संत ज्ञानेश्वर म. चरित्र ४
संत ज्ञानेश्वर भाग-४.
लेक व सुनेचं सुखी संसार, व कौतुक पाहुन लवकरच विठ्ठलपंतांच्या आई-वडीलांचा स्वर्गवास झाला. विठ्ठलपंतांना पोरकेपणा भारी जाणवला. आणि त्यांच मुळचं वैराग्य परत जागं झालं. कुळकर्णी वतनाकडे त्यांच दुर्लक्ष झालं. एकट्यानेच गोदावरीच्या काठी जाऊन भजन, किर्तन करावं, ध्यान-धारणा करावी. त्यांच संंसारातुन पुर्ण लक्ष उडालं! परत एकट्याला तिर्थक्षेत्री स्वच्छंदी भटकावसं वाटु लागले . ही गोष्ट सिध्दोपंताना कळल्याबरोबर सत्वर आपेगांवला आलेत. गोदातीरी असलेल्या महादेवाच्या मंदिरांत विठ्ठलपंताना गाठुन, आळंदीला चलण्याबाबत त्यांचे मन वळवले. रखुमाई, विठ्ठलपंतांना सिध्दोपंत आळंदीला घेऊन आलेत, पण विधिलिखीत निराळच होतं.
आळंदीला एका पंडीताने प्रवचनामधे सांगीतले की, ज्या दिवशी वैराग्य निर्माण होईल त्या दिवशी बायकोच्या सम्मतीने सन्यास घेऊन चालते व्हावे. हे ऐकुन ते पत्नि रखमाईला सतत सन्यास घेऊन जाण्याबद्दल विचारणे सुरु ठेवले. त्यांना जाण्यापासुन प्रवृत्त व्हावे म्हणुन त्यांना ज्यात आनंद वाटेल अशा गोष्टी करण्याची तीची धडपड सुरु असे. परंतु विठ्ठलपंत आपल्या निश्चयापासुन तसुभरही ढळले नाही.एकदा रखुमाई अर्धवट झोपेच्या गुंगीत असतांना त्यांनी जाण्याची अनुमती मागीतल्यावर अर्धवट झोपेच्या भरात दुश्चितपणे हुंकार भरला. झालं! पडत्या फळाची आज्ञा माणुन थेट काशी गाठली. तिथं फार मोठा अधिकारी असलेल्या श्रीपादस्वामीकडून संन्यासाची दिक्षा घेतली. व चेतन्यस्वामी नांव धारण झाले.
इकडे रखुमाई जागी झाल्यावर व विठ्ठलपंत गायब दिसल्यावर सारा प्रकार तिच्या लक्षात आला. जणुं पारध्यानं बाण मारलेल्या हरिणीगत घायाळ झाली. त्या दिवसांपासुन एक भुक्त राहु लागली, रात्री पाण्याशिवाय कांहीच घेत नसे, तीच्या आईने तीला समजावण्याचा बराच प्रयत्न केला उलट तीने व्रत वैकल्य आणखीणच कडक केले.सिध्देश्वराशेजारी असलेल्या पिंपळाच्या झाडाला सकाळ पासुन दुपार पर्यत प्रदक्षिणा घालण्याचा नेम कितीतरी दिवस चालविला. एकदा श्रीपादस्वामी रामेश्वराची यात्रा करुन दक्षिणेत आले असतां वाटेत योगायोगाने आळंदीला सिध्देश्वर देवळाच्या ओवरीत उतरले.
त्याच वेळी रखुमाईच्या प्रदक्षिणा पुर्ण झाल्याने घराकडे निघाली तर तिला तेजस्वी स्वामी दिसल्याने ती पुढे होऊन त्यांना नमस्कार केल्यावर स्वामींनी “पुत्रवती भव” असा आशिर्वाद दिल्यावर तिच्या मुखावर खिन्नतेचे हसु फुटले ते पाहुन त्यानी कारण विचारल्यावर “पतीने सन्यास घेतल्याचे” सांगीतल्यावर त्यांना एकदम चटचाच बसला. तिच्याबरोबर घरी येऊन तिच्या वडीलांना भेटले. स्वामींनी पुर्ण तपास केल्यावर त्यांना कळुन चुकले की, चैतन्यस्वामी म्हणजेच या घरचा जावई, रखुमाईचा पती!
रखुमाईच्या तपश्चर्येनं इंद्रसुध्दा आपल्या जागेवरुन ढळायचा! मग माझ्याकडुन दिलेल्याा आशिर्वाद, झालेल्या चुकीचे परिमार्जन नको करायला? स्वामींनी सिध्दोपंत व रखुमाईला सोबत घेऊन काशीला पोहोचले. चैतन्यास्वामी म्हणजेच विठ्ठलपंताना परत गृहस्थ होण्याची स्वामीनी आज्ञा देऊन तिघांनाही आळंदीला परत पाठवले. विठ्ठलपंत आळंदीला परत आले खरे, पण त्यांच्या येण्याने गांवभर वणवा पेटला. विघ्नसंतोषी लोकं हातात चुडी घेऊन धांवत सुटले. त्यांच्या कुटुंबाला वाळीत टाकण्यासाठी ग्रामस्थांची सभा झाली.
त्यांच्या कडे कुणीही जायचे नाही.घाटावरचं पाणी बंद, वाण्याकडुन सौदा, गवळ्याकडुन दुध, तेल्याकडुन तेल, फुलं, हजामत हे सगळं बंद केलं. त्यांच्या कडच्या श्राध्दाला कुणीही भिक्षुक म्हणुन जायचे नाही.सिध्दोपंत हतबल झालेत. शेवटी रखुमाईने कंबर कसली व नवर्याला घेऊन सिध्देश्वर बेटावर एकांतात झोपडी बांधुन राहायला गेलेत. गांवाचा सबंध संपला.\