संत चोखामेळा म. चरित्र २५
संत चोखामेळा भाग – २५.
संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा
समोरचे दृष्य पाहुन सत्य की स्वप्न भास की आभास बघतोय असा प्रश्न चोखोबांना पडला.तेजांचा तेजेश्वर साक्षात ज्ञानसूर्य ज्ञानेश्वर माऊली,त्यांच्या समवेत त्यांचे गुरु निवृत्तीनाथ,धाकटे बंधु सोपानदेव आणि आदीशक्ती असं जीचं वर्णन केले जाते ती चिमुरडी मुक्ताई! चोखोबांचा विश्वासच बसेना.या चार भावंडांच्या रुपाने साक्षात चार वेदच आपल्या घरी चालत येत आहे.चौर्यां ऐंशी लक्ष योनीनंतर मिळालेला हा मानव जन्म या एकाच जन्मात पराकोटीची धन्यता मिळाली या भावनेने चोखोबांना भरुन आले.क्षणार्धात ते ज्ञानदेवांच्या पायाशी कोसळले.डोळ्यांतील अश्रूंनी चारही भावांचे पाय धुतले.प्रत्येकाने त्यांना धरुन उठवून अलिंगन दिले.हे विहंग दृष्य पाहण्यास पंचमहाभूतांना डोळे फुटले.क्षणभर सारी सृष्टी निःस्तब्ध झाली.अशा या भारावल्यााअवस्थेत सारी संतमंडळी चोखोबांच्या घरी आली.
हात जोडुन उभ्या असलेल्या चोखोबाला ज्ञानदेव म्हणाले,चोखोबा!या स्वच्छ सारवलेल्या जमीनीसारखेच तुमचे मन व अंतःकरनही निर्मळ आहे.या निर्मळ अंतःकरणावर विठ्ठल-विठ्ठल या दोन शब्दांची नाममुद्रा अशी कांही उमटली आहे की,अस्पृश्यतेचा पाला पाचोळा,जातीय संघर्षाचा कचरा आणी सामाजिक विषमतेचा काला याचं किती ही सारवण झालं तरी ही नाममुद्रा पुसली जाणार नाही इतकी कोरुन उमटली आहे तुमची विठ्ठलभक्ती धन्य आहे.बाळाला बाहेर बोलावण्यात आले.प्रत्यक्ष पांडुरंगाने याच्या मातेची प्रसुती केली, याच्या कर्माचा मेळ प्रत्यक्ष विठ्ठलानेचा घातला म्हणुन याचे नांव “कर्ममेळा” ठेवावे.या अत्युच्च आनंदाच्या क्षणी विलक्षण भारावल्या अवस्थेत सोयराच्या मुखातुन उत्स्फुर्त शब्द बाहेर पडले. “उपजता कर्ममेळा।वाचे विठ्ठल सावळा।
विठ्ठल नामाचा गजर।वेगे धांवे रुख्मिणीवर।
विठ्ठल रुख्मिणी।बारसे करी आनंदानी।। करी साहित्य सामुग्री।म्हणे चोखाची महारी।।”जमलेल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला.फक्त नामदेव अपवाद होते.लक्ष्मी आणि सरस्वती दोन्ही रुपे असलेली पत्नी चोखोबांना लाभली.एका अस्पृश्या च्या घरी असा देखाणा सोहळा होतांना बघुन गावकर्यांनी तोंडात बोटे घातली.जेवणाचा बेत मस्त होता.सगळ्यां ची पंगत बसली.हास्यविनोदात जेवायला सुरुवात करणार एवढ्यात,माऊलीss माऊलीss वाचवाss मला वाचवाss संकटss घोर संकटss देव कोपलायss कांही तरी करा माऊलीss असं ओरडत, किंचाळत केशवभट चोखोबाच्या घरांत शिरतां शिरतां,आपण कुठे प्रवेश करत आहो याचे भान आल्यावर उचलेले पाऊल झटक्यात मागे घेतला आणि बाहेर उभा राहुनच आरडाओरडा करायला सुरुवात केली.खोपटाच्या दारा समोरच ज्ञानेश्वर बसले होते.भक्तांना त्यांचे दर्शन घडावे या दृष्टीने नामदेवांनीच अशी व्यवस्था केली होती.
चोखोबाच्या घरांत पत्रावळीवर जेवण्यास बसलेले ज्ञानदेव केशवभटांना दिसले.स्वतःच्या डोळ्यावर विश्वासच बसेना.कांहीतरी भयंकर बघतोय अशा अविर्भावात त्याने छाती पिटायला व आक्रोश करतांना पाहून क्षणभरच ज्ञानदेवांच्या कपाळावरची शीर टरारली. पण क्षणभरच! स्नेहार्द हसर्या चेहर्याने केशवभटाकडे बघत विचारले,असे आभाळ कोसळल्यागत काय झाले?ज्ञानेशांचा अधिकारवाणी स्वर ऐकुन केशवभट सटपटत,आकांत थांबवत पुढे झुकुन हात जोडीत म्हणाला,माऊली कांहीतरी अघटीत घडणार किंवा गावावर संकट येणार आहे.हे गार्हाणे घेऊन गावातील ब्राम्हणवृदांकडे गेलो असतां त्यांनी तुमच्याकडे पाठवले.ते म्हणाले,तो ज्ञानेश्वर व त्याची भांवडे सगळीकडे पातक करीत हिंडत आहे.धर्मबाह्य वर्तन करीत आहे.गावावर त्यांच्यामुळेच संकट येऊ घातले आहे.देव कोपला,तेव्हा त्यांनाच निस्तरायला सांग असं म्हणुन धर्मपंडीतांनी मला हाकलुन दिले.
केशवभटाचे बोलणे ऐकुन सारेच अस्वस्थ झालेत.आश्वासक स्वरांत ज्ञानदेव म्हणाले,नेमके काय झाले ते निःसंकोचपणे सांग!मग त्याने पंचामृत कसे कडू लागते हे सविस्तर सांगुन म्हणाला,आपणच या संकटाचे निवारण कराल म्हणुन गार्हाणे घेऊन आलो खरा, पण या चोखाच्या घरी भोजन करणे हे धर्मबाह्य वर्तन पाहुन मी चुकीच्या जागी आलो की काय असा संदेह निर्माण झाला.तीर्थजलाविषयी बहुतेकांना माहीत होते पण त्याचा एवढा गवगवा होईल असे वाटले नव्हते.त्याने ज्ञानदेवां वर घेतलेला आक्षेप कुणालाच रुचला नाही.