ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.269
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २६९
अनुभव रहणीवीण कायसें श्रवण । गर्भ अंधु नेणे रत्नकिरण ॥ गेले मेले काय सांगाल गोष्टी । स्वये आत्मज्ञानी घाला परमात्मी मिठी ॥ जीवा जीवन अंतरी ।
बाहेजु निर्धारीं । सर्व निरंतरी पूर्णभरित ॥ बाहेजु प्रवृत्ति अंतरी निवृत्ति । उभयतां गति एक आहे ॥ प्रसुतिकाळीं व्याली । वांझ अपत्य जवळी ।
वांझ क्रीडा विनोदें रळी खेळतसे ॥ अनुभव रहणीवीण । जाला भगवा दिगांबरू । जैसा नग्नवरू हिंडे हाटाबिदीं ॥ तीर्थक्षेत्रव्रतदान । यागादिक साधन ।
अनुभव रहाणीविण । शून्य धिक् गेलें ॥ सगुण निर्गुण पाही । दोहींमाजी होऊनि राहीं । तरी निवसी ठाईच ठायी अरे जना । सगुण निर्गुण पाहीं जयापासूनी ।
ते राहे अनुभउनी येर वाउगेचि रया ॥बापरखुमादेविवरू विठ्ठलेंसी एकांतु । द्वैताद्वैताची मातु उरेचिना । । १० । ।
अर्थ:-
अनुभवावांचून श्रवणाचा काय उपयोग,गर्भातील बालकाला रत्न दिसणार नाही. तसेच बहिर्मुख श्रोत्याला श्रवणाचे रहस्य कळणार नाही. गेलेल्यांच्या पुराणातल्या गोष्टी कशाला सांगत बसता.
आत्मज्ञान संपादन करुन परमात्म्याला मिठी मारा. सर्व जीवांचे जीवन निरंतर परिपूर्ण अंतर्बाहा व्यापुन असा एक परमात्माच आहे. स्थूल दृष्टीने प्रवृत्ति व अंतरदृष्टीने निवृत्ति ही परमात्मस्वरूपी एकरूप होऊन जातात.
मायिक पदार्थाच्या सर्व कथा व्यर्थ आहेत माया ही वांझ आहे, मिथ्या जगत हे तिचे पोर आहे. ते तिच्या जवळच माया त्या जगतरूपीपोराबरोबर क्रिडा करित आहे अशी ती माया तिचे मिथ्या जगतरुपी पोराना त्यांना मिथ्यात्वाने
ओळखल्याशिवाय नुसती अंगावर भगवी वस्त्रे घेणे व दिगंबर म्हणून नग्न होऊन नवऱ्यामुलाप्रमाणे बाजारातून अथवा ओढ्यानाल्याकाठी हिंडणे व्यर्थ आहे. तसेच तीर्थ, क्षेत्र, व्रत, दान, यज्ञादिक साधने कितीही जरी केली.
तरी अनुभवाची खुण कळल्यावाचून सर्व व्यर्थ आहे. त्या साधनाचा धिक्कार असो. सगुण किंवा निर्गुण ह्या दोन परमात्मस्वरूपापैकी एका जरी स्वरूपाचा विचार केलास तरी भगवत् स्वरूप होऊन समाधानाला प्राप्त होशील.
सगुण निर्गुण हे भेद ज्याच्या आश्रयाला राहातात त्याचा अनुभव घ्या इतर कांही करणे सर्व फुकट आहे. माझे पिता व रखुमादेवीचे पती श्रीविठ्ठल यांच्याशी एकरूप झालास तर द्वैताद्वैताची गोष्टच उरणार नाही असे माऊली सांगतात.