ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.९४
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-३ रे, नामसंकीर्तन महात्म्य अभंग ९४
पदपदार्थ संपन्नता । व्यर्थ टवाळी कां सांगता । हरीनामी नित्य अनुसरता । हें सार सर्वार्थी ॥ हरिनाम सर्व पंथी । पाहावे न लागे ये अर्थी । जे अनुसरले ते कृतार्थी । भवपंथा मुकले ॥ कुळ तरले तयांचे ।
जींही स्मरण केलें नामाचे । भय नाहीं त्या यमाचे । सर्व ग्रंथी बोलीयेलें ॥ नलगे धन नलगे मोल । न लगती कष्ट बहुसाल । कीर्तन करितां काळ वेळ । नाहीं नाहीं सर्वथा ॥ हरि सर्व काळ अविकळ ।
स्मरे तो योगिया धन्य केवळ । त्याचेनि दर्शन सर्वकाळ । सुफळ संसार होतसे ॥ ज्ञानदेवीं जप केला । मन मुरडुनी हरि ध्याईला । तेणें सर्वांगी निवाला । हरिच जाला निजांगे ॥
अर्थ:-
वेदांची पद संपन्न आहेत पण व्यर्थ त्यांची टवाळी का सांगायची हरिनामाला नित्य अनुसरले तर त्याचे हे सार सर्वार्थाने आहे. वैदिक धर्माच्या अनेक पंथात हरिनामाचे महत्व सांगतात व त्यामुळे एकच शास्त्रविचार आहे तो म्हणजे हरिनाम व ज्यांनी तो विचार अनुसरला
ते कृतार्थ झाले व भवपंथात अडकले नाहीत.ज्यांनी हरिनामाचे स्मरण केले त्यांना यमाचे भय राहिले नाही त्यांची कोटीकुळे तरली असे ग्रंथ उच्चारवाने सांगतात.हरिकीर्तनाला ना धन लागते ना मोल द्यावे लागते व कष्ट ही करावे लागत नाहीत. त्या हरिनामात कोणतेही व्यंग
नाही व जे योगी ते घेतात ते धन्य होतात. त्यांचा संसार सुफळ होऊन त्यांना नित्यदर्शन प्राप्त होते.ज्याने मनाला मुरड घालुन हा जप केला तो सर्वांगाने निवाला नव्हे नव्हे हरिरुप झाला असे माऊली सांगतात.