ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.480
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४८०
पाहातें पाहूं गेलों पाहणे विसरलों । ब्रह्मानंदें धालों देवराया ॥१॥ माझें रुप आतां काय म्यां पाहावें । जाहलों अवर्षे विश्व मीची ॥२॥ दुजें नाहीं नाहीं वाहतों तुझी आण । चौदाही भुवन एकरुप ॥३॥ तुझें माझें द्वैत तेंही उरलें नाहीं । मूळी मी हे कांहीं नाठवेचि ॥४॥ एकांती एक वर्ते तोचि साक्षात्कार । जाहला ज्ञानेश्वर तेथें लीन ॥५॥
अर्थ:-
ब्रह्म वस्तूला पाहूं गेलो असता मी त्या ब्रह्माहून वेगळा न राहता ब्रह्मानंदातच निमग्न होऊन गेलो ज्याला पाहावयाचे तेच माझे रुप असल्यामुळे पाहावयाचे काहीच उरले नाही. सर्वच ब्रह्मांड माझे रुप असल्यामुळे मला दुसरे काही दिसेनासे झाले. मला चवदाही भुवने ब्रह्मरुपच दिसू लागली. हे पंढरीनाथा तुला शपथ घेऊन सांगतो की, तुझ्या माझ्यामध्ये देवभक्तपणाही उरला नाही. या ठिकाणी मीपणा गेल्यामुळे एकच वस्तु सर्वत्र भरली आहे.असा मला साक्षात्कार झाला. मीपण तद्रूप होऊन गेलो त्यामुळेच दुसरी वस्तु असल्याची ओळख नाही. असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.