संत सोपानदेव चरित्र ३७
भाग – ३७.
सोपानकाका संजीवन समाधी बद्दल सांगत होते.त्यांच्या आवाजांतील गोडवा,मोजक्या शब्दात सांगण्याची हातोटी,सुलभ सोपी भाषा हे ऐकतांना समोर बसलेल्या सर्वांची भावसमाधी लागली होती.सर्वात आधी भान आले ते निवृत्तीदादांना!त्यांनी व्यासपीठावर असलेल्या सोपानाला कडकडुन मिठी घातली.काय नव्हते त्या मिठीत?ज्ञानेशा च्या वियोगाचे,विरहाचे दुःख,सोपानाची अस्खलित वाणी,सोपी भाषा,प्रवाही बोलणं याबद्दलचं कौतुक,धाकटा भाऊ व शिष्याबद्दचा अभिमान,गुरु असण्यात ली सार्थकता!सगळा श्रोतृवर्ग भानावर आला.सर्वजण माऊलीचा व सोपानांचा जयजयकार करुं लागली.
ज्ञानेश्वरमाऊली प्रत्यक्ष ज्ञानसूर्य होते तर ही भावंडे म्हणजे ज्ञानसूर्यातुन ओसंडणारी तेजाची वलयं होती.त्यानंतर बरेच दिवस सोपानाचं हे संकीर्तन लोकांच्या मनांत भरुन राहिलं.माऊलीं च्या संजीवन समाधीनंतर त्यांच्या जागी आतां हा ज्ञानचंद्र सोपानकाकाच सर्वांचे ह्रदयस्थ बनले होते.त्यादिवशीही नेहमी सारखे अंगणांत सारे जमले होते.
चोखामेळांनी विचारले,सोपानकाका!मला एक सांगा… माऊलीनं समाधी घेण्याचं,जीवितकार्य पूर्ण झालय हे कुणी ठरवल?आताशी कुठं लोकांना त्यांची योग्यता कळली होती,लोकांच्या ह्रदयात जागा मिळवली होती.समाजाला ते हवेहवेसे वाटत असतांना त्यांच काम पूर्ण झालं हे कुणी ठरवलं?चोखोबा!मी सांगतो,सोपान म्हणाले,निवृत्तींच्या काळजांत चर्र झालं.चोखोबा!आपण लोकांना हवेहवेसे वाटतो,तेव्हाच या जीवनाचा त्याग करणं योग्य असते. लोकांना नकोसं झाल्यावर केवळ मरण येत नाही म्हणुन जगत राहण्यांत काय अर्थ?लोकांसाठी ज्ञानाचे दरवाजे उघडण्याचं काम ज्ञानदादाने केलय,आतां त्या कवाडातुन जाऊन ज्ञान संपादन करायच की,अज्ञानी रहायच हा सर्वस्वी लोकांचा,समाजाचा प्रश्न आहे
.चोखोबा! लोकांना आयतं मिळालं की,त्यांना तशीच संवय लागते.ज्ञान संपादन करण्यासाठी करावी लागणारी धडपड, प्रयत्न,तपश्चर्या,विचारमंथन,चर्चा,संवादकुणीच स्वतःहुन केलं नसतं आणि म्हणुनच ज्ञान म्हणजे काय याची झलक समाजाला दाखवुन त्यांना उद्युक्त करुन आपलं जीवितकार्य पूर्ण करुन ज्ञानदादा समाधीस्त झाला.हे कुणी ठरवलं?तर देवानेच ठरवलं,तेही आमच्या जन्माच्या आधीच!जीवितकार्य पूर्णत्वास गेल्यावर अवतार कार्याची समाप्ती करायचीय! फक्त ज्ञानदादाच नव्हे तर आम्ही तिघांनी सुध्दा.चोखोबांच्या सगळ्या प्रश्नांचे निरसन झाले.पण सोपानांच्या शेवटच्या वाक्यांनी सगळीच अस्वस्थ झालीत. नानदेवांच्या डोळ्यांतुन अश्रू ओघळु लागले.स्मशान शांतता पसरली.
त्या शांततेचा भंग मुक्ताने केला. नामदेवकाकका! तुम्ही पांडुरंगाचे लाडके भक्त,जिवलग,परमार्थ्यातला तुमचा अधिकार मोठा,मग हे अश्रू का?१५-१६ वर्षाची मुक्ता समंजस,तत्वचिंतक,आत्म भावानं परिपूर्ण आणि परमार्थाच्या मार्गा वर अधिकार असणारी योगीनीच भासत होती.अनन्यभावानं नामदेव शरण येऊन, मान झुकवुन बोलुं लागले,ही चार भावंड एकाच सुत्रात बांधलेले,एका स्तोत्रानं भारलेले,ज्ञानसंयमतेच्या एकाच पातळी वर असलेले ज्ञानामृताचे कलश आहेत. तेजाचे स्रोत आहेत जणुं ब्रम्हा,विष्णु, महेश आणि आदीमाया!
आज माऊलींनी समाधी घेऊन सत्तावीस दिवस झालेत.जातांना त्यांनी सोपानकाकांचा हात पांडुरंगाच्या हातात देऊन सांभाळायला सांगीतले होते.त्याचा अर्थ वेगळाच होता.दोन दिवसांपूर्वी पांडुरंग माझ्या स्वप्नात आला,आणि… आणि!! नामदेवांना पुढे बोलवेना!नामया अडखळु नका.सगळं कांही पूर्ण सांगा! निवृत्तींनी आदेश दिला.त्यांनी धीर एकवटुन म्हणाले,पांडुरंगानं मला आज्ञा केली,ती म्हणजे आपल्या सर्वांवर वज्रघात आहे,ती आज्ञा पाळणे म्हणजे अंधकाराशिवाय कांहीच नाही.आधीच एका ज्ञानसूर्याचा अस्त झालाय.आणि पांडुरंगाची आज्ञा पाळणं म्हणजे दुसर्या ज्ञानचंद्राचा अस्त आहे.मी…मी किती पापी करंटा…हे सगळं करण्याच काम माझ्याच नशीबी आलय.नामदेवांसारखा श्रेष्ठ भक्ताची ही स्थिती तर,आपलं कसं होणार? या विचारानच सगळी घायाळ झाली.
क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.
[…] सोपानदेव चरित्र ३६ संत सोपानदेव चरित्र ३७ संत सोपानदेव चरित्र ३८ संत सोपानदेव […]