संत ज्ञानेश्वर म. चरित्र ११

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇

संत  ज्ञानेश्वर भाग-१

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

ज्ञानदेवांना निवृत्तीनाथ सांगत होते, सर्व महान ग्रंथ संस्कृतमधे असल्यामुळे जनसामान्य, सर्व जाती धर्माच्या लोकांपर्यंत जावे, त्यांना कळावे म्हणुन हा परमार्थ विचार मराठी भाषेंत आणुन वेदान्तगंगेचा भगीरथी तु  व्हावेस, ज्यामुळे ही परमार्थाची गंगाजळ सर्वांच्या दाराशी जाईल. त्यांत ते मनसोक्त डुंबतील. मराठी भाषेच्या सावलीत बसुन परमार्थाचं अमृत प्राशन करतील, यासाठी तू मराठीत टीका लिही. निवृत्तीनाथ ज्ञानोबाचे नुसते थोरले भाऊच नव्हते तर त्यांचे ते गुरु सुध्दा होते.आणि गुरुबद्दल ज्ञानोबांच्या मनांत नितांत आदर! त्यांनी आज्ञा शिरसावंद्य मानुन त्यांच्या पायी मस्तक ठेवलं आणि गीतेवरील टीका लिहायला त्यांनी प्रारंभ केला,

‌          महादेवाच्या देवळांतील एका खांबाला टेकुन ज्ञानोबा बसलेत. ज्ञानोबांची कृपा झालेले सच्चिदानंदबाबा लेखणी घेऊन लिहायला सज्ज झाले. समोर निवृत्तीनाथ, सोपान, मुक्ताबाई, संत सज्जनांचा मेळावा बसला आहे. लिनतेने ज्ञानोबा म्हणाले हे काम फार मोठं व अवघड! गीता मराठीत आणायची म्हणजे सुर्याला अंगरखा शिवायचा किंवा सुर्याला उजळुन काढायच! पण माझे श्रीगुरु निवृत्ती कामधेनु, त्यांच्या कृपेनेच हा ग्रंथप्रपंच करायला बसलो.

आणि ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरी लिहिली . गीता मराठी भाषेत आणली. खरे आणि मऊमवाळ, मोजके आणि रसाळ असे अमृताच्या कल्लोळांसारखेच शब्द! साधीसुधी मर्दमराठ्यांची खडबडीत भाषा, ज्ञानोबांनी तिच्यातुन अमृताचे पाझर फोडले. मराठी रांगडा मराठ्याच्या बोलनेही अमृताशी पैज जिंकावी अशा रसाळ वाणीत अपुर्व असा ज्ञानेश्वरी ग्रंथ त्यांनी रचला. एवढी वर्षे झाली पण ज्ञानेश्वरीची बरोबरी करणारा ग्रंथ अजुनपर्यंत तरी जन्माला आला नाही.

एवढा महान ग्रंथ लिहिल्यावर त्यांनी विश्वात्मक देवाजवळ काय मागावं? तर देवानं  या माझ्या वाणीच्या यज्ञानं संतुष्ट होऊन पसायदान घ्यावं! कसलं पसायदान तर दुष्टांचा दुष्टपणा जाऊन चांगली कामं करावीसी वाटावी, वाईटाचा अंधार नष्ट होऊन चहुकडे धर्माचा जयजयकार व्हावा, सगळ्या प्राणीमात्रांत प्रेम निर्माण व्हावं, प्रत्येकाची चांगली इच्छा पुर्ण व्हावी!

एखादं देऊळ जसं चंदनाच्या अन् उदबत्त्यांच्या सुवासाने दरवळावं तसा महाराष्र्ट ज्ञानेश्वरीच्या परिमलानं घमघमला. सुवास कमी न होता वाढतच राहिला.

ज्ञानेश्वरी शेवटास नेऊन गुरु निवृत्तीनाथांना समर्पित केल्यावर आणखी काय आज्ञा आहे म्हणून ज्ञानोबांनी विचारल्यावर निवृत्तीनाथ म्हणाले, आदीनाथ शंकराचे शिष्य मत्छेंद्र, त्यांचे शिष्य गोरक्षनाथ, गोरक्षांचे शिष्य गहिनिनाथ! त्यांनी आपल्याला उपदेश केल्यामुळे आपण कृतार्थ झालो आहे. त्याची अल्पशी फेड म्हणुन गहिनीनाथांनी सांगीतलेले गुज ग्रंथरुपाने लोकांकरितां गुंफुन ठेवावं.

आणि ज्ञानोबांनी अनुभवामृत ग्रंथ लिहिला, अनुभवाचं अमृत, ज्याचं मनन केलं की जीव कृतार्थ व्हावा, चहुकडे आनंदच आनंद. “ज्ञानेश्वरी” आणि “अनुभवामृत” दोन युगं निर्माण करणारे ग्रंथ लिहुन झाले आणि मंडळी नेवाशाहुन आळंदीला पोहोचली.

तापीच्या तीरावर एक महान चांगदेव नांवाचा योगी राहत होता. तो सर्व विद्यांमधे प्रविण, कर्मकाण्ड, ज्योतिष, शिल्प, वैधक, काव्य, नाटक, स्मृति, गारुड, व्याकरण, तर्क या सगळ्या विद्या त्याच्या घरी पाणी भरीत. त्याचा केवढा मोठा शिष्य समुदाय, भला मोठा मठ, पुजा अर्चा, नैवद्य, आरत्या असा सगळा गाजावाजा.

क्रमशः
मिनाक्षी देशमुख

अनुक्रमणिका 👈 👉ग्रंथ सूची

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण चरित्र सर्व भाग

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य एकाच ठिकाणी पहा

सर्व संत चरित्र पहा एकाच ठिकाणी

✅ही पोस्ट ईतरांनाही पाठवा 👇
धनंजय महाराज मोरे
धनंजय महाराज मोरे
Articles: 6354

Leave a Reply

Discover more from Warkari Rojnishi

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading