नसताना, ती व्यक्ती पुढे कशी वागणार आहे हे माहीत नसताना, केवळ वरवर पाहून त्याबद्दल चुकीची समजूत करून घेणं, योग्य आहे का?… जर नाही असेल, तर एखाद्याबद्दल गैरसमज करून घेण्यापेक्षा त्या व्यक्तीला समजून घेणे योग्य नाही का?… असं आहे की, जोपर्यंत कोणी तुमच्या अपेक्षेप्रमाणे वागतंय तोपर्यंतच ते चांगले असतात, नाहीतर वाईट?… गैरसमज फार वाईट परिणाम करणारे ठरतात… तेव्हा “एकमेकांना समजून घ्या”… म्हणजे जीवनात समस्या निर्माण होणार नाहीत… इंटरेस्टिंग आहे की नाही?… मत बनवताना मात्र घाई करू नये…