ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.197
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग १९७
येणेंचि आश्रमें नित्य नैमित्तीक कर्मे । वर्णाश्रमधर्म त्यागुन कोठें जासी । म्हणोनि एक विचारी बापा । जेणे सार्थक होय संसारासी । विकल्प नको धरुं शुध्द करी । अंतर धरुनी राहें या सगुणाशी रया ॥ आवडी धरूनी गोडी घेई कां ध्यानी । परतोन मग येणें नाही तुज ॥
सांडी सांडी त्याग नास्तिकाचे । मत नलगें करणे अटणें । नानाविधी वाउगे जड कां सिणवणे । केवीं मन होय शुद्धी । एकलेंचि मन करूनी स्वाधीन । सगुणींचि काय सिद्धी न लभे रया । म्हणोनि एकाकार वृत्ति सगुणीं बैसली । प्रीतिंचि निर्गुणींचि आर्ति जाण संपदा ।
त्याची सांडी मांडी न करी निरूतें चित्तीधरी । स्वस्वरूपीं असे सदा । बापरखुमादेविवरू विठ्ठलु चिंतितां । सुख सगुणींचि जोडे आनंदु रया ॥
अर्थ:-
तु संन्यासाच्या भानगडीत न पडता वर्णाश्रमामुळे जी नित्यनैमितिक कर्मे आहेत ती करत राहिलास तर संसारातील सार्थकता मिळेल. वर्णाश्रम कर्मे टाकुन तु कोठे जाशिल. असा विकल्प मनात न आणता शुध्द अंतकरणाने त्या सगुणरुपाशी रत हो. हीच मनात आवडी धरुन तसे केलेस तर पुन्हा जन्मयोनीला येणार नाहीस.नुसता बाह्य त्याग यात संसाराची कतार्थता आहे हे नास्तिकाचे मत आहे. ते टाकुन दे. हरिप्राप्ती साठी कोठे ही न जाता,
नानाविधीत शिणुन न जाता. त्या सगुणाशी प्रेम ठेवलेस तर सिध्दी काय मिळणार नाहीत का? सगुणाच्या ठिकाणी एकाकार वृत्ती ठेवल्याने निर्गुणाचीच संपदा प्राप्त होते. ह्या साठी कोणती ही सांडमांड न करता, वेगळे काही न करता शुध्द चित्ताने स्वस्वरुपाशी प्रेम धरुन रहा. माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केले तर सगुणातच सुख मिळुन आनंद उपभोगता येईल असे माऊली सांगतात.