संत चोखामेळा म. चरित्र २९
संत चोखामेळा भाग – २९.
संत चोखामेळा चरित्र सर्व भाग पहा
अखेर मारणार्यांचे हात थकले. चोखोबांच्या डोक्याला खोक पडुन रक्त वाहत होते.सर्वांगावर लाठ्या काठ्यांचे वळ उमटले होते.मनसोक्त मारहान झाल्यावर गोविदभट म्हणाले,रत्नहार चोरला,स्पर्श करुन देवाला बाटवले, गळ्यात हार घालण्याचा ऊध्दटपणा केला.पांडुरंगाच्या भक्तीचं संतपणाचं हे ढोंग,इमानीपणाचा कांगावा सगळंसगळं पंचासमोर येईलच. पंचाची बैठक बसली. शंभराहुन अधिक लोकांनी चोखांच्या गळ्यात हार बघीतला होता. हारचोरीच्या आरोपास एवढा पुरावा पुरेसा होता.पंचानी शिक्षा सुनावली,ती ऐकुन भल्या भल्याच्या रक्ताचं पाणी पाणी झालं.चंद्रभागेच्या वाळवंटात चोखोबाला बैलाच्या पायी जुंपुन वाळवंटातुन फरफटत न्यावे.. चोखोबांना कळेना ,त्यांच्याकडुन कधी, केव्हा काय चुक झाली?स्वप्नात देवाने दिलेला रत्नहार प्रत्यक्षात आलाच कसा? निरपराध असल्याचा कोणताही पुरावा ते देऊ शकत नव्हते.मुकपणे शिक्षा भोगणे क्रमप्राप्तच होतं. शिक्षेची बातमी वार्या सारखी गावात पसरल्यामुळे कुणी हळहळत,तर कुणी आनंदाने वाळवटा कडे धाव घेतली.
नामदेवादी संतांच्या कानावर ही गोष्ट गेल्यावर त्यांनाही आश्चर्याचा धक्का बसला.चोखोबा आणि चोरी? अशक्य. यातुन निरपराध व प्रामाणिक चोखोबाला वाचवायलाच हवे.नामदेव,गोरोबा, जना बाई आदी मंडळी वाळवंटाकडे धावली. चोखोबाला काढण्या घालुन उभे केले होते.पायाशी सोयरा केविलवाणी रडत होती.नामदेवादी मंडळी तिथे पोहचुन पंचमंडळींना नमस्कार करुन म्हणाले, चोखोबासारखा श्रेष्ठ भगवद्भक्त,तेही देवाच्या रत्नहाराची चोरी,कदापी शक्य नाही.कुठेतरी कांहीतरी गैरसमज झाला असावा.त्यांना स्वतःचं मत मांडायची एक संधी द्यावी.पंचप्रमुख म्हणाले,ही धर्मकार्याची बाब,वर्णाश्रमाचा मामला आहे.धर्मग्रंथानुसारच सजा सुनावली आहे.गावाने बहिष्कार टाकु नये व अपमान होऊ नये असे वाटत असेल तर यात कुणीही हस्तक्षेप करुं नये.गोरोबाने ही विनंती केली पण व्यर्थ! मोठ्या निष्ठेने गावकीची कामे करणारा,कुणाच्याही अध्यामधात नसणारा,कामं आटोपली की,विठ्ठलाची भक्ती करत अभंगरचना करणारा सरळ मनाचा प्रांजळ चोखोबा..त्यांच्यावर नसते कुभांड आले होते.त्याकरतां दिलेली सजा तितकीच अमानवी,पशुवत क्रूर होती.नामदेवांची रदबदलीही वाया गेली.सोयरा धाय मोकलुन रडतां रडतां दीनवाने पांडुरंगाचा धावा करत होती.तो येत नाहीसा पाहुन आपल्या अभंगातुन साद घालत….
” देखोनी आंधळे का बा जन होती।न कळे या गती मज लागी।
एकाते मरता आपणचि देखति।तयासी रडती आपणची।।
हा कैसा नवळाव न कळे यांचा भाव।कोण घाव डाव आम्हालागी ।।
यचिये संगती अपायची मोठा।दुःखाचा शेलवटा भाग आला।।
आता पुरे हरी आता पुरे हरी।सोडवी निर्धारी यातोनिया।।
बहुतची खंती करितसे मन।दाखवा चरण मज लागी।।
गहिवर नावरे उदास अंतरी।म्हणतसे महारी चोखियाची ।।”
असे पुन्हा पुन्हा विठ्ठलाला आळवत जमीनीवर अंग टाकुन छाती पिटत आक्रोश करत होती.पण कुणालाही पाझर फुटला नाही.अखेर क्लांत होऊन १०-१२ वर्षाच्या कर्ममेळाला जवळ घेऊन उदासवाणी,पुढे काय होईल या शंकेने धडधडत्या काळजाने,थरथरत्या शरीराने, उध्वस्त मनाने बसुन राहिली.या सर्व गदारोळापासुन अलिप्त चोखा मात्र स्तब्ध,निश्चल,ठामपणे,निर्धारिने उभे होते मनांत मात्र द्वंद…सत्याचं-असत्याशी, अस्तित्वाचं-अचेतनाशी,श्रध्देचं-अधिकाराशी,विश्वासाच-सत्येशी,धर्माचं-अधर्माशी,प्रांजलपणाचं-अत्याचाराशी!कसोटी होती चोखोबाची पांडुरंगावरचा विश्वास, अस्तित्व व श्रध्देवरची!”भक्ताचा पाठीराखा” या नामोनिधानाबद्दल त्यांना वाटत असलेली खात्री,श्रध्दा,भक्ती आणि विश्वास या अधिष्ठानावर चोखोबा शांत उभे होते. शिक्षेची तयारी झाली.काढण्या बांधलेल्या अवस्थेत फळीपर्यत नेत असतांना चोखोबा अगदी शांत होते. शिक्षेस न जातां विठ्ठलाच्या मंदीरांत जात आहोत असे भाव चेहर्यावर होते.ते स्वतःच फळीजवळ येऊन उभे राहिले. मंदिराच्या शिखराला,सगळ्या जनसमुदा ला,संतमंडळींना नमस्कार व पंच व ब्राम्हणादी मंडळींना जोहार घातला.एक कटाक्ष विलाप करणार्या सोयराकडे टाकला.कदाचित ही नजरभेट शेवटचीच पांडुरंगावर त्यांचा दृढ विश्वास होता. अत्यंत शांतपणे धीमी पावले टाकत बैला जवळ येउन मायेने वशिंडावरुन हात फिरवुन शांतपणे फळीवर जाऊन झोपले