संत चोखामेळा म. चरित्र ३२

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

 संत चोखामेळा  भाग  – ३२.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

नामदेव म्हणाले,आहे ती परिस्थिती स्विकारुन त्यातुनच मार्ग निघेल.कदाचित पांडुरंगाचीच इच्छा असेल.चोखोबा!चंद्रभागेच्या पलिकड च्या तीरावर जाऊन रहा.तुम्हाला जरी शक्य नसले तरी आम्ही तर भेटीला येऊ शकतो.मंदीराचा कळसही दिसेल. वास्तविक हि योजना पांडुरंगाचीच होती.चोखोबाला एकांत मिळावा,दैनंदिन कामापासुन मुक्तता मिळावी,त्यांच्या हातुन लोकोत्तर कार्य घडावे.नामदेव म्हणाले,जास्त विचार न करता चंद्रभागेच्या पलीकडच्या तीरावर संसार मांडा,त्रिक्षरी विठ्ठलांत बुडुन जा.जायच्या आदल्या दिवशी चोखोबांचे किर्तन ठेवले होते.दोन दिवसांनी आषाढी एकादशी होती.चंद्रभागेच्या तीरावर उध्वस्त मनाने भरल्या डोळ्यांनी,दुःखी मनाने चोखोबा बायकोमुलासह खोपटे बांधुन संसाराचा डाव पुनः नव्याने मांडला.

आज आषाढी एकादशी!विठोबाची षोडपचारे पुजा झाली.महा प्रसाद झाला.चोखोबा किर्तन करणार ही बातमी सगळीकडे पसरली.हा त्या नाम्या शिंप्याच्या नादी लागुन किर्तन कसा करतो,देवाचा रत्नहार चोरणारा,पंचानी तडीपार केलेला हा चोखा कसा किर्तन   करतो या कुत्सित भावनेचे व त्यांना मानणारे अशा वेगवेगळ्या भावनेने विठ्ठलमंदिरा मागचे पटांगण गर्दीने फुलुन गेले होते. चोखोबांनी भक्तीभावाने नामदेवां च्या पायावर नतमस्तक होऊन आशिर्वाद घेतला.कळसाला नमस्कार करुन अनन्य भावे विठ्ठलाला शरण जात,समोरच्या समुदायाला मस्तक झुकवुन नमस्कार केला.हातातील टाळांचा नाद करत गजराला सुरुवात केली.जयजय रामकृष्ण हरी।जयजय रामकृष्ण हरी। विठ्ठल विठ्ठल गजरी।अवघी दुमदुमली पंढरी।होतो नामाचा गजर।दिंड्या पताकांचे भार।। गजर संपला आणि चोखोबांनी भावुक,कातर पण खडा आवाज,भक्तीचा भावतरंग,भावनेनं ओथंबलेल्या स्वरांत बोलायला सुरुवात केली.मी विठ्ठलाची चाकरी करतो.गावा ची घाण उपसुन गाव स्वच्छ करतां करतां माझे मनही स्वच्छ करतो.

माझ्या या स्वच्छ मनावर पांडुरंगा ची एक अविनाशी मुद्रा उमटवली आहे. माझ्यासारख्या हीन जातीच्या अस्पृश्य व्यक्तीला भक्तीमार्गाला लावुन माझ्या अचेतन मनाला चेतना देऊन,पंचप्राण ओतुन जिवंत केले.माझे गुरु नामदेवांनी मला भक्तीमार्ग दाखवला.वारकरी संप्रदाय सांगुन त्या विठूमाऊलीला शरण जायला सांगीतले.खरंतर समाजाने नाकारलेल्या,लाथाडलेल्या जातीचा,देव भक्तीच काय पण देवाचं नांव घेण्याची सुध्दा आमची पात्रता नाही.समाजपुरुषा ने तो अधिकार आम्हाला दिला नाही.या जातीत देवाने कां जन्माला घातले? आणि घातलेच तर,विठ्ठलभक्तीचा छंद कां लावला?ज्ञानोबा माऊलीने सांगीतल्यानुसार या चराचर सृष्टीतील प्रत्येक सजीव निर्जिव,प्रत्येक व्यक्तीत, प्राण्यात आहे.जसा तो मूर्तीत आहे तसा तुमच्या माझ्यात आहे.मग तो जर एकच आहे तर,तुमचा विठ्ठल सोवळा व माझा विठ्ठल ओवळा कसा?

विठ्ठल माझे सर्वस्व आहे.त्यांच्या वर माझा दृढविश्वास आहे.ज्ञानोबा माऊलीने भागवत धर्माचा उध्दार केला. समाजाने अस्पृश्य म्हणुन वाळीत टाकलेल्या जातीत जन्मलेल्या या भक्ताला भागवतधर्माने आपलसं करुन भक्तीचा मार्ग खुला केला.संत नामदेव. गोरोबाकाका,जनाबाई या सारख्या संतांच्या संगतीत माझ्या आत्म्याला अस्तित्वाला,विचारांना आकार,शब्दांना सामर्थ्य आणि भक्तीला भावनेची जोड मिळाली.माझ्यासारख्या निरक्षराकडुन वेडेवाकड्या शब्दात होत असलेली अभंगरचना अनंतभट लिहुन घेताहेत. अशा विठुरायाचं मला वेड लागलेलं, अवघं आयुष्य त्याच्या पायी वाहलं आहे. उरलेलं आयुष्य शेवटच्या श्वासापर्यत त्याच्याच भक्तीत,नामस्मरणांत सरावं असा आशिर्वाद मायबाप हो तुम्ही द्या.

क्रमशः
संकलन व ©® मिनाक्षी देशमुख.

संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा

संत व दिव्य व्यक्तींचे प्रेरणादायी चरित्र

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading