संत चोखामेळा म. चरित्र ३३
संत चोखामेळा भाग – ३३.
संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा
आतांपर्यंत विठुरायानं माझे खुप लाड करुन दया दाखवली.पण आतां त्याच्यापासुन लांब,सोडून जाण्याची वेळ जवळ आली आहे,त्याचा विरह सोसणार नाही पण समाजाच्या नीतिनियमाचे पालन तर केलेच पाहिजे ना?समाजातील या थोर लोकांनी माझ्यातील अस्पृश्यता बघीतली,माझ्यातील भगवद् भक्ती दिसली नाही.अमंगळ देहाच्या शुध्द-अशुध्दतेवरुन परीक्षा करणारी ही श्रेष्ठ मंडळींना माझ्यातल्या आत्म्याची शुध्दता दिसली नाही.धर्मजातीचे भेद देवाने निर्माण केले नसुन मानवनिर्मित आहेत.तसं नसतं तर माझ्यासारख्या अस्पृश्याला जवळ केलं नसत.माझी फक्त या श्रेष्ठ समाजधूरीतांना एकच कळकळीची विनंती आहे,तुम्ही दिलेल्या शिक्षेचा स्विकार केला.पण विठ्ठलाच्या या राज्यात देहाच्या शुध्दतेची कसोटी लावुन आत्म्याच्या शुध्दतेवर अन्याय करुं नका.हा माझा शेवटचा जोहार! चोखोबा जोहार गात होते.ते फक्त किर्तन नव्हतं तर त्यांच्या ह्रदयातील वेदान्त बाहेर पडत होता.रात्रीचा पहिला प्रहर संपला तरी चोखोबांचे किर्तन सर्व लोकं मंत्रमुग्ध होऊन ऐकत होते.बाया बापड्या स्फुंदुन स्फुंदुन रडत होत्या. चोखोबांनी शेवटचा जोहार घातल्यावर नामदेवादी संतांच्या डोळ्यातही अश्रू उभे राहिले.नामदेव डोळे पुसत सहज समोर लक्ष गेले आणि पाहतच राहिले.भगवे पागोटे डोक्यावर घालुन वारकर्याच्या वेशात साक्षात पांंडुरंग किर्तनाला हजर होते.क्षणभर नजरानजर झाली तसं खुणेने गप्प राहण्यास सांगुन पुन्हा किर्तन ऐकु लागले.
विठोबांची शेजारती संपल्यावर गोविंदभट,शंकरभटासह मंदिराबाहेर पडले.घरी जातांना चोखोबांच्या शब्दा शब्दातुन वेदना प्रतित होत होत्या.त्यांच्या शब्दात अध्यात्माबरोबरच भावनोत्कटता ही होती.निव्वळ विनम्रता!कुठेही बंडखोरीचा आभास,तक्रारीचा सूर, अन्यायाची चीड,प्रतिकाराची भूमिका नव्हती.होता फक्त वस्तुस्थितीचा स्विकार विठ्ठलनामाचा,भक्तीचा विचारच होता.या पापभीरु निष्पाप विठ्ठलभक्ताला हद्दपार करुन आपण अन्याय तर केला नाही ना? चोखोबांना डोळे भरुन पाहत लोकं आपापल्या घरी गेलेत.रडणार्या चोखोबांना शांतवुन नामदेवादी संतांनी त्यांना चंद्रभागेच्या पैलतीरी खोपटापर्यंत पोहचवुन परतले.लोकांच्या मनांंतील त्यांना हद्दपार केल्याचे किल्मिष निघुन जावे म्हणुन नामदेवांनी किर्तनाचा प्रपंच मांडला होता.चोखोबांचे किर्तन ऐकुन लोकांच्या डोळ्यांतील अश्रू पाहुन त्यांच्या प्रांजळ भक्ती व निष्पाप श्रध्देमुळे ते लोकांच्या स्मरणात चिरकाल राहतील.
दूसरे दिवशी चोखोबांना जाग आल्यावर क्षणभर आपण कोठे आहोत हेच कळेना.भानावर येऊन मनाशी निश्चय केला,जर भगवंताचीच अशी इच्छा असेल तर,हसतमुखाने स्विकार करणे,त्याच्या आदेशाचे दृढपणे पालन करुनच आपली दिनचर्या बनवणे हेच जीविताचे लक्ष्य असेल.आतांपर्यंत पंढरपूरवासीयांनी भाबडा,सत्शील, हळवा चोखोबा पाहिला,पण आतां पैल तीरी राहणारा चोखा कांहीसा वेगळाच असेल. विठोबाचा विरह सोसून पंढरपुर पासुन दूर राहुन जगायचे कसे?या गहन प्रश्नांचे उत्तर त्यांना मिळाले.त्यांना बांधकामाचे उत्तम ज्ञान होते.इतके दिवस केवळ विठ्ठलभक्तीतच मग्न असल्यामुळे या ज्ञानाचे विस्मरण झाले होते,त्याचा आतां उपयोग होणार होता.दुसर्या दिवशीपासुन प्रसन्न मनाने एकांतवासात ले जीवन व्यतीत करायला सुरुवात केली त्यांनी वीटा तयार करायचे काम सुरु केले कामांत मग्न असतांनाही सतत तोंडात नामस्मरण असायचेच कामं आटोपल्या वर शूचिर्भूत झाल्यावर नामस्मरणांत दंग होऊन बेभानपणे नाचायचे,त्या उन्मनी अवस्थेत मग विठ्ठलाचे,पंढरपूरचे,एकांत वासाचे,समाजाच्या मानसिकतेचे, नामदेवांच्या गुरुभक्तीचे,जातीहीनतेमुळे सोसाव्या लागणार्या दुःखाचे होणार्या अत्याचाराच्या वेदनेचे वर्णन त्यांच्या रसाळ वाणीचे अभंग उमटु लागले. नामदेवांच्या सुचनेनुसार अनंतभट त्यांचा प्रत्येक शब्द टिपून घेत.चोखोबांच्या अभंगाला असं लिखित गाथेचं स्वरुप यायला लागलं.