ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.306
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग ३०६
जगत्र धांवताहे सैरा म्हणोनी धांवसी । थोक कष्टालासी वांयावीण ॥ धांवोनि जावानि काय करिसी । सहज अहर्निशी भेटी नाहीं ॥१॥ जीवा जाणवेना जीवा जाणवेना । जिवाचे वर्म ते जीवा चोजवेना ॥२॥
जिवाशिवा दोन्ही भिन्न भेदु नाही । विचारुनी पाहीं हदयामाजी । जिऊ सर्वाठायी असे योगिया न दिसे । कुडी सांडूनि वसे कवणे ठायीं ॥३॥ जिऊ जैसाचि आला तैसाचि गेला । तो कोठे सामावला जाणतीना । ज्ञानदेव म्हणे जिऊ कोठें गेला । जिवा जन्म जाला कवणे ठायीं ॥४॥
अर्थ:-
जगातील अविवेकी पुरुष देवप्राप्तीचे खरे साधन काय आहे कळल्यामुळे तीर्थयात्रा वगैरे साधने करण्याकडे सैरावैरा धावत असतात लोकांच्या मागे लागून फुकट भटकून तू फार कष्टी झाला आहेस आशी धावाधाव करुन काय उपयोग? ज्या परमात्म्याच्या प्राप्ती करता ते धावत आहेत तो परमात्मा रात्रंदिवस तुझ्या जवळ आहे. पण त्याची भेट मात्र तुला होत नाही.
सर्व जीवांचा जीव जो परमात्मा आहे. तो तुला कळत नाही. जीव व परमात्म्यात भेद नाही. याचे ज्ञान तू आपल्या हृदयामध्ये करुन घे. खरे पाहिले तर परमात्मा जसा व्यापक आहे तसा जीवही व्यापक आहे. हे ज्ञान योगी लोकांना असते सामान्य लोकांना नसते. जीव हा परमात्म्याहून भिन्न आहे. असे म्हणशील तर शरीर त्यागानंतर जीव कोठे राहतो ते सांग पाहू ?
. साभास बुद्धी. शरीरात जशी आली तशी ती प्रारब्ध संपल्यावर कोठे गेली व जाऊन कोठे सामावली. हे तुम्ही शहाणे म्हणवता तर सांगा पाहु. तसेच जन्माला कोठून आला व तो कोठे गेला याचे उत्तर द्या. तुम्हाला जर ते माहित नसेल तर संतांना शरण जाऊन विचारा असे माऊली ज्ञानदेव सांगतात