ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.226

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २२६

स्वप्नींचेनी धने भरोनीयां लाहे । भला वेव्हार करू पाहसी । मुद्दलची नाहीं तेथे कळांतर कैचें । धरणे अधरणे घेतासी ।

लटिकिया साठी संसार दवडोनी । ठकुनी ठकलासी रया ॥ कवण नागवितो कां नागवसी । वेडावलेपणे ठकसी तुूंचि ।

चोरोनी तुझें त्वांचि नेले । आता गाहाणे कवणा देसी रया ॥ पृथ्वी, आप, तेज, वायु, आकाश । हे सहज परम गुण अंश अंशा आले ।

येणेंचि कष्टे व्यवहार करिता । कोठे काय सांठविलें । विचारुनि पाहें तुझें त्वांचि नेले । आतां तुजमाजी हरपलें रया ॥ पुत्र कलत्र संपती देखोनी संतोष मानिसी ।

घडी येकामाजी नासोनी । जाईल जैसे का अभ्र आकाशीं । बापरखुमादेविवरु विठ्ठलुचि हृदयीं । असतां कां नाडलासी रया ॥

अर्थ:-

स्वप्नातील धनाने ऐश्वर्य संपन्न होऊन सावकारीचा व्यवहार करू पाहतोस. पण मूळ स्वप्नातील धनच खरे नाही. तिथे व्याज कसले. आपले पैसे प्राप्त होण्याकरिता एखाद्यांच्या ठिकाणी धरणे घेणे किंवा न घेणे.

मूळात खोटा असलेल्या व्यवहाराकरिता आयुष्य का नासवतोस.आणि त्या व्यवहाराचे ठिकाणी सत्यत्व मानून फसवीत आहेस. तू दुस-या कोणाला नागवितो आहेस की स्वतःच नागवला जात आहेस.

याचा काही विचार न करता मूर्खपणाने तूच फसतो आहेस. आत्मस्वरुपाला चोरून म्हणजे विसरुन आपले ऐश्वर्य तूंच नष्ट केलेस. आता हे गाऱ्हाणे कोणांस सांगतोस.

पंचमहाभूताच्या परस्पर ऐक्याने हा झालेला स्थूल देह त्याच्या ठिकाणी मीपणाचा अभिमान धारण करून आजपर्यंत कष्ट करून काय साठा केलास याचा विचार तर करून पाहा.

तुझे आत्मस्वरुप अविवेकाने तुंच नाहीसे केलेस. आता हे हारपलेले आत्मस्वरुप तू आपले ठिकाणीच पाहा.त्या आत्मस्वरुपाला पाहाता म्हणजे त्याचा विचार न करता बायको,

मुलगा किंवा ऐश्वर्य हे पाहून तुला संतोष वाटतो खरा परंतु आकाशातील अभ्र क्षणभर राहात नाही. ते क्षणात नष्ट होणार आहे. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल हृदयात असता कसा नाडला जाशिल असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *