३९ भगवान श्रीकृष्ण चरित्र
!!! श्रीकृष्ण !!!
भाग – ३९.
राजसूययज्ञ सिध्दीस गेला खरा, पण भावी कलहाचे बीज पेरल्या गेले. कारण अनेक राजेलोक मनांतुन कृष्ण व पांडवांवर जळफळतच परतले,त्यातही दोन राजांच्या अंतःकरणांत द्वेषाग्नी,मत्सराग्नी भडकला तो अनिवार होता.कृष्णाच्या कट्टर शत्रुंपैकी अजुन शाल्व व रुख्मी शिल्लक होते.रुख्मी श्रीकृष्णाचा मेहुणा, रुख्मिणीचा भाऊ असल्यामुळे उभय पक्षी शांती होती.पण शाल्वाच्या बाबतीत तसे नव्हते.त्याच्या देखत शिशुपालाचा वध झाल्याने त्याचा क्रोधाग्नी भडकला, पण श्रीकृष्ण,पांडव व यादवांच्या सामर्थ्यापुढे त्यावेळी तो कांहीच करुं शकला नाही. श्रीकृष्णाचा सूड हा एकच ध्यास त्याला होता.
इकडे हस्तिनापुरी दुर्योधनाचीही अशीच स्थिती झाली.पांडव नाशासाठी अगदी लहानपणापासुन अनेक प्रयत्न केले होते.युधिष्ठीर सम्राट म्हणुन सर्व राजे मांडलिक झाले होते.युधिष्ठीराचे अपरिमित अतुलनीय ऐश्वर्य,त्यात ती दिव्य ‘मयसभा’ पाहुन वैष्यम्याने मत्सरा ची आग भडकली.त्यात भर म्हणजे मय सभेत त्याची झालेली फजिती व द्रौपदी च्या डिवचत्या शब्दाने तर,अपमानाने त्याचा क्रोध पराकाष्टेला पोहोचला. त्यामुळे त्याच्या प्रकृत्तीवर झालेला परि णाम धृतराष्टाच्या लक्षात आल्यावर ते म्हणाले, पुत्रा! तुला सर्व सुख अनुकुल असुन सर्व तुझ्या आज्ञेत असतांना तुझी ही दशा कां व्हावी?
दुर्योधन तीव्र स्वरांत म्हणाला,तात पांडवांची संपत्ती,ऐश्वर्य मला खुपत आहे. दुर्योधन गप्प बसला नाही.शकुनी,कर्णा सह एकांती खलबतं सुरु होती.अखेर दुष्ट व नाशाप्रत नेणारी एक युक्ती धृतराष्र्टा च्या सम्मतीने निश्चित केली.
क्षत्रिय जसे युध्दाचे आव्हान नाकारत नाही तसे द्यूताचे ही नाकारत नाही.द्युताची फारशी माहिती नसलेल्या भोळ्या युधिष्ठीराला द्युत खेळण्यास बोलावुन त्याची संपत्ती हरण करण्याचा डाव या कुटील चौकडीने रचला.वेगाने तयारीला सुरुवात झाली. मयसभेप्रमाणेच एक दिव्यसभा तातडीने बांधण्याचा हुकुम धृतराष्र्टाने पारित केला सर्व तयारी झाल्यावर धृतराष्र्टाने मानभावी प्रेमाणे इंद्रप्रस्थाला दूत पाठवुन सभा पाहण्यास चार दिवस एकत्रित आनंदात घालवण्यासाठी सुनांसह सर्वांना येण्याचा अगत्याचा निरोप विदुरहस्ते पाठवला.याचा भावी परिणाम वाईट होईल हे माहित असुनही क्षत्रियाच्या ब्रीदाला जागुन धर्मराज आपले चार बंधु, द्रौपदी,माता कुंतीसह हस्तिनापुरी आले.
हस्तिनापुरी सर्वांचे मोठ्या प्रेमाणे स्वागत झाले.चार दिवस मेजवानी,सहलीत गेले आणि संधी साधुन शकुनीने द्युत खेळण्यास सरळ वृत्तीच्या धर्मराजाला राजी केले.खेळाला सुरुवात झाली.युधिष्ठीर डावावर डाव हरु लागला.सगळी संपत्ती अश्व,गज शेवटी राज्य हरला. स्वतःला,भावांना डावाला लावुन तेही हरला.द्रौपदी पणाला लावुन तीही हरला. उन्मत्त दुर्योधनाने प्रतिकामी दूताला अंतः पुरातुन दासी झालेल्या द्रौपदीला सभेत आणायला सांगीतले.तो परत येऊन म्हणाला,द्रौपदीने विचारले की,प्रथम धर्मराज स्वतः हरल्यावर, मला पणाला
लावण्याचा अधिकार त्यांना आहे का? इरेला पेटलेल्या अधर्मी दुर्योधनाने तिला आणण्यास दुःशासनाला पाठविले.मी रजस्वला,एकवस्रा आहे असे परोपरीने सांगीतले पण त्याने ऐकले नाही.तीचे विपुल लांबलचक केस पकडुन ओढत ओढत भरसभेत आणले.तिची अनन्वित दुर्दशा पाहुन सभेतील सर्व लोकांनी शरमे ने मान खाली घातली.अग्निज्वालेतुन निर्माण झालेली प्रखर द्रुपद कन्या सभेत सभोवार नजर फिरवुन धृतराष्र्ट,भीष्म, द्रोणाचार्यांना स्वरक्षणार्द प्रत्येकाला विनवु लागली,पण मुकपणे मान घालुन सर्वजण बसुन राहिलेत.दुःशासनाने तिच्या निरिला हात घातला.
सर्वीकडुन निराश द्रौपदीने आर्तपणे, भाऊ,सखा,पाठीराखा प्रभु श्रीकृष्णाचा धावा करीत श्रीकृष्णचरणी लीन झाली. आणि कृपाळु,भक्तांचा कैवारी तिच्या हाकेला धावुन येऊन तिचे लज्जारक्षण केले.दुःशासन तिचे वस्र ओढुन थकुन गेला.वस्रांचा मोठा ढीग पडला.सारी सभा स्तंभित,विस्मयचकित झाली.धन्य!धन्य! त्या महासती द्रोपदी असे प्रशंसोद्गार,अंध धृतराष्र्टाला दिसत नसले तरी ऐकु येत होते.विदुराने वस्तुस्थिती सांगीतल्यावर, लोकलाजेस्तव तिला हवा तो वर मागायला सांगीतले.
क्रमशः
संकलन – मिनाक्षी देशमुख.