ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.190
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग १९०
मतमंतातरें रचुनियां ग्रंथु ज्ञानव्युत्पत्ति । जव जाली नाही आत्मप्रतीती । ये सकळचि ज्ञानें विषयासक्तीचेनि अनुमाने । तेणें केवीं तुटे संसृती । अंतरीचा स्फुलिंग जाज्वल्य जाणतां । कामक्रोधाचिया उपपत्ति । बाह्य दीक्षा उदंडी आणूनियां तेणें केवीं होय ब्रह्मप्राप्ती रया ॥
सुटलेपणे करिसी विषयत्याग । तेणे अंतरी होय अनुराग । परतोनी तरीच पावशी ब्रह्मभाग रया ॥ आपुलेनि रूढपणे ग्रंथाचे विज्ञानें । संपदा मिरविशी ज्ञातेपणे । अंतरी आशापाश विखार भरणे । जगी संतता मिरविणं । येणे ज्ञानें म्हणसी मी वंद्य जगीं । की उपासना द्वारे मुक्त होणें ।
पालट केलियासाठी सिणो नको बापा । जेवी गंधर्व नगरी वस्ती करणे रया ॥ यालागी दंभ दर्प सकळा । प्रतिष्ठादि भ्रांति धनदारा विषयासक्ती । ऐसा अहंममते ज्ञातेपणाचेनि अहंकारे । तेणे केवी होय आत्मप्राप्ती । जंव येणें देंहे विनितता । शरण गेला नाही संताप्रती । बापरखुमादेविवर विठ्ठलु चिंतिता । सर्व सुखाची होय निजप्राप्ती रया ॥
अर्थ:-
मतमतांतर मांडुन अनेक ग्रंथ केले पण आत्मप्रतिती आली नाही त्यामुळे ही सर्व ज्ञाने विषयासक्त ज्ञान आहे त्या अनुमानाने संसारज्ञान कसे सुटेल. अंतरात काम क्रोध असताना बाहेरुन उदंड दिक्षा घेतल्या तरी ब्रह्मज्ञान कसे प्राप्त होईल. जर हे विषय अंतरातुन त्यागलेस तरच तुझ्या अंतरात अनुराग येईल. व तुला आत्मब्रह्म लाभेल.
आपण रचलेल्या ग्रंथांच्या मुळे मी ज्ञानी हा डांगोरा जर पिटशील तर अंतरात आशापाशांचे निखारे भरशील. मी संत आहे अशी संतता मिरवणे मी ज्ञानी असुन मला वंदन करा हे सांगणे व उपासनेने मी मुक्त होईन हे सांगणे म्हणजे वायाच शिणणे आहे. त्यामुळे गंधर्वनगरीत वस्ती करावी लागेल. सर्व विषय, दंभ, दर्प, प्रतिष्ठा, भ्रांती, धनदारा, विषयासक्ती, ह्या
अहंतेमुळे व ज्ञातेपणाच्या सोगांमुळे तुला आत्मप्राप्ती कशी होईल. त्यासाठी विनीत होऊन तुला संतांना शरण जावे लागेल. व माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांचे चिंतन केले तर सर्व सुखाची निजप्राप्ती होते असे माऊली सांगतात.