४२ भगवान श्रीकृष्ण चरित्र
!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ४२.
सुदामाची आर्थिक स्थिती अत्यंत हालाकिची होती.कित्येकदा उपवासही घडत.मुलांना धड अंगभर कपडेही नव्हते अशातच एक दिवस त्याची पत्नी त्याला म्हणाली,श्रीकृष्ण तुमचा जिवलग सखा आहे ना?मुलांचे किती हाल होत आहेत, एकदा द्वारकेस जाऊन त्याची गाठ घेतल्यास तो दयानिधी तुमच्यासारख्या शुध्दाचरणी ब्राम्हणावर,मित्रावर नक्कीच अनुग्रह करील.तिच्या आग्रहानुसार तो जायला तयार झाला पण रिक्त हस्ते कसे जावे?म्हणुन तिने घरांत असलेले थोड्यास्या पोह्याची उपरण्यात पुरचुंडी बांधुन सुदामा द्वारकेस निघाला खरा,पण मार्गात तो अनेक तर्क करीत होता.कृष्ण आतां फार मोठा झालेला,इंद्रापेक्षाही धनवान,पुर्ण नगरी सुवर्णाची,तो आपली भेट घेईल का?फिरावे का परत?पण मन
तयार होईना.अखेर एकदाचा पोहोचला द्वारकेला.कुणीही त्याला अडविले नाही. अनेक रत्नजडीत,सुवर्णमय महालं ओलांडुन एका महालात प्रवेश केला.तिथे मंचकावर बसलेल्या श्रीकृष्णाचे लक्ष समोर गेल्यावर लगबगीने उठुन सुदामा ला दृढ अलिंगन देऊन मोठ्या आदराने व प्रेमाने मंचकावर आपल्या शेजारी बसविले.त्याची पुजा करुन कुशल क्षेम विचारल्यावर,श्रीकृष्ण म्हणाला,अरे सुदामा! एवढ्या दुरुन भेटीस आलास,कांही तरी भेट आणली असशीलच!दे बघु काय आणले ते!सुदामा संकोचुन गेला, कृष्ण म्हणाला,मित्रा!माझ्या सख्याने,भक्ताने
कांहीही,कितीही शुल्लक,फुलाची एखादी पाकळी जरी प्रेमाणे दिली तरी,त्याचे मोल त्रिभुवनापेक्षा जास्त मानतो.तेव्हा संकोच सोडुन जे कांंही आणले असेल ते आण बघु लवकर!संकोचाने सुदामाने पोह्याची पुरचुंडी बाहेर काढल्याबरोबर झपटा मारुन त्याच्या हातातुन घेऊन सोडली व मुठभर पोहे तोंडात टाकले. दुसरी मुठ घेणार तेवढ्यात, दोघां मित्राचा संवाद ऐकत उभी असलेल्या रुख्मिणीने विनयाने हसुन म्हणाली,आम्हालाही थोडा प्रसाद ग्रहण करुंं देत की!
तो ब्राम्हण म्हणुन त्याची षोडोपचारे पुजा करुन मिष्टांचे जेवण झालेवर तांबुल दिला.
रात्रभर गप्पागोष्टी झाल्यात.दुसर्या दिवशी यथोपचार आदरसत्कार झाल्या वर एकमेकांना कडकडुन मिठी मारली. सुदामा परत जायला निघाला तेव्हा त्याला पोहोचवायला श्रीकृष्ण दूरवर गप्पा मारत चालत गेला.सुदामा मार्गस्थ झाल्यावर विचार करुं लागला,आपण कांही मागीतले नाही व श्रीकृष्णानेही कांही दिले नाही.आतां घरी गेल्यावर पत्नि निश्चितच निर्भत्सना करेल,शेजारी ही हसतील.भगवान श्रीकृष्णाने आपण होऊन,परिस्थिती जाणुन कां बरं मदत केली नाही?रिक्तहस्ते कां बरं पाठवावे?जसजसे घर जवळ येऊ लागले तसे त्याचे मन निराशाने भरुन पावले मंद पडु लागली.पण जाणे तर भागच होते.
विचाराच्या नादात घराजवळ पोहोच ला तर आश्चर्यचकित,गोंधळुन क्षणभर तिथेच थबकला.त्याच्या मोडक्या तोडक्या घराचे स्वरुपच बदलुन गेले होते. सभोवती बागबगीचा असलेला राजवाडा सारखे सुंदर घर,दारात उत्तम रेशमी वस्रा लंकारांनी सुशोभित पत्नि उभी,सुंदर कपडे परीधान केलेली मुलं समोर पाहुन तो पार गोंधळुन गेला.त्याला पाहुन पत्नी म्हणाली,तुमचा मित्र,श्रीकृष्णाने,मयासुर शिल्पी व कारागीरांना पाठवुन एका दिवसांत हे सर्व घडवुन आणले.शिवाय दोन दासी व चार नोकर ठेवुन गेलेत.घर धनधान्याने,द्रव्याने भरुन गेलेय.जन्माची ददात मिटविली.सुदामा मनोमनी हेलावुन गेला.देवा,परमात्म्या! अरे तुझ्या दर्शनाने पावन झालो.धन्य झालो.आतां तुझे चिंतन,नामस्मरणा शिवाय दुसरे कांहीही करणार नाही.अरे तूं मला मोक्षाचा मार्ग दाखवलास.तेवढ्यात मुले येऊन त्याला बिलगली.आनंदाश्रु नेत्रात उभे राहिलेत. अशा तर्हेने श्रीकृष्णाने आपले मित्र कर्तव्य पार पाडले.
पांडवांनी वनवासाचे १२ वर्षे काढ ल्यावर,विराटराजाकडे वेगवेगळ्या भुमिकेत व वेशात अज्ञातवासाचे एक वर्ष संपवुन प्रगट झाल्याबरोबर कौरव प्रचंड सेनेनिशी विराटवर चालुन आले,पण पांडवांनी त्यांचा पराभव केला.विराट राजा संतुष्ट होऊन आपली कन्या उत्तरा अर्जुनाला देऊ केली,पण ती आपली शिष्या,कन्येसमान असते म्हणुन नकार दिला,पण मुलगा अभिमन्युसाठी तिला मागणी घातली.ही सारी वार्ता दुताकरवी श्रीकृृष्णाला कळल्यावर त्याला खुप आनंद झाला.अभिमन्यु श्रीकृष्णाचा अतिशय
लाडका होता.स्वतः कृष्णाने त्याला धनुर्विद्या शिकवली.धनुर्धर अर्जुनाचा पुत्र आणि धनुर्धर श्रीकृष्णाचा शिष्य..तो महाधनुर्धर बनला.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.