२७ भगवान श्रीकृष्ण चरित्र
!!! श्रीकृष्ण !!!
भाग – २७.
दोन वर्षापुर्वी रुख्मिणी स्वयंवराहुन आल्यापासुन तिच्यावर जडलेले मन सैरभैर झाले होते.आता हरण करणेचा एकच मार्ग उरला होता. हा बेत तडीस कसा न्यावा या विचारांत मग्न असतांनाच दूताने वार्ता आणली की,विदर्भपती भीष्मकान जरासंधाच्या आग्रहाने रुख्मिणीचा विवाह चेदिपती दमघोषाचा पुत्र शिशुपालाशी निश्चित झाल्याने सर्व राजे कौंडण्यपुरला त्यांच्यासाठी उभारले ल्या शिबिरात वास्तव्यास आले आहेत. तेवढ्यातच वसुदेव व अन्य मुख्य यादवां ना दमघोषाकडुन रितसर आग्रहाची कुंकुम पत्रिका आली.कारण वसुदेवाची बहिण दमघोषाला दिली होती.
हे वृत्त ऐकुन श्रीकृष्ण विस्मयित झाला.इकडे रुख्मिणीही आपल्याला न विचारतां आपल्या बंधुने शिशुपालशी विवाह निश्चित करुन सगळीकडे निमंत्रण पत्रिका पाठवल्याने ती स्तंभीत झाली. मोठी हिम्मत करुन तिने आपले मनोगत मातापित्यासमोर उघड करीत म्हणाली,मी मनोमन श्रीकृष्णालाच वरले असल्यामुळे,अन्य कुणाची भार्या होणार नाही.भीष्मकचा कल जरी कृष्णाकडे असला तरी,पुत्र रुख्मिपुढे हतबबल होता रुख्मी तिथेच होता.चिडुन म्हणाला,मुलीं ना एवढे स्वातंत्र्य दिले कुणी?श्रीकृष्ण आमचा कट्टर शत्रु असतांना आमची मुलगी त्याला द्यावी हे केवळ अशक्यच!
मातापित्याची अगतिक अवस्था, जेष्ठ बंधु विरोधात,मदत तरी कुणाची घ्यावी?आणि तिला एक विचार सुचला. आपली व्यथा व मनोगत व्यक्त करणारे अतिशय करुणामय पत्र कृष्णाला लिहुन विश्वासु सुदेव ब्राम्हणाजवळ देऊन अत्यंत गुप्तपणे त्याला कृष्णाकडे पाठविले.सुदेव ब्राम्हण द्वारकेतील राज वाड्यात पोहोचल्यावर त्याचे यथोचित आदरसत्कार,खाणेपिणे आटोपल्यावर येण्याचे प्रयोजन विचारल्यावर रुख्मिणि चे स्वहस्तांकित मुद्रेचे पत्र श्रीकृष्णाच्या हाती दिले.तिच्या पत्राला ऊत्तर देत श्रीकृष्णाने लिहिले की,प्रथेनुसार लग्ना पुर्वी कुलदेवतेच्या
दर्शनासाठी गांवाबाहेर अंबिकेच्या देवळात आलीस की,मी रथ घेऊन जवळच असेन, तू दर्शन घेऊन परतत असतांना दरवाज्यातुनच तुझे हरण करुन राक्षसविवाह करुन तुझा स्विकार करीन.लग्नमुहुर्त कधीचा आहे हे विचारु न घेतले व तात्काळ दारुकला रथ जोडा यची आज्ञा दिली.दारुकाने शैल्य,सुग्रीव, मेघपुष्प, व बलाहक हे चार पांढरेशुभ्र घोडे जुंपुन रथ कृष्णमहालाच्या दाराशी आणल्याबरोबर सुदेव ब्राम्हणासह रथारुढ झाला.
आनर्त देशाहुन(द्वारकेहुन) वायुवेगाने दूर असलेल्या विदर्भदेशाकडे मार्गस्थ होऊन एका रात्रीत इष्ट स्थळी पोहोचला.
भीष्मक आतुन नाराज होते,पण देशोदेशीचे राजेरजवाडे पाहुणे मंडळी जमा असल्यामुळे मन मारुन वरवर आनंद व्यक्त करीत सर्व विधी पार पाडीत होते.कांही वेळातच वरपक्षाकडील शाल्व,जरासंध,दंतवक्र,विदुरथ,पौंड्रीक इत्यादी राजे ससैन्य आपपाल्या शिबिरात दाखल झालेत.शिबिरांभोवती सैन्यांचा खडा पहारा ठेवण्यांत आला.
फक्त एकच रात्र ऊरलेली, रुख्मिणीच्या जिवाची घालमेल होत होती.तर्कवितर्क करीत श्रीकृष्णाच्या ठायी तिची तंद्री लागली.मन त्याचा धावा जप करुं लागले.तेवढ्यात सुदेव ब्राम्हणाचा चिरपरिचित आवाज कानावर पडला. त्याचा प्रसन्न चेहरा पाहुन श्रीकृष्णाचे आगमन झाल्याचे ती उमजली.इतक्या गुप्त रितीने काम केल्याबद्दल कृतज्ञ होऊन अत्यंत आदराने त्याच्या पायावर मस्तक ठेवले.अशिर्वाद देऊन ब्राम्हण निघुन गेला. आणि भिष्मकाने प्रवेश करुन श्रीकृष्ण आल्याचे वर्तमान तिच्या कानी घातल्यावर,तीने अश्चर्य व्यक्त झाल्याचे दाखवले.ते म्हणाले,संघर्ष नको म्हणुन मनात नसतांनाही रुख्मिच्या मना प्रमाणे वागणे भाग आहे.पण आता श्रीकृष्ण आल्याने निश्चिंत झालोय. त्याच्याच स्वागतासाठी निघालोय!
भीष्मक,मधुपर्क,वस्रे,आभुषणे घेऊन श्रीकृष्णाच्या स्वागतास जाऊन त्याची यथायोग्य पुजन करुन,तयार असलेल्या वाड्यात उतरवुन घेतले. रुख्मिणी हरणासाठी श्रीकृष्ण एकटाच गेल्याचे वृत्त बलरामाला समजताच,जरी कृष्ण समर्थ असला तरी लढाई जुंपली तर,आपल्या पक्षाचा कमीपणा दिसु नये म्हणुन बलाढ्य यादवसेना घेऊन,कृष्णाचे पाठोपाठ त्वरेने निघुन वेळेवर पोहचला. भीष्मकने श्रीकृष्णासाठी श्रृंगारलेल्या वाड्यात त्याचेही उत्कृष्ट स्वागत केले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.