ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१३७
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३७
यमधर्म सांगे दूता । परिसावी निजकथा । जेथे रामनाम वार्ता । तया देशा नव जावें ॥ नाम महादोषां हरण । नाम पतितपावन । नाम कालिमलदहन । भवबंधन मोचक ॥ जये देशी नाम वसे । नाम श्रवणीं विश्वासे ।
गाती नाचती उल्हासे । झणीं पाहाल तयांकडे ॥ जये ग्राम हरिपूजन । जये नगर हरिकीर्तन । तेथें गेलिया बंधन । तुम्ही पावाल त्रिशुद्धी ॥ जये देशी गरुडटका । कुंचे ध्वज आणि पताकाजेथें संतजन आइका । तया
देशा नवजावें ॥ आणिक एक ऐका रे विचारु । जेथें रामनामाचा गजरु । तेथे बापरखुमादेविवरु । तयाबळे नागवती ॥
अर्थ:-
ज्या गावांत हरिकथा सुरु आहे जेथे रामनाम सुरु आहे तेथे तुम्ही जाऊ नका असे यम आपल्या यमदुतांना सांगत आहे. नाम हे महादोषांचे हरण करते, नाम पतिताला पावन करते, नाम कलिमलाचे दहन करते भवबंधन मोचक असे नाम आहे.
ज्या देशात नाम वसते. जेथे नाम ऐकले जाते. नाच गात जेथे नाम घेतले जाते तिकडे तुम्ही यमदुत पाहु ही नका. ज्या गावी हरिपूजन होते ज्या गांवी हरिकीर्तन होते तेथे तुम्ही गेलात तर तुम्हीच बंदीवान व्हाल. ज्या देशात गरुडटके, कुंचे, ध्वज व
पताका घेऊन संतजन भजनात रंगले आहेत त्या गांवाला जाऊ ही नका. आणिक एक विचार सांगतो जेथे रामनामाचा गजर होतो तिथे माझे पिता व रखुमाईचे पती स्वतः असतात तिथे तुम्ही यमदुत म्हणुन गेलात तर तुमची नागवण होईल असे माऊली अभंगात सांगतात.