ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१३४
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३४
भक्तीचें तें ज्ञान वाचे नारायण । दया ते संपूर्ण सर्वाभूती ॥ ज्ञान नारायण ध्यान नारायण । वाचे नारायण सर्वकाळ ॥ संसारग्रामी नाम हाचि सांठा । पावाल वैकुंठानामें एकें ॥
गोविंद गोपाळ वाचेशी निखळ । पद पावाल अढळ अच्युताचें ॥ नामेंचि तरले शुकादिक दादुले । जडजीव उद्धरले कलीयुगीं ॥ स्मरण करितां वाल्मीक वैखरी ।
वारूळा भीतरी रामराम ॥ सर्वांमाजी श्रेष्ठ पुण्य भू- वैकुंठ । विठ्ठल मूळपीठ जगदोद्धर ॥ निवृत्ति निरोपण ज्ञानदेवा ध्यान । सर्वत्र नारायण एकरूप ॥
अर्थ:-
सर्वाभूती दया ठेऊन नारायण नाम वाचेने उच्चारले तर भक्तीचे ज्ञान होते. जो सतत नारायणनाम मुखाने उच्चारतो त्याचे ज्ञान व ध्यान नारायण होते. संसाराच्या गांवात नाम हाच ठेवा असुन त्यामुळे वैकुंठ प्राप्त होते.
गोविंद गोपाळ ही नामे वाचेला सुलभ असुन त्यामुळे अच्युताच्या अढळ स्थानापर्यंत पोहचता येते. ह्याच नामामुळे शुकादिकांसारखे महात्मे तरले त्यामुळे अनेक जडजींवांचा कलीयुगात उध्दार झाला.
त्याच नामाचे स्मरण करता करता वाल्मिकी भोवती वारुळ तयार झाले तरी आतुन तो रामनामाचे उच्चारण करत राहिला. तेच नाम सर्वामाजी श्रेष्ट असलेले भु वैकुंठ म्हणजे
पंढरीत विठ्ठल मुळपीठ स्वरुपात जगदोध्दारासाठी उभे आहे. असे सर्वत्र एकरुप असलेल्या नारायणनामाचे निरुपण श्रीगुरु निवृत्तीनी केले असे माऊली सांगतात.