ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.296
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.
प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २९६
सायखडियाचें बिक । अचेत करी परिपाक । जनदृष्टीचें कवतुक । स्फुरे वेगीं ॥१॥
तैसें हे देहरुप जालें च । न होतेंचि होणे आलें । तंव सद्गुरु जाणितले । येथीचे रया ॥२॥
सतधनि म्हणे गुरु । जत सांभाळी विवरु । ऐसेनि तुज वोगरु । वाढीला ब्रह्मी ॥३॥
निराकार अलिप्त वसे । शरीरीं असतुचि नसे । एकतत्त्व मनोद्देशे । हृदयीं ध्यायें ॥४॥
सोडी रसाची सोयें । नको भुलो मायामोहें । सत्रावी दोहतु जाये । जीवन भातें ॥५॥
ज्ञानदेव म्हणे श्रीगुरु । ऐसा सांगती विचारु । मग ब्रह्मींचित्तानुसारु निरोपिला सर्व ॥६॥
अर्थ:-
ज्याप्रमाणे खेळियाच्या बलाने निर्जीव बाहुल्या नाचू लागल्या बरोबर लोकांच्या दृष्टीच्या ठिकाणी कौतुक उत्पन्न होते. त्याप्रमाणे नसलेला देह मायेने उत्पन्न झाला आहे. हे वर्म श्रीगुरुनी जाणले आहे. परमात्म्याचा मालक जो श्रीगुरु तो असे विवरण करुन परमात्मस्वरुप ज्ञानाचे पक्वान्न करुन तुला वाढीत आहे. ते चांगले जतन कर. परमात्मा निराकार अलिप्त असून शरीरांत असताही दिसत नाही.
अशा परमात्म्याशी जीवाचे एकत्व आहे. याचे तू मनाने नेहमी चिंतन करीत जा. आणि विषयरसांची गोडी टाकून दे. या मायामोहाला भुलू नको. योगाभ्यास करुन सत्रावी जी जीवन कला तिच्यातील अमृताचा रस चाखीत जा. अशा तहेचा विचार श्रीगुरु सांगतात. त्यांच्या सांगण्याप्रमाणे ब्रह्म चिंतनाची सवय चित्ताला लागली की. सर्व गोष्टी आपोआप ब्रह्मरुपच भासू लागतात. असे माऊली ज्ञानदेव सांगतात.