ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.198
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, उपासना काण्ड. प्रकरण :-८ वे, उपदेश अभंग १९८
का संडिसी गृहाश्रम । कां सांडिसी क्रियाकर्म । कासया सांडिसी कुळींचे धर्म । आहे तें वर्म वेगळेची ॥ भस्म उधळण जटाभारू । अथवा उदास दिगंबरू । न धरी लोकांचा अधारु । आहे तो विचारू वेगळाची ॥ जप तप अनुष्ठान । क्रिया कर्म यज्ञ दान । कासया इंद्रियां बंधन ।
आहे तें निधान वेगळेचीं । वेदशास्त्र जाणीतलें । आगमी पूर्ण ज्ञान झालें । पुराण मात्र धांडोळिलें । आहे ते राहिले वेगळेची ॥ शब्दब्रह्म होसी आगळा । म्हणसी न भिये कळिकाळा । बोधेंविण सुखसोहळा । आहे तो जिव्हाळा वेगळाची ॥ याकारणे श्रीगुरूनाथु ।
जंव मस्तकी न ठेवी हातु । निवृत्तिदास असे विनवितु । तंव निवातु केवीं होय ? ॥
अर्थ:-
अरे गृहस्थाश्रम, व त्याची नित्यनैमित्यिक कुळकर्मे का सोडतोस. पण समाधान मिळवण्याचे वर्म वेगळेच आहे. भस्माची उधळण जटाभार व नग्न राहून लोकांचा आधार न घेता हिंडतोस पण तो परमार्थिक विचार नाही हरीप्राप्तीचा हेतू न ठेवता जप, तप, अनुष्ठान, क्रियाकर्म, दान, यज्ञ,व इंद्रिय दमन याचा काय उपयोग.वेदशास्त्र जाणले पुराणे अभ्यासिली व त्यात व्यवहारी हेतू ठेवला तर वाया जातो.
शब्दब्रह्म जाणले त्यामुळे मला कळीकाळाचे भय नाही असे म्हणशील तर ब्रह्म सुखाचा सोहळा लाभणे शक्य नाही. या कारणाने श्रीगुरु मस्तकावर हात ठेऊन कृपा करत नाहीत तो पर्यत निवांत कसा होशील असे निवृत्तीदास माऊली असे म्हणतात.