ज्ञानेश्वर महाराज सार्थ गाथा अभंग क्र.481
👉 अभंग अनुक्रमणिका 👉 ग्रंथ सूची पहा.
ज्ञानेश्वर म. सार्थ गाथा, ज्ञानकाण्ड.
प्रकरण :-१ ले, अद्वैत अभंग ४८१
जयाचिये ठायीं नाहीं मीतूंपण । तेचि सनातन एक ज्ञानी ॥१॥ धैर्याचे मंडप तेचि स्तंभ जाले । कोंभ जे निघाले परिणामा ॥२॥ क्षेत्रज्ञ संन्यास घेतला श्रीहरि । तेथूनियां दूरी नवजेची ॥३॥ रायाची संगती घडतां निमिष । तरी होती वश्य अष्टसिद्धी ॥४॥ धाले तेच पूर्ण कीर ब्रह्मानंदें । ज्ञानेश्वर बोधे बोधीयला ॥५॥
अर्थ:-
ज्याच्याठिकाणी मी तूं हे द्वैत भान नाही. तेच मुरलेले ज्ञानी समजावे. ते धैर्यरुप मंडपाचे जणू खांबच होत. त्याच्या रुपाने जणू काय ब्रह्मालाच कोंभ फुटले म्हणावयाचे. त्या ज्ञानवानांच्या ठिकाणी श्रीहरिने क्षेत्रसंन्यास केला आहे. म्हणून त्याला त्या संतांच्या हृदयांतून बाहेर जाताच येत नाही. ज्याप्रमाणे राजाच्या क्षणभर संगतीने अष्टसिद्धीप्रमाणे सर्व लोक अनुकूल होतात. त्याप्रमाणे तेच पुरुष ब्रह्मानंदाने पूर्ण तृप्त आहेत. व तोच बोध मला निवृत्तिरायांनी दिला असे माऊली ज्ञानेश्वर सांगतात.