ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.242
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २४२
सुंदर राजसु सकुमारु । बिदुले न साहे ज्यासी । स्वबुद्धी अळंकारला पराग्रासूनी । ठेला मौन्य पडले या शब्दासी ॥ पाहो जाय तंव पाहणे ग्रासी ।
नवलावो काय या सुखासी । न अवलोकवे मना अवधारुनी । ध्यानी आता न विसंबे तझिया पायासी रया ॥ हेम अळंकारु भेदु हा काय । सगुण निर्गुणीं आहे तैसे गुण ।
गुळाचेनि अंगे गोडीपण पाहता । न निवडे आतां मी काय करु ॥ म्हणोनी मन समावेश करणे । तुझे तुजमाजी घालणें । येणे तुज अळंकारणे मध्यमणी ॥
मन चतुष्ट्य पदीं पदक । तेचि बैसका चोखट । मन मनीं रुतलें ठेलें । आवडीचेनि अभ्यासे कोंदलिया दाही दिशा । म्हणोनि प्रीति धरी सगुणी रया ॥
उभारलेनि सिडे जेथे स्वराज्य तारुं न बुडे । ऐसे घडे वाडेंकोडें तेंचि कीजे ॥ तेथे मनासी कवणं स्वप्नीं राज्य रक्षी । आपुले पारिखे नेणिजे म्हणोनिया आतां ॥ बापरखुमादेविवरा विठ्ठला शरण जाईजे रया ॥
अर्थ:-
संदर, राजस, सुकुमार बिंदुले म्हणजे सगुण इत्यादि भाव ज्याच्या ठिकाणी सहन होत नाहीत. तो परमात्मा स्वरुप ज्ञानाने अलंकृत असता परावाणीलाही ग्रासुन टाकतो त्याचे वर्णन श्रुति करू गेली असता तिला मौन धरावे लागते.
त्याला पाहण्यास जो जातो तो त्याच्याहून वेगळा राहात नाही. त्या परमात्म स्वरुपाचा काय प्रकार सांगावा. त्याला डोळ्यानी पाहाता येत नाही. मात्र तो निर्विकार परमात्मा भक्तावर अनुग्रह करण्याकरिता सगुण साकार झाला आहे.
त्याला मी केव्हांही विसंबणार नाही. सोने व त्याचे अलंकार यांच्यात शब्दमात्र भेद आहे. वास्तविक ते दोन्ही एकच आहेत. त्याप्रमाणे सगुण व निर्गुण हा असा शब्दमात्र भेद आहे, वास्तविक दोन्ही एक परमात्माच आहे. गुळ व त्याची गोडी यांच्यात जसा भेद करता येत नाही. त्याप्रमाणे सगुण निर्गुणात भेद नाही. आता याला मी काय करू अशा तुझ्या स्वरुपाच्या ठिकाणी मन लावून एक होणेच चांगले,
यामुळे तुला एक प्रकारचा अलंकार घातल्यासारखे होईल. हृदय हा मध्यमणी व अंतःकरण चतुष्ट्य ही पाय ठेवण्याची व बसण्याची जागा त्याठिकाणी स्वच्छ असा मनरुपी मणी परमात्मस्वरुपाच्या ठिकाणी गुंतून राहिला आहे. आवडीने अभ्यास केल्यामुळे ते परमात्म तेज दाही दिशेला कोंदून गेले म्हणून अरे बाबा तू सगुण स्वरुपांच्या ठिकाणी प्रेम धर.
अशा रितीने सगुण भक्तीचे निशाण ज्याच्यावर लावलेले आहे असे ब्रह्म स्वराज्यरुप तारु कधीही बुडणार नाही. म्हणून कौतुकाने व प्रेमाने सगुण भक्ती कर. मनाने त्या संसार स्वप्नाचे रक्षण करु नकोस. आपले कोण हे नीट पारखुन घे तेंव्हा तुला कळेल माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठलाशिवाय शरण जाण्यास जागा नाही असे माऊली सांगतात.