भगवान श्रीकृष्ण व वैजयंती माळ
*वैजयंती माळ*
भगवान श्रीकृष्ण एक खास प्रकराची माळ नेहमी धारण करतात, ती माळ असते वैजयंतीची. शास्त्रानुसार श्रीकृष्णाला सहा गोष्टी विशेष प्रिय आहेत. गाय, बासरी, मोरपंख, लोणी, खडीसाखर आणि वैजयंती माळ.
हिंदू धर्म मान्यतेनुसार ही माळ धारण केल्याने आकर्षण वाढते, मान सन्मान वाढून प्रत्येक कार्यात यश प्राप्ती होते, अभ्यासात मन लागून विद्यार्थ्यांना परीक्षेत अपेक्षित यश मिळते, मन शांत व स्थिर राहते, शनि दोष कमी होतो, इतर ग्रहांचा कुप्रभाव नाहीसा होतो.
आपल्या हिंदू धर्मात अनेक प्रकारच्या माळा विविध कारणांसाठी धारण कराव्यात असे सांगितले आहे. अशा माळा पैकीच ही एक वैजयंती माळ. वैजयंती एक सौभाग्यशाली वृक्ष आहे. या झाडाची पाने थोडीशी लांब असतात. या झाडाला फारशा फांद्या नसतात. या झाडाला लागणारी फुले पिवळ्या किंवा लाल रंगाची असतात. हे फुल गुच्छ रूपात असतात. फुलांसोबतच छोटे-छोटे दाणे (बिया) असतात. हे दाणे खूप कडक असतात. आयुर्वेदात काही आजारांवर उपाय म्हणुन हे दाणे शिजवून खायला देखील सांगतात. याच दाण्यांमध्ये छिद्र पाडून माळ तयार केली जाते.
श्री कृष्णास राधेने ही माळ भेट दिली होती म्हणुन श्री कृष्णास अत्यंत प्रिय आहे. पूजा, पाठ, मंत्रजप, यज्ञ, हवन या करिता तसेच गळ्यात धारण करण्या करीता या माळेचा उपयोग केला जातो. असे म्हटले जाते ही माळ धारण करणारा नारदमुनी प्रमाणे विद्वान श्रेष्ठ, इंद्रा प्रमाणे वस्त्र आभूषणे युक्त जगत्जेत्ता, श्री कृष्णा प्रमाणे सर्वांना मोहित करणारा व सर्वत्र यश प्राप्त करणारा बनतो. तसेच सर्व कार्यात यश प्राप्ती होते.
संपूर्ण फलप्राप्ती साठी शुक्ल पक्षातील पहिल्या शुक्रवारी ही सिद्ध केलेली माळ एका ताम्हणात घ्यावी. त्यावर कच्चे दूध अथवा गंगाजल शिंपडावे फुले व्हावीत अशी प्रतिष्ठापना करावी. श्री कृष्णाचे ध्यान करून
*’ॐ नमः भगवते वासुदेवाय’*
या मंत्राचा किमान १०८ वेळा जप करावा जप करत असताना एखादे पुष्प सतत गंगाजलात बुडवून माळेवर शिंपडत राहावे म्हणजे अभिषेक होईल. नंतर त्याच दिवशी अन्नदान करावे व नंतर ही माळ धारण करावी .
विवाहात अडचणी येत असतिल तर त्या व्यक्तीने सिद्ध केलेल्या वैजयंती माळेवर १०८ वेळा *ॐ नमः भगवते वासुदेवाय नमः* या मंत्राचा जप करावा व केळ्याच्या झाडाचे पूजन करावे. लवकरच विवाह संपन्न होतो.