ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.199
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग १९९
अरे मना तुं वाजंटा । सदा हिंडसी कर्मठा । वाया शिणसील रे फुकटा । विठ्ठल विनटा होय वेगी ॥ तुझेनि संगे नाडले बहु । जन्म भोगितां नित्य कोहुं । पूर्व विसरले ॐ हुं सोहुं । येणे जन्म बहुतांसी जाले ॥ सांडी
सांडी हा खोटा चाळा । नित्य स्मरे रे गोपाळा । अढळ राहा रे तु जवळा । मेघशाम सावळ तुष्टेल ॥ न्याहाळितां परस्त्री अधिक पडसी असिपत्री । पाप वाढिन्नलें शास्त्री । जप वक्त्री रामकृष्ण ॥ बापरखमादेविवर । चिंती पां तुटे येरझार । स्थिर करीं वेगीं बिढार । चरणी थार विठ्ठलाचे ॥
अर्थ:-
अरे पोकळ कल्पना करणाच्या मना तुं नेहेमी कर्माच्या नादी लागत फुकट श्रम घेतोस त्यापेक्षा श्रीविठ्ठलाच्या ठिकाणी रममाण हो. तुझ्या संगतीमुळे अनेक जीव संकटात पडून कोहं उच्चारण करून अनेक जन्म भोगीत बसले. कारण पूर्व म्हणजे गर्भावस्थेमध्ये‘ ‘ॐ हुं सोऽहं तो परमात्मा मी आहे याची विस्मृति झाल्यामुळे अनेकांना जन्म मरणाचे फेरे फिरावे लागतात.
म्हणून कोऽहंतेचा चाळ सोडून दे. आणि गोपाळाचे नित्य स्मरण करून निश्चित हो. म्हणजे तुझ्या हदयां असलेला भगवान तुझ्यावर संतुष्ट होईल. शास्त्रामध्ये परस्त्रीला दुष्ट बुद्धीने पाहिले तर असीपत्रावर(नरक) पडण्यासारखे पाप घडते. म्हणून ते सर्व टाकून देऊन मुखाने रामकृष्ण नामाचा जप कर. व असा जप केला तर जन्म मृत्युच्या येरझारा चुकुन तुला माझे पिता रखुमाईचे पती श्री विठ्ठलाचे चरणी नित्य वास मिळेलअसे माऊली म्हणतात.