संत सोपानदेव चरित्र ३६
भाग – ३६.
एक दिवस सगळी संतमंडळी जमली असतांना संजीवन समाधीचा विषय निघाला.सिध्दयोगी असल्या शिवाय कुणालाच जमत नाही असं प्रत्येक जण आपापली मतं मांडु लागला. ज्ञानेश्वरांचा भक्त असलेल्या केरोबाच्या डोक्यावरुन ही चर्चा जात होती.माऊली सर्वांचा निरोप घेऊन गुहेत गेली आणि मग सगळीच धाय मोकलुन रडु लागली एवढच त्याला समजलं होतं,बोलावं की, बोलु नये या दुविधेत असलेला केरोबाने विचारले, हे संजीवन समाधी म्हणजे नेमकं काय?सोपानकाका तुम्ही सांगा ना अज्ञानी माणसांना.
निवृत्तीदांनी सोपानांना आदेश दिला,संजीवन समाधी म्हणजे काय हे यांना समजेल अशा सोप्या नागरी भाषेत सांग.आतां संध्याकाळ झाल्यामुळे उद्या मनांतील शंका निरसावुन घेऊ,रामकृष्ण हरी चा गजर करुन दुसर्या दिवशीची उत्सुकता घेऊन मंडळी निघुन गेली. कितीतरी दिवसांनंतर सोपानकाकांना शांत झोप लागली.स्वप्नात प्रसन्न हास्य, डोळ्यात वात्सल्य असलेले ज्ञानदादा दिसले.ते म्हणाले,सोपाना!उद्या तू संजीवन समाधीबद्दल लोकांना सांगणार ना? हे फार मोठं कार्य तूं करतो आहेस.अरे अज्ञान दूर करणं हेच तर आपल्या जीवितांचे उदिष्ट आहे ना? सोपाना!तुझ्या सोपानदेवी मुळे तूं उदिष्टाप्रत गेला आहेसच,आतां संजीवन समाधीचं शास्र सांगुन त्यावर कळस चढवणार आहेस.तू तुझं जीवितकार्य अंतिम चरणापर्यंत नेलेस,उद्या त्यावर पूर्ण विराम चढेल,बोलतां बोलतां ज्ञानदादा अंतर्धान पावले.
आज कित्येक दिवसांनंतर सोपान सावरलेले व आनंदी दिसत होते. सकाळची नैमत्यीक कार्य आटोपली. दुपारी तिघेही जेवायला बसलीत.ज्ञानदां चं चौथं पान ठेवायला मुक्ता विसरली नाही.रिकाम्या जागेकडे पाहुन तिघांच्या ही मनांत कालवाकालव झाली.मुक्ता म्हणाली,ज्ञानदा आपल्यात नाही ही वस्तु स्थिती कठोरपणे स्विकारणे हेच आपल्या योगीजनांचं लक्षण आहे. त्याच्या नसण्याची संवय होणं आपल्या ला गरजेचे आहे.पण ते सुध्दा आपल्याला फार काळ करावी लागणार नाही.ऐहिक लोकांतुन निवृत्त होऊन ज्ञानाचा सोपान चढल्याशिवाय मुक्ती मिळत नाही.प्रत्येक विषयाला वात्सल्या ची झालर जोडत पारमार्थिक तत्वाकडे नेण्याच्या तिच्या कौशल्याचा दोघांनाही कौतुक वाटलं.तिघंही शांत झाली.
आज सोपानकाका संजीवन समाधीचे रहस्य सांगणार ही चर्चा सार्या पंचक्रोशीत वार्याच्या वेगाने पसरली. संजीवनी समाधीबद्दल लोकांचे अनेक तर्क-कुतर्क रचले जात होते.नामदेवादी संतमंडळींना सांगीतले ही सुध्दा हटयोगा ची एक परिपुर्ण अवस्था आहे यापलिकडे त्यांनाही कांहीच माहित नव्हते.खरं तर ज्ञानदेवांनी ज्ञानेश्वरीच्या सहाव्या अध्ययात विसृत माहिती दिली होती,पण त्यातील मराठी,सामान्यांच्या आकलना पलिकडची होती.डोळ्यांत मावणार नाही इतकी प्रचंड गर्दी जमली.आळंदीतल्या विठ्ठलमंदिराचं प्रांगण गर्दीनं नुसतं फुलुन गेलेलं होतं.
सोपानांनी व्यासपीठाला,निवृत्तींना नामदेवादी सर्व संतमंडळींना नमस्कार केला व वीरासन घालुन व्यासपीठावर बसले.मनचक्षूने ज्ञानदादांना नमस्कार केला आणि सोप्या शब्दात,मधूर वाणी कुणालाही समजेल अशा भाषेत संवाद साधत,सोपानांनी बोलायला सुरुवात केली.तुम्हा सर्वांच्या आशिर्वादाने नाथ पंथातील हटयोगातल्या संजीवन समाधीचं शास्र आणि रहस्य सांगण्याचा प्रयत्न करणार आहे.
ज्ञानदादांनी सहाव्या अध्यायात सविस्तर माहिती सांगीतली आहे.त्यांनी स्वतःला पंचमहा तेजाच्या स्वाधीन करुन समर्पण केलं आहे.संजीवन समाधीसाठी स्थान कसं असावं,आसन कसं असावं,हे सांगीतले.त्या आसनावर बसुन मन एकाग्र करुन सद्गुरुचे स्मरण करुन अष्टसात्विक भाव जागृत होऊन अहंकार लोभ,मोह याचा विसर पडुन इंद्रियांना लगाम घालुन अंतर्मन,अंतःकरणाकडे वळते.
आतां महत्वाचं म्हणजे अशा आसनावर कश्या स्थितीत बसावं?कोणती योगमुद्रा धारण करावी?नाथ पंथात हटयोगाद्वारे सांगीतल्या प्रमाणे योगमुद्रा कशी असावी,मूळ बंधाचं लक्षण सांगुन अपानवायू बाहेर पडण्याचा मार्ग बंद होऊन अपानवायू वर वर सरकू लागतो.नंतर जालंधर बंध, स्वाधिष्ठान चक्राचा जो बंध पडतो त्याला वोढियाणा बंध म्हणतात.अश्या प्रकारे बरेचसे बारीक सारीक वर्णन करुन सांगीतले.
क्रमशः
संकलन व मिनाक्षी देशमुख.
[…] संत सोपानदेव चरित्र ३६ संत सोपानदेव चरित्र ३७ संत सोपानदेव चरित्र ३८ संत सोपानदेव चरित्र ३९ संत सोपानदेव चरित्र ४० संत सोपानदेव चरित्र ४१ […]