संत चोखामेळा म. चरित्र ३१
संत चोखामेळा भाग – ३१.
संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा
चोखोबा!तुम्ही वारकरी!भागवत धर्मीय असुनसुध्दा देवाचे दर्शन घेण्याचा अधिकार नाही याचे वैश्यम्य वाटुन घेऊं नका.ज्ञानदेव तर ब्राम्हण!प्रत्यक्ष ज्ञानसूर्य असुनही ब्राम्हण समाजाने त्यांची अवहेलना केलीच ना?चोखोबा! तुम्ही आधीही आमचे होता,आताही आहांत आणि पुढेही राहणार आहात.अशी समजुत काढुन मंडळी निघुन गेली. ज्याला आपला लाडका भक्त समजतो,त्याची किती सखोल श्रध्दा आहे?जीवघेण्या प्रसंगातही त्याची भक्ती कायम राहते की,परावृत्त होतो,एवढ्या साठीच हा सगळा मायेचा बाजार त्या पांडुरंगाने मांडला होता.नामदेवांच्या विनंतीवरुन चोखोबांची मारहाण गोविंद भटाने थांबवली खरी पण त्याचे समाधान झाले नव्हते.त्यांनी हद्दपारीची शिक्षा ठोठावली, हे कळल्यावर चोखोबांना प्रचंड धक्का बसला.पंढरपूर सोडुन जायचय? विठ्ठलापासुन दूर जायचाय? ज्या विठ्ठलाचे दर्शन दूरुन कां होईना घेतां यावं म्हणुन संसाराची बसलेली घडी राहतं घर सोडुन ज्या पंढरपूरात आलो ते सोडुन जायचय?नामदेवांच्या सांगण्या नुसार ते पंढरपूर आपली कर्मभूमी आहे, जीथे आपल्या प्रतिमेला अंकुर फुटला, अंभगरचनेचं लोकोत्तर कार्य आपल्या हातुन घडविलं,जिथं विठ्ठल,सखा बनुन आपल्याला भेटला,नामदेवांसारखा गुरु, इतर संतमंडळी समान विचारांचे स्नेही भेटले,ज्ञानदेवांसारख्या ज्ञानसूर्याचे दर्शन घडले,इथल्या संतमंडळींनी माझ्या सारख्या अस्पृश्याला आपलं मानलं,ज्या विठोबा मंदिराच्या कळसाचं दर्शन घेतल्याशिवाय आपला दिवस उजाडत मावळत नाही
ते सगळं इथे सोडुन जायच?म्हणजे पंचप्राण इथं ठेवुन फक्त हे निर्जिव शरीर फक्त न्यायचय!विठुराया असच जर करायच होतं तर,त्या शिक्षेतुन वाचवलच कशाला?आज जिवंतपणी प्राण गेल्यागत अवस्था झाली तरी नसती नाही..नाही.. मी माझ्या सावळ्या विठ्ठलाला,पंढरपूरला सोडुन कुठेही जाणार नाही.चोखोबा आक्रोश करीत होते. खरं तर त्या मारहाणीच्या घटने नंतर त्यांनी स्वतःला विठ्ठलभक्तित झोकुन दिले होते.गावकीनं नेमुन दिलेली काम झाली की,विठ्ठलनामांत दंग असे. अभंगरचनेला आणखी फुलोरा आला होता.दिवसभरांत सुचलेले अभंग मुखोद्गत करुन संध्याकाळी गोरोबांच्या घरी अनंतभट लिहुन काढत असत. नामदेवांनी दिलेल्या त्रिशरी विठ्ठल नामाने त्यांना जणुं झपाटुन टाकले होते,आपल्या जीवनाचे साध्य,साधन फक्त विठ्ठल नामच आहे अशी खात्री पटली होती, चोखोबांना झालेल्या मारहाणी नंतर,,सोयराने मात्र एक केले,तिने निर्मळा व बंकाला बोलावुन घेतले आणि गणाकाकाच्या मदतीने आपल्या शेजारी खोपटे बांधवुन घेतले.गणाकाकाच्या मदतीने झाडलोटीचे काम बंकाला मिळवुन दिले.चोखोबांचे संतमेळ्यातील स्थान, प्रत्यक्ष ज्ञानदेव माऊलीशी असलेले संबंध,यामुळे भारावलेल्या बंकाला आपण अभंगरचना करावी हे त्याचे स्वप्न इथे पंढरपूरात राहयला आल्या मुळे प्रत्यक्षात उतरणार होते. सहाजिकच लाडकी बहिण व मेहुणा आल्याचा आनंद चोखोबांना मना पासुन झाला. सकाळी लवकर उठुन चोखा व बंका गावकीच्या कामावर जात.घरी आले की,शुचिर्भूत झाल्यावर,चोखोबा नामस्मरणास बसत.बंकाही सोबत असे.
बंकाची इच्छेनेनुसार चोखोबांनी त्याला आपला शिष्य केला.तो चोखोबांचे अनुकरण करत.अनेक प्रश्न विचारुन ज्ञान वृध्दींगत करुं लागला.मोडकी तोडकी अभंगरचना करुं लागला. सोयराच्या संगतीची लागन निर्मळालाही लागली.कर्ममेळाच कसा बरं कोरडा राहिल?चोखाबांचे सगळे कुटुंबच भक्ती गंगेत आणि शब्दगंधेत न्हाऊन निघाले. अस सर्व सुरळीत सुरु असतांना,साक्षात पांडुरंग पाठीशी असतांना,पंढरपूर सोडण्याची पाळी आपल्यावर यावी याचे त्यांना अतिशय दुःख झाले.अवघे आयुष्य पंढरपूरीच व्यतीत करायचे ठरवणार्या चोखोबाला हद्दपारीचा हुकुम मिळाल्यावर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली.कुठे जावे?कुणाचा सल्ला,मदत घ्यावी?गार्हाणे कुणाकडे मांडावे?कांही सुचेना.अखेर गुरु नामदेवांकडे धाव घेतली.देवा! या वैकुंठपुरीलाही आम्ही जड झालो.विठुरायालाही माझी अडचण झाली.तुम्ही माझे गुरु ना?कुठे जाऊ? कुठे राहु?ब्राम्हणांच्या दृष्टीने पाप केले,व जे केलेच नाही त्याची शिक्षा भोगली ना? विठूरायाला सोडुन कुठे जाऊ?घायाळ स्वरांत चोखोबा आक्रोश करीत होते आणि शब्दांगणिक ओरखडे मात्र नामदेवांच्या मनावर उठत होते.थांबाss चोखोबा थांबाss विलाप आवरा.. वर्णाश्रम व्यवस्थेत ढवळाढवळ करण्याचा अधिकार कोणालाच नाही मला सुध्दा….