ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.218
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१८
उपजोनी संसारी आपुला आपण वैरी । मी माझे शरीरी घेऊनि ठेला । या देहाते म्हणे मी पुत्र दारा धन माझे । परी काळाचे हे खाजें । ऐसे नेणतु गेला ॥
काम क्रोध मद मत्सराचेनि गुणें । बांधला आपण नेणे भ्रमित जैसा । मिथ्या मोह फांसा शुक नळिके जैसा । मुक्त परी अपैसा पळों नेणे ॥
जळचरू आमिष गिळी । जैसा कां लागलासे गळीं । आपआपणापें तळमळी । सुटिका नाही । तैसे आरंभी विषयसुख गोड वाटे इंद्रिया ।
फळपाकी पापिया दुःख भोगी. ॥ राखोंडी फुकितां दीप न लगे जया परी । तैसा शब्द ब्रह्मकुसरी ज्ञान न पवे । व्रत तप दान तीर्थ भजन वेचिले पोटा ।
दंभाच्या खटपटा । सिणतु गेला ॥ मृगजळाची नदी दुरूनी देखोनी धांवे । परी गंगोदक न पवे तान्हेला जैसा । । तैसे विषयसुख नव्हेचि हित ।
दुःख भोगितो बहुत । परी सावधान नव्हे ॥ परतोनी न पाहे धावता सैरा । करितो येरझारा संसारीच्या । ज्ञानदेव म्हणे बहुंता जन्माचा अभ्यासु । तरीच होय सौरसु परब्रह्मी ॥
अर्थ:-
ह्या संसारात जन्म घेऊन तुच तुझा वैरी झालास. मी म्हणजे हा देह हे मानु लागलास,देहाचे असणारे पुत्र, दारा व धन स्वतःचे मानु लागलास हे सर्व देहासकट काळाचा खाऊ आहे. हे मात्र विसरलास,
काम क्रोध मत्सराने बांधला गेलास व मी वेगळा आहे हा भ्रम पाळत बसलास. नळीवरचा पोपट स्वतःच बध्द असतो व बांधलेला समजतो तसे तुझे झाले आहे. तु मुक्त आहेस पण बध्द समजतोस. गळाला लागणारा मासा आमिषाला भुलतो व गळ गिळतो व तिकडे अडकतो. तसेच विषयांचे आहे. ते इंद्रियाना आमिष दाखवतात. व मग सुटका होत नाही
फक्त तळमळ व दुःख मिळते. राखोंडी फुंकुन अग्नी लागणार नाही तदवत शब्द ज्ञानाने ब्रह्म कळणार नाही पोटासाठी व्रत तप दान भजन व तीर्थयात्रा केल्या हा नुसता दंभ वाढवणारा शिण झाला.
मृगजळ पाहुन धाव घेणाऱ्याला गंगोदक मिळत नाही तसे विषयसुख भोगणाऱ्याचे आहे. ती ही नुसती खटाटोपच आहे. व दुःखमय आहे तरी सावध होत नाहीस. नुसता संसारासाठी जन्ममरणाच्या फेऱ्यात येरझरा करत आहेस. अरे अनेक जन्म ज्याने ब्रह्माभ्यास केला त्यालाच ह्या जन्म ब्रह्मप्राप्तीची गोडी लागते असे माऊली ज्ञानदेव सांगतात.