देवघरातील शंख महात्म्य व पूजा कशी करावी

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

शंख

शंखाबद्दल आतापर्यंत तुम्ही बरेच काही ऐकले असेल. प्रत्येक शुभ कार्यांमध्ये याचा वापर केला जातो कारण याला फार शुभ मानले गेले आहे. घरात पुजा असो किंवा लग्न प्रत्येक वेळेस शंखाचा वापर केला जातो.

शंख हा समुद्रात सापडतो. शंख विजय, समृद्धी, आनंद, शांती, प्रसिद्धी, कीर्ति आणि लक्ष्मी यांचे प्रतीक मानले जाते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे शंख हे नादांचे प्रतीक आहे. शंख भगवान विष्णूला समर्पित होता म्हणूनच लक्ष्मी-विष्णू (श्रीलक्ष्मी नारायण) पूजेमध्ये मूलत: शंख वाजविला ​​जातो. शंख असतो तेथे विष्णू आणि देवी लक्ष्मीचे वास्तव्य असते, अशी हिंदूंची धारणा आहे.

भगवान महाविष्णूंच्या हातातील अनेक आयुधांमध्ये शंखाला स्थान मिळाले आहे. त्यामुळे त्याचे महत्त्व वाढले आणि साहजिकच त्याचा पूजेतला मानही वाढला. शंख रणवाद्य म्हणून गौरवले गेले. मंगलकार्यातही शंखध्वनी केल्याशिवाय कार्य पूर्ण होत नाही.

शंखाचे भाग –
शंखाचे एकूण तीन भाग पडतात –

शंखाची पन्हळ
अग्र
– ज्या ठिकाणाहून शंखात घातलेले पाणी पडते ते अग्र

मागची बाजू – ज्यावर वलये असतात ती मागची बाजू.

शंखाचे प्रकार –

दक्षिणावर्ती (उजवा) शंख –
ज्या शंखाचा पृष्ठभाग स्वत:कडे करून देवाकडे त्याचे अग्र केले म्हणजे त्याच्या पन्हाळीची पोकळी उजव्या बाजूला येते असा शंख म्हणजे दक्षिणावर्ती (उजवा) शंख. दक्षिणावर्ती शंख दुर्मिळ असल्याने त्याच्या किमती अधिक असतात. शंखाची योग्य ती परीक्षा करूनच तो खरेदी करावा. दक्षिणावर्ती शंखाचे पुन्हा वजन व आकारावरून नर व मादी असे भेद होतात.

अथर्ववेदामध्ये सात मंत्रांनी युक्त अशा ‘शंखमणिसूक्ता’मध्ये दक्षिणावर्ती शंखाची महती वर्णन केली आहे. दक्षिणावर्ती शंख अंतरीक्ष वायू, ज्योतिमंडल आणि सुवर्णाने युक्त आहे.

वामावर्ती (डावा) शंख –
ज्या शंखाच्या पन्हाळीची पोकळी डाव्या बाजूला येते असा शंख म्हणजे वामावर्ती (डावा) शंख.


शंखांच्या जाती –

शंखाच्यादेखील ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य व शूद्र अशा चार जाती आहेत.शंखांच्या जातिभेदाप्रमाणेच त्यांचे गणेश शंख, विष्णू शंख, देवी शंख व मोती शंख असेही भेद पडतात.


धर्मशास्त्रातील शंखाचे महत्त्व –

देवळात देवमूर्तीच्या डाव्या हाताला शंख ठेवतात. देवतापूजनाचे आधी शंखाचीच पूजा असते. हिंदू धर्माचे एक प्रतीक म्हणजेच, देवाजवळचा शंख आहे. सर्व मंगलकार्यात शंखनाद करणे पवित्र मानले जाते. युद्धारंभी रणवाद्य म्हणूनही मोठमोठ्याने शंखाचा आवाज काढतात. भगवद्गीतेत याचा उल्लेख आला आहे. लहान मुलाची प्रकृति सुधारण्यासाठी, त्याचे आयुष्य वाढण्यासाठी पूर्वी मुलांच्या दंडावर शंख, मंत्रसंस्कार करून बांधत असत.

शंखाचे पौराणिक व ऐतिहासिक महत्त्व –
महाभारतात युद्धाचेवेळी भगवान श्री कृष्णाजवळ पांचजन्य शंख होता. तर अर्जुनाजवळ देवदत्त आणि भीमाजवळ पौंड्रक नावाचा मोठा असा शंख होता. युधिष्ठिराजवळ अनंतविजय, नकुलकडे सुघोष आणि सहदेवाकडे मणिपुष्पक शंख होता. यापैकी एका शंखाचा आवाज करुन युद्धाची सुरुवात केली जायची.

देवीला ‘शंखिनी’ म्हणतात –
देवीला शंख आवडतो, म्हणून तिनेही आपल्या अन्य आयुधांबरोबर शंखही धारण केला आहे. देवीने अनेक युद्धांमध्ये दैत्यासूरांचा वध करताना शंख फुंकून युद्धाची सुरुवात केली, म्हणून तिला ‘शंखिनी’ म्हणतात.

शंख कथा –
समुद्र मंथनातून पांचजन्य नावाचा शुभ्र शंखाची उत्त्पन झाले, विष्णू पुराणानुसार, माता लक्ष्मी ही समुद्रराजाची कन्या असून ‘शंख’तिचा सहोदर भाऊ होय. म्हणूनच असेही मानले जाते की जेथे शंख आहे तेथे लक्ष्मीचे निवासस्थान आहे. विष्णूने आपल्या हातात शंख धारण केले.

ब्रह्मवैवर्त पुराणात शंखाच्या उत्पत्तीविषयी कथा –
शंखासुर नावाचा सागरापासून उत्पन्न झालेला आणि सदैव सागरातच वास्तव्य करणारा बलाढ्य राक्षस होता. या राक्षसाने जबरदस्तीने वेदहरण केले व तो सागराच्या तळाशी दडी मारून बसला. मग देवदेवता, ऋषीमुनींनी क्षीरसागरामध्ये योगनिद्रेत असलेल्या भगवान विष्णूंना जागृत केले आणि शंखासुरास धडा शिकवण्याकरिता सांगितले. भगवान विष्णूंनी मत्स्यरूप धारण करून शंखासुराचा ठावठिकाणा शोधून काढला व त्याचा शिरच्छेद करणार इतक्यात शंखासुर म्हणाला की, भगवान आपल्या हातून मज मरण यावे याकरिताच मी वेद पळविले.

आपण माझा वध अवश्य करावा; परंतु माझी एक इच्छा अशी की माझे कलेवर तुम्ही नेहमी आपल्या डाव्या हातात धारण करावे तसेच माझ्या कलेवराच्या स्पर्शाच्या जलाने आपणांस स्नान केल्याखेरीज आपली पूजा पूर्ण होणार नाही असा मला वर द्यावा.’’ भगवान विष्णूंनी ‘तथास्तु’ म्हटले आणि शंखासुराचा वध केला. त्या दिवसापासून विष्णूने हातात शंखास धारण केले.

महत्त्व आणि उपयुक्तता –
शंखध्वनींमुळे उत्पन्न होणार्‍या कंपनांमुळे सभोवतालचे वातावरण शुद्ध व पवित्र होते. तसेच तो फुंकणार्‍या व्यक्तीची फुप्फुसाची क्षमता वाढून तेज व ओजवृद्धी होते.

शंखोदकाने अनेक व्याधी नाहीशा होतात, आयुर्वेदात अनेक व्याधींवर शंखभस्माचा उपयोग सांगितला आहे. शंखात शुद्ध, पवित्र पाणी भरून व्यक्ती, वस्तूवर शिंपडल्याने दुर्भाग्य, अभिशाप, तंत्र-मंत्र इत्यादींचा प्रभाव समाप्त होतो. कोणत्याही प्रकारचे वाईट तांत्रिक प्रयोग या शंखाच्या प्रभावासमोर निष्फळ होतात.

दक्षिणावर्ती शंख धान्य भांडारमध्ये ठेवल्याने धान्य, धन भांडारमध्ये ठेवल्याने धन, वस्त्र भांडारमध्ये ठेवल्याने वस्त्रांची कमतरता भासत नाही. शयन कक्षामध्ये (झोपण्याच्या खोलीत) ठेवल्यास शांततेचा अनुभव होतो.

फेंगशुई शास्त्रानुसार, शंख ठेवणे अतिशय शुभ मानले गेले आहे. आपल्या कार्यक्षेत्रात सुख-समृद्धी आणण्यासाठी शंख ठेवणे, फायद्याचे असते, असे शास्त्र सांगते. एवढेच नव्हे तर भगवान गौतम बुद्धांच्या पायावर असलेल्या ८ शुभ चिन्हांपैकी एक शंख असल्याचे सांगण्यात येते.

वास्तुशास्त्रही शंखाचे महत्त्व अधोरेखित करते. एखाद्या व्यक्तीला प्रसिद्धी हवी असल्यास दक्षिण दिशेकडे शंख ठेवावा. घरात कोणत्याही ठिकाणी शंख ठेवणे चुकीचे आहे. लिव्हिंग रुममधील दक्षिण दिशेला शंख ठेवावा. तसेच शिक्षण क्षेत्रात अपयश येत असल्यास अभ्यासिकेच्या उत्तर-पूर्व दिशेला शंख ठेवावा. असे केल्यास परीक्षेत आणि स्पर्धांमध्ये यश मिळू शकते, असे शास्त्र सांगते.

historylovers #history #culturelovers #historical

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *