ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.१३२
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-४ रे, नाममाला अभंग १३२
नाम प्रल्हाद उच्चारी । तया सोडवी नरहरि । घेतला कडियेवरी । भक्तसुखं निवाला ॥ नाम बरवया बरवंट । नाम पवित्र आणि चोखट । नाम स्मरे नीलकंठ । निजसुखे निवाला ॥
जें धुरूसी आठवलें । तेंचि उपमन्ये घोकिले । तेचि गजेंद्रा लाधलें । हित जालें तयांचे ॥ नाम स्मरे अजामेळ । महापातक चांडाळ । नामें जाला सोज्वळ । आपणासहित निवाला ॥
नाम स्मरे तो वाल्मिकु । नामें उद्धरिले तिन्ही लोकु । अपणासहित निवाला ॥ ऐसें अनंत अपार । नामें तरले चराचर । नाम पवित्र आणि परिकर । रखुमादेविवरांचे ॥
अर्थ:-
नाम प्रल्हादाने घेतले त्यामुळे त्याला नरहरिने सोडवले उचलुन कडेवर घेतला व तो भक्तीसुखाने निवाला. हे नाम उत्तमातील उत्तम असुन ते पवित्र व चोख आहे स्वतः शिवशंभुने त्याचा अंगिकार केल्याने त्यांना निजसुख प्राप्त झाले.
त्याचा नामाचा आठव ध्रुवाने केला तेच नाम उपमन्युने घेतले त्याचा लाभ गजेंद्राने घेतला त्यामुळे त्यांचे हित झाले.
तेच नाम त्या महापातकी चांडाळ अजामेळ्याने घेतले व त्याला सोज्वळता मिळाली व त्याला ही निजसुखात निववले. वाटमारी करणारा वाल्मिकाने नाम घेतले तो तिन्ही लोकामधुन उध्दारला गेला व त्यालाही निजसुखात निववले.
ते रखुमाईचा पती असलेल्याचे नाम अत्यंत पवित्र व परिकर असुन त्यामुळे कित्येकांचा उध्दार झाला हे चराचर त्या नामानेच तरले आहे असे माऊली सांगतात.