संत ज्ञानेश्वर म. चरित्र १६
संत ज्ञानेश्वर भाग-१६
मुक्ताईचा विलाप पाहवल्या जात नव्हता. ती ऊसासुन म्हणाली, ज्ञानदादा! असा कसा रे निष्ठुर झालास? अरे! तुझ्याशिवाय मला कोणीच नाही रे! मी कुणाच्या मांडीवर डोकं टेकवु? कुठं विसावा घेऊ? तूं गेल्यावर मी सुध्दा राहणार नाही…….आम्हा मातापिता नित्य ज्ञानेश्वर। नाही आतां थार विश्रांतीसी।। रुख्माई तीला पोटाशी धरुन म्हणाली, अग! मुक्ते किती रडशील मी आहे ना! देव समजावु लागले! मुक्ते! गंगा उगमापासुन निघाली अन् समुद्राला मिळाल्यावर समद्रातील वेगळं व गंगेतल उदक कां कधी वेगळ होऊ शकतं का? तसंच ज्ञानोबा जरी समाधी घेत असला तरी माझ्या स्वरुपापासुन कधीच वेगळा नाही.
कसंबसं देवाने या दुःखी जीवाचं समाधान केले, आणि म्हणाले, ज्ञानोबाचे गुण अपार आहेत,
देव म्हणे असे आठवाल फार। लागेल उशीर समाधीसी।।
सिध्देश्वराच्या नंदीची शिळा बाजुला सारली की, खाली भूयार आहे.वर अजान वृक्ष, आज कार्तिक वद्य त्रयोदशीला ही जागा निश्चित झाली, शिळा बाजुला काढली. नामदेवाची नारा,विठा, गोदा, महादा ही मुलं भराभर खाली भूयारात उतरुन विवर झाडून पुसुन स्वच्छ केलं. बाकी संतांनी….
धुवट वस्राची घडी ते अमोल। तुळशी आणि बेल अंथरले। दुर्वा दर्भ वरी टाकिले मोकळे। पुष्पें तीं सकळ समर्पिली।। मग पांडुरंगाने ज्ञानोबाला चलायला सांगीतले. ज्ञानोबाने सोपानाला अलिंगन दिले, मुक्ताईला पोटाशी धरले, नामदेवाला मिठी मारली, सर्व संतांना नमस्कार केला. नी मग निवृत्तीनाथाजवळ आले. हात जोडुन त्यांना आज्ञा मागीतली, म्हणाले, दादा! तुम्ही फक्त माझे जेष्ठ बंधुच नाही तर, गुरु तर आहातच, पण त्याहीपेक्षा माझे सर्वस्व आहात, आईबाबाच्या मायेने पालन पोषण केलं, प्रत्येक हट्ट पुरवला, आळी पुरवली. तुमच्याच कृपेने मी माझ्या स्वरुपात मिळालो.
निवृत्तीनाथांनी ज्ञानोबांना कडकडून मिठी मारत गहिवरल्या स्वरात स्फुदंत म्हणाले, माझ्या ज्ञानराजा कधी ऊलटुन बोलला नाहीस, अधिक उणं उत्तर दिलं नाही. तुझ्या सारखा धाकटा भाऊ, शिष्य कधी होणे नाही. गुरुशिष्यपण तुझ्यामुळे खरं झालं!
अशा शोकाकुल वातावरणांत कुणाच्यानेच टाळ ऊचलवत नव्हता, गळ्यांतुन शब्द निघत नव्हते. सगळे चित्रासारखे उभे राहुन शेवटचे ज्ञानदेवाला पाहुन घेत होते. निवृत्तीनाथ आणि पांडुरंग या दोघांनी ज्ञानदेवांना समाधीकडे चालवले. कुणीही पापणी न लवता केवल्याच्या पुतळ्याला भुयारांत ऊतरतांना सर्व जण पाहत आहेत. आतां हा दिसायचा नाही. पायर्या उतरुन ज्ञानोबा आसनावर बसले. पुढे ज्ञानेश्वरी ठेवली. प्रसन्न ज्ञानोबाने देवाकडे मागणं मागीतलं…..
ज्ञानदेव म्हणे सुखी केलें देवा। पादपद्मीं ठेवा निरंतर।।
लहानपणी भोगावे लागलेले हाल अपेष्टा, कष्ट सर्व सोसुनही त्यांच्या मनांत कोणताही किंतु उरला नाही. कुणाबद्दल राग, द्वेष, आकस नाही. देवाने ज्ञानोबांच्या मस्तकावर अभयकर ठेवला. ज्ञानोबांनी तिनदां नमस्कार केला अन् आपले कमळासारखे मोठे डोळे मिटुन घेतलेत! नेहमीसाठी!