ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.254

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

👉 अभंग अनुक्रमणिका    👉 ग्रंथ सूची पहा.

ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड.  प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २५४

शब्दे निर्गुण भावावे थितिया । सगुणासी कां मुकावे । वेदद्रोही व्हावें कां ऐसें का किजे । कर्म उच्छेदु करुन अहंब्रह्म म्हणत । थितिया सुखासी आंचविजे ।

कर्मचि ब्रह्म ऐसे जाणोनि दातारा । हृदयीं सगुण धरुनी राहिजे रया ॥ जवळी असता सांडी मांडी करिसी । वाया सिणसी तुझा तूचि रया ॥

मुळी विचारितां मन देह तंव कर्माधीन । तेथिचे संचित क्रियामाण प्रारब्ध पाहीं । ते ठेऊनि जडाचिया माथां की वेगळे होऊनि । पाहात हे तंव तुज नातळे कांही ।

ऐस निरखुनी पाहातां सगुण धरूनि । आतां मग तुज विचारितां भय नाहीं ॥ हा तंव कल्पनेचा उभारा । मनाचा संशय दुसरा । जेणे घडे येरझारा जन्मांतर ।

म्हणोनि ऐसें कां सोसावें । एकचि धरूनी राहावें । जेणे चुकती येरझारा । तेचि प्रीति जागृती स्वप्न आणि सुषुप्ति । ऐसाचि हो कांवो थारा । बापरखुमादेविवरू विठ्ठलु चिंतिता । सुख अंतरी जोडेल सोयरा ॥

अर्थ:-

ज्या पुरूषाने भगवद उपासना केली नाही व सगुण सेवाही केली नाही. त्याला वेदप्रतिपाद्य असलेल्या निर्गुण स्वरूपाची फक्त भावनाच करावी लागेल आणि सगुणांच्या भक्तीला का मुकावे? नित्यनैमित्तिक कर्माच आचरण करावे अशी वेदाची आज्ञा आहे. त्या वेदाज्ञेच्या विरुद्ध वागू नये. ती वेदाज्ञा मोडणे म्हणजे वेदांसी शत्रूत्व करणे होय.

कर्म उपासनेचा उच्छेद करून नुसते ‘अहं ब्रह्म’ असे म्हणण्याने उपासनेचा आनंद मिळणार नाही. त्यापेक्षा कर्म उपासना ब्रह्मरूप आहे. असे समजून अंतःकरणात सगुण मूर्तीचे ध्यान करणे फार चांगले आहे.

अरे सगुण स्वरूपाची प्राप्ती आपणाला सुलभ असता तू फुकट का सीण करून घेतोस. मुळापासून विचार कर, मन, इंद्रिय व स्थूल देह यांचे सर्व व्यवहार पूर्वकर्माधीन आहे. त्याकर्मात प्रारब्ध, संचित व क्रियमाण असा भेद आहे. त्यांचा संबंध स्थूल सूक्ष्म शरीरासी आहे. येवढ्याकरिता भोगाचा संबंध जडशरीरासी आहे. मी आत्मस्वरूप असल्यामुळे माझा त्या

व्यवहारासी कांही एक संबंध नाही. असा नीट विचार करून पाहा. आणि सगुण मूर्तिची उपासना कर. मग तुला खरोखर विचार केला तर भय नाही. स्थूल, सूक्ष्म प्रपंच हा मनाच्या कल्पनेवर उभारलेला आहे. त्यामुळेच जन्ममरणाच्या येरझारा कराव्या लागतात. असे हे जन्ममरणाचे दुःख का सहन करावे? त्यापेक्षा सगुण मूर्तिचे जर चिंतन केलेस तर जन्ममरणाच्या

येरझार चुकतील. जागृती स्वप्न व सुषुप्ति या तीन्ही अवस्थेत सगुण स्वरूपाविषयी प्रेम धारण कर म्हणजे माझे पिता व रखुमादेवीचे पती श्री विठ्ठल यांच्या चिंतनाने सुख तुझे सोयरे होऊन तुला चिकटेल असे माऊली सांगतात.

संत ज्ञानेश्वर महाराज संपूर्ण साहित्य

1 ✔👇हे इतरांही शेअर करा 👇

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *