ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.219
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग २१९
चौथ्याशी लक्ष योनी क्रमुनी सायासी । नरदेहा ऐसे भांडवल पावलासी । जतन करीं रे गव्हारा न भजे न भजें या संसारा । बीज सांडूनि असारा वायां झोबतोसी ॥
हातीचिया लागी भूमी चाळितोसी । आप नेणतां तूं पर काय चिंतिसी ॥ मन एक स्वाधीन तरी खुटले साधन । सर्व सुखाचे निधान हरि पावसी रया ॥
तृणे पशु कविले ते क्षीरांते विसरले । तैसा विषय पाल्हाळे निज चुकलासी ॥ कोटी युगें जन्मवरी येता जाता येरझारी । दु:ख भोगिसी दुर्धरी रया ॥
पुत्र कलत्र भवविभव विचित्र । होय जाय सुत्र तुं आप न म्हण ॥ तुझा तूचि नाही ते विचारुनी पाही । चेतसी चोरिलासी वेगी सावध होई रया ।
तुज नाथिलाचि धिंवसा आस्तिक्यपणाची आशा । असते सांडुनि आकाशा वाया झोंबतोसी ॥ दिवस आहे तो धावांवे नाही तरी फुटोनी मरावें ।
मृगजळ हे अघवें पाहे पा रया ॥ स्वप्नी साचची जोडे थोडे ना बहुत हाती सापडे । तुटलें प्रीतीचें कुवाडे ऐसे जाणोनियां । शरण जाई निवृत्ति तो सोडवील संसृति । बापरखुमादेविवरा विठ्ठलाचे भक्ति रया ॥
अर्थ:-
चौयांशी लक्ष योनि फिरत फिरत मोठ्या सायासाने या नरदेहाला आलास. परमात्म प्राप्तीला नरदेह भांडवल आहे. त्याकरता ते जतन कर. संसारात आयुष्य घालवू नको, परमात्मप्राप्ती साधनाचे बीज टाकुन या,
असार संसारात झोंबणे हा वेडेपणा आहे. ठेवा आपल्या हातामध्ये असता तो मिळविण्यासाठी जमीन उकरीत बसणे हा जसा वेडेपणा आहे. त्याच प्रमाणे आत्मस्वरूप न जाणता देहादी अनात्म पदार्थाचे चिंतन करणे,
हा वेडेपणा आहे एकदा मन तुझ्या स्वाधीन झाले तर बाकीच्या साधनांची जरूरीच नाही. त्या साधनाने सर्व सुखाचा ठेवा जो परमात्मा श्रीहरि तो प्राप्त होईल. गवताच्या नादी लागलेले वासरू जसे आईचे दूध पिण्यास विसरते. त्याप्रमाणे तू आभासमात्र विषयसुखाच्या पसाऱ्यात आत्मसुखाला चुकतोस. यामुळे कोट्यवधी युगे
जन्ममरणाच्या येरझारीत दुःख भोगीत राहातो. या करिता संसारातील बायको पुत्र मित्रादि विचित्र ऐश्वर्य उत्पन्न होऊन क्षणमात्रात नष्ट होते. यांच्याशी संबंध ठेऊन हे माझे आहेत असे म्हणू नकोस.
विचार करून पाहिले तर स्वतःचे शरीरसुद्धा तू नाहीस त्या जड शरीराला चेतना देणारा जो तू त्या तुझी तुच चोरी केलेलाआहेस म्हणून लवकर सावध हो.नाही त्या आस्तीकपणाच्या भरवशावर त्याच्या प्राप्तीची आशा धरणे वेडेपणा आहे. नित्यप्राप्त आत्मस्वरुप सोडुन आकाशा सारख्या पोकळाला का कवटाळतो आहेस.
मृगजळामागे छाती फोडुन धावणारे हरिण मरते पण पाणी मिळत नाही. तसे ह्या संसारसुखाचे मृगजळ आहे. स्वप्नात पाहिलेले जागृतीत प्राप्त होते का?असा विचार करुन संसाराची प्रिती सोडुन जे श्री गुरु निवृतिच्या चरणी लागले त्यांना माझे पिता व रखुमाईचे पती श्री विठ्ठल यांनी भक्ती दिली व संसारतापातुन सोडवले असे माऊली सांगतात.