संत ज्ञानेश्वर म. चरित्र अंतिम भाग १७
संत ज्ञानेश्वर भाग-१७
ज्ञानोबा गेलेत. समाधिस्त झालेत. आतां कुणासाठी व कशासाठी जगायचे? तिन्ही भावंड स्वैरभैर झालेत. त्यांच्यांतील जणुं चैत्यन्यच नष्ट झालं. त्याचा परिपाक म्हणुन मार्गाशीर्षातील वद्य त्रयोदशीला सोपानदेवानं सासवड येथे समाधी घेतली. कांहीदिवसानंतरच उदासवाणी मुक्ता पुढल्या वैशाखात तापीतीरी हरवली, ती कधीच कोणाला दिसली नाही…..
सकळांचे चित्ती येतो कळवळा। मुक्ताई डोळां पाहिली नाहीं।।
आणि या तिघांना निरवुन निवृत्तीनाथांनी जेष्ठामधे त्र्यंबकेश्वरी समाधी घेतली. मागे कांही ठेवले नाही.
ज्ञानोबांचं अनेकांनी अनेक परींनी वर्णन केले. नामदेव गहिवरुन म्हणतात, ही भावंडे इश्वराच्या विभूती होत्या! हरपल्या आतां! असं कुणी होणे नाही. वैराग्याविषयी तर खुप ऐकलं, पण ज्ञानोबांचं वैराग्य? असा वैराग्याचा पुतळा पुनः दिसायचा नाही.
ज्ञानोबासारखी युक्ती कोणाला साधायची नाही. मूर्ती गेल्यात आतां नुसती किर्ती राहिली.एकनाथ म्हणतात… सर्व सुखाची लहरी। ज्ञानाबाई अलंकापुरी।। असे दयाळे ज्ञानाबाई। माझें आर्त तुझे पायीं।।
तुकोबा तर ज्ञानोबांच्या पायावर डोके ठेवुन म्हणतात….. ज्ञानदेवा, महाराजा! आपल्या युक्तीची खोली कुणाला कळली आहे? मग उगाच कशाला धडपड? मी अपलं अज्ञान लेकरु, कांही वेडंवाकडी उत्तरे बोललो असेल तर आपण दयावंत आहांत क्षमा करुन पायाजवळ थोडी जागा द्यावी.
ज्ञानदेवांनी भयंकर सोसलं, पण कधी कुणावर राग काढला नाही,
मात्र त्यांनी जे पाहिलं ते मात्र तुमच्या आमच्यासाठी लिहुन ठेवलं आहे. अपार योग्यतेचा ग्रंथ “ज्ञानेश्वरी”! पण अद्यापपर्यत तरी कुणी तीथपर्यत पोहोचला नाही. ज्ञानोबांनी सरस्वतीच वर्णन करतांना म्हटले आहे……
आतां अभिनव वाग्विला खिनी। चातुर्यार्थ कलाकामिनी। हे शारदा विश्वमोहिनी। नमस्कारिली मायां।। हे वर्णन कसले शारदेचे? हे तर ज्ञानेश्वरीचचं! एवढा अपूर्व ग्रंथ वयाच्या १५ व्या वर्षी, ज्या वयात तुम्ही आम्ही नुसते आई बापावर विसंबुन असतो.
आणि एकटी ज्ञानेश्वरीच नव्हे तर अनुभवामृतासारखा डोळस ग्रंथ पण!
आज एवढी वर्ष झालीत, अतीरथी, महारथी, पंडीत, विद्वान हे सर्व अर्थ लावण्याचा प्रयत्न करताहेत पण नेमका अर्थ हाच असं ठामपणे सांगण्याचं साहस अजुन तरी कुणाच्यानेही करवलं नाही. याहीपेक्षा फार मोठं कौतुक म्हणजे या खडबडीत महाराष्र्टात तळागळातील जनतेसाठी गंगा आणली. आज ७५० वर्षे होऊन गेलीत पण अजुनही ती संथपणे वाहते आहे. दोन्ही थडींना अपरंपार पीक पिकवित, काठं फुलवित, लाखो भक्तांची जीवनं या वाटेने जाऊन कृतार्थ झालीत.
आणि कृतज्ञ अंतःकरणाने आळंदीला जाऊन तुकोबा भक्तीरसाने व्याकुळ होऊन ज्ञानोबांच्या समाधीवर डोकं टेकवुन म्हणतात…..
ज्ञानाबाई, तूं आमची आई आहेस! बावीसाव्या वर्षी समाधी घेतलेले ज्ञानदेव! एवढ्या लहान वयांत तुमची आमची सगळ्यांची आई झालेत. याहुन आणखी वर्णन कसं आणि काय करायचचं त्यांचं?
बोला, ज्ञानेश्वर माऊली, तू सकलांची आई!
!! समाप्त. !!