ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.184
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-७ वे, बाळक्रीडा अभंग १८४
काळिये रात्रींचा चंद्रमा । की सांवळी बुंथी आम्हां । काळिये वेळी ते सीमा । नवलावो ॥ सुनीळ काळीये भरू । मेघःश्याम सांवरू । तोचि नवलावो हा धीरू रया ॥ आतां काळिये दिनु मज । न स्मरे वो कांही । तुझे तुज पाहीं । गाऱ्हाणे रया ॥धृ॥
म्हणोनि यमुना कांलिंदी जळ सांवळे । योगिया शून्यातीत तटीं मिळे । सुखिया सुखाचेनि । कल्लोळे देखतसे दिठी सांवळा । भरू खुंतलासे मज ।
नाठवे द्वैत काज रया ॥ येणे सुख चैतन्य । डोळ्यां हो का मिळणी । की नेत्री नेत्र उन्मळणीं । तटस्थपणे ॥ हा सर्वांग अंग प्रत्यंग होऊनियां जेथ । विचरती मुनिजनांची मनें । तो हा रखुमादेविवरू । पाहातां दिठीं आतां । पुनरपि नाही येणे रया ॥
अर्थ:-
काळ्या रात्रीचा चंद्र जणु अंगावर काळी ओढणी घेतल्या सारखा सोंग करुन तो कृष्ण त्याचे शुध्द रुप सिमीत करतो हे नवल आहे. मेघा सारखे काळेपण कसे सावरु ते सुनिळत्व व काऴेपण वेगळे कसे करु हा नवलाव आहे.
आता धिटाईने तुला पाहता मला दुसरे काही स्मरत नाही.तेंव्हा तुझे गाऱ्हाणे कसे घालु. तुझ्यामुळे यमुनेचे पाणी ही काळे झाले आहे. योगी तुझ्यामुळे परमसुखाचे सुख शुन्यात जाऊन साधत असतात. व त्या मुळे आनंदुन त्या काळेपणात कल्लोळ करतात.व त्या काळेपणात मी ही द्वैत हरवुन बसले आहे.
असे हे चैतन्यसुख माझ्या डोळ्यांच्या दृष्टीला लाभले. व हे नेत्र उन्मनी लागले जगापासुन तटस्थता प्राप्त झाली व तो व मी येवढेच जाणवले. हा सर्वांगाचा प्रत्यय पाहुन मुनींची मने त्याच्या स्वरुपात मिळाली. हा तोच रखुमाईचा पती पाहुन परत येणे जाणे घडणार नाही असे माऊली सांगतात.