जानवे ” यज्ञोपवीत ” कधी घालावे ?
🔸जानवे कधी घालावे ?🔸
*गुरूंच्या जवळ जाणे म्हणजे उपनयन. यालाच मुंज, व्रतबंध किंवा मौजीबंधन असेही म्हणतात. गुरूच्या जवळ राहून, ब्रह्मचारी म्हणून चांगल्या प्रकारे, एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक असते. त्या नियमांनी व व्रतांनी स्वतःला बांधून घेणे म्हणजेच व्रतबंध. ही व्रते नियमाने पाळण्यासाठी निश्चयशक्तीची जोडही त्याला द्यावी लागते. पहिला जन्म आई-बापांपासून आणि दुसरा जन्म गायत्री मंत्रापासून आणि आचार्य यांच्यामुळे प्राप्त होतो असे या संस्काराचे महत्त्व वेदांत वर्णिलेले आहे.*
हा एक हिंदू धार्मिक संस्कार आहे. परंपरेनुसार हा संस्कार ब्राह्मण, क्षत्रिय व वैश्य या वर्णांतील तीन वर्णांत जन्मलेल्या पुरुषांसाठी सांगितला आहे. या संस्कारानंतर संस्कारित व्यक्ती आपल्या पालकांपासून दूर होऊन स्वतःच्या शिक्षणावर लक्ष केंद्रित करते.
या संस्कारात यज्ञोपवित (जानवे) धारण करणे हा मुख्य विधी असतो. लहानग्या बटूला लंगोट नेसवून इंद्रियनिग्रह समजावणारा हा महत्त्वाचा संस्कार आहे. या संस्काराद्वारे उत्तमपणे ब्रह्मचर्यव्रताचे पालन कसे करावे हे शिकवले जाते.
उत्तम व निकोप शारीरिक तसेच मानसिक वाढ होण्यासाठी काही बंधने अत्यावश्यक असतात. हीच बंधने विशिष्ट संस्काराच्या माध्यमातून मनावर अधिक प्रभावीपणे ठसतात.
यज्ञोपवीत हे हिंदू धर्मातील प्रत्येक पुरुषाने धारण करणे आवश्यक आहे. हा एक संस्कार आहे. ज्ञानाचा, सभ्यतेचा, मर्यादेचा, यज्ञोपवितास, ब्रह्मसूत्र, यज्ञसूत्र, जानवे अशा अनेक संज्ञा आहेत.
९६ चौंगुळी (१ चौंगुळी-चार अंगुळे) लांबी असलेल्या सूतास कोठेही न तोडता त्रिगुणीकरण करून त्यांस गाठ मारून जानवे तयार केले जाते. यज्ञोपवितात तीन मुख्य पदर, प्रत्येक मुख्य पदराचे तीन उपपदर आणि प्रत्येक उपपदराचे तीन सूक्ष्मतंतू दिसतील.
पूर्वी यज्ञोपवित घरातील स्त्री तयार करायची. पण आता बदलत्या काळानुसार, धावपळीच्या युगात विकतचे आणावे. ब्रह्मगाठ कशी मारायची ? हे शिकून घेतल्यास वर्षातून एकदा विशेषतः श्रावणीच्या दिवशी स्वतः तयार केलेले यज्ञोपवीत घालता येते.
जानवे किती घालावीत यामागे असे सांगण्यात येते की, बटुने एक व विवाहित पुरुषाने दोन जानवे घालावीत. दर महिन्याला जानवे बदलावे.
जानव्याचे फायदे.
एकदा मुंज झाली की, गळ्यात जानवे घालण्याची परंपरा आहे. शौचालयात किंवा टॉयलेटमध्ये जाताना हेच जानवे कानाला लावायचीही रीत आहे. असे करण्याची खरे तर काय गरज आहे असा प्रश्न पडू शकतो,
पण कानाला जानवे दोन वेळा लपेटून घेतले तर कानाच्या दोन नसा ज्या पोटाच्या आतडय़ांशी संबंधित असतात त्या जागृत होऊन अपचनासारखे विकार दूर होतात हा एक शास्त्रीय फायदा आहे.