ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.320
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३२०
बोधलिया अंजनासी पायाळु हा काय । निधान जवळी आहे परी शब्द नेणे । परादिकां वाचा मौन पडिलें जाण । तेथे पायाळाची खुण कोण लेखी ॥ सुखाचा संवाद आपण्यामाजी पाहीं । देहींचा देही विदेही होऊनि ठेला ॥ अविकल्पवृत्ति भानु संकल्पे हा नातळे । कर्म तया न मिळे करिजे कोणे ॥ बापरखुमादेविवरू कर्ता कर्म न पडे कांही दृष्टी । वायांचि भ्रमे सृष्टी बांधलासी रया ॥
अर्थ:-
माऊलीच्या म्हणण्याप्रमाणे भूमिगत ठेवा दिसण्यास पायाळू माणसाच्या डोळ्यांत अंजन घालावे लागते. तद्वत श्रीगुरूंनी बोधरूपी अंजन घालून हा काय तुझ्या जवळच असलेला तुझा ठेवा आहे. असा बोध केल्यानंतर त्याला आत्म्याचे दृढअपरोक्ष ज्ञान होते. परंतु तो बोधरूप आत्मा त्या शब्दाचा विषय नाही. या परा, पश्यन्ति मध्यमा व वैखरी या चारीही वाणी आत्मस्वरूपाचे विषयी मौन धारण करतात. मग पायाळाची काय कथा.परमात्मसुखाचा संवाद करून जर आपले स्वरूप जाणले तर तो याच देहात
विदेही होऊन जाईल. परमात्मा निर्विकल्प असल्यामुळे तो कोणत्याही संकल्पाचा विषय होत नाही. म्हणून कर्तेपणाने उरतच नाही. त्याच्या दृष्टीपुढे कर्ता, कर्म व कर्मफल हे कांहीच राहात नसून नैष्कर्म्य स्थिती उरते या जीवावर श्रीगुरूकृपा नसल्यामुळे भ्रमाने ते या जगतरूपी बंधात निष्कारण पडले आहेत. रखुमादेवीचे पती व माझे पिता श्रीविठ्ठल त्यांचे ज्ञान नाही हेच एक त्याचे कारण आहे. असे माऊली सांगतात.